पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/101

हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षण आणि संस्कार
 एक शिक्षक म्हणून आपले जीवन सुरू करणाच्या खांडेकरांनी आपल्या चित्रपट आणि साहित्यातून समाजशिक्षकाची भूमिका कधी सोडली नाही. ‘जीवनासाठी कला' हे त्यांच्या साहित्याचं सूत्र होतं. त्यामुळे आपल्या समाजचिंतनातही त्यांनी कधी आपल्या या भूमिकेचा, ध्येयाचा विसर पडू दिला नाही. त्यांची शेवटची कादंबरी ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली'. शीर्षकातच या समाजशिक्षकाची जीवनभराची खंत प्रतिबिंबित आहे. शिक्षण ही औपचारिक प्रक्रिया नाही. शिक्षण माणसाचा कायाकल्प घडविते, यावर त्यांचा विश्वास होता. संस्कारांचे सामर्थ्य शिक्षणातच असल्याने पिढी घडविण्याचे ते प्रभावी साधन मानत. म्हणून त्यांनी सदर कादंबरीत एका पत्रात शिक्षण व संस्कारसंबंधात विस्तृत विवेचन करताना म्हटलं आहे, ‘अलीकडची माणसं खूप शिकतात, ज्ञान-विज्ञान मिळवितात. त्यामुळे त्यांचे बाह्य जीवन बदलते; पण ती सुसंस्कृत होतात का? सुसंस्कृत व्हायला माणसाला स्वतःच्या पशुत्वावर विजय मिळवावा लागतो. अंतरंगातल्या संघर्षात सात्त्विक मनाच्या बाजूने उभे राहायला आत्मा समर्थ करणे ही सोपी गोष्ट नाही, ते सामर्थ्य येते व्रतस्थतेने; पण तपस्या आणि व्रतस्थता हे दोन्ही शब्द अनिर्बंध. चैन म्हणजे सुखी जीवन असे मानणाऱ्या आधुनिक जगाला ते परके झाले आहेत.'असे स्पष्ट करून खांडेकरांनी जीवनभर केलेली तपस्या व पाळलेलं व्रत हे समस्त मानवजातीच्या कल्याण व विकासासाठी होतं, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.
नवी स्त्री

 स्त्री-पुरुष समानतेचं समर्थन करणाऱ्या वि. स. खांडेकरांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीविकास, स्त्री-पुरुष समानता इत्यादी विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर व स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाल्यावर स्त्रीमध्ये दिसून येणाऱ्या बदलांबाबत खांडेकर चिंतित होते; अशासाठी की, स्त्री-पुरुष समानता ही समाज संतुलनाचाही अविभाज्य भाग आहे. स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे अनिर्बंंधता नव्हे. नव्या स्त्रीमध्ये ती दिसताना पाहून जागे करीत खांडेकर म्हणतात, 'आमच्या पिढीला मुलींच्या मनात स्त्रीशिक्षणाच्या कल्पना असत.स्त्रीस्वातंत्र्याच्या अनिर्बंंध कल्पना मात्र सहसा आढळत नसत. त्या आता जीवनात शिरल्या आहेत. समतेचे खरेखोटे विचार, शिकलेल्या मुलींच्या महत्त्वाकांक्षेला आवाहन देत आहेत. अशा वेळी... सुशिक्षित मुलींच्या विवाहाचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नये...

वि. स. खांडेकर चरित्र/१००