पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/47

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूर्य, तारे, झरे, इत्यादी) द्वारे मानवी जीवनाचा शोध घेणाऱ्या कलात्मक कथा खांडेकरांनी लिहिल्या याच काळात.
 यानंतरही खांडेकर सन १९७६ पर्यंत कथा लिहीत राहिले. या कालखंडातील (१९४६ ते १९७६) आणखी पाच कथासंग्रह ‘भाऊबीज', ‘स्वप्न आणि सत्य', ‘विकसन’ आणि ‘सरत्या सरी' व रूपककथांचा एक संग्रह ‘क्षितिजस्पर्श' प्रकाशित झाले. ते मीच संपादित केले आहेत. या कालखंडातील खांडेकरांच्या कथा ओ हेन्रीचे कलाटणी तंत्र, चेकॉव्हची चिकित्सा, फ्रॉइडचे मनोविश्लेषण, मार्क्सचे तत्त्वज्ञान, गांधींची मूल्यधारणा, समाजवादाचे पंचशील यांतून प्रौढ व कलात्मक होत गेली. या कालखंडातील कथांनी वाचकांच्या रंजनाऐवजी प्रबोधन करून त्यांना अंतर्मुख केले. या दीर्घकाळ मनात रेंगाळणाच्या कथा ठरल्या. पूर्वीच्या कथा मन मोहवून टाकणाच्या असायच्या. कल्पना, भावना व विचारांचा त्रिवेणी संगम आपणास उत्तरार्धातील कथांत अनुभवायला मिळतो. पूर्वार्धातील कथा वेधक होत्या. त्या उत्तरार्धात भेदक बनल्या. सन १९७३ मध्ये वि. स. खांडेकरांची दृष्टी पूर्णपणे निमाली. त्यानंतरही ते लिहीत राहिले. यावरून कथेवरचे त्यांचं प्रेम स्पष्ट होते. या कालखंडात त्यांनी अनेक कथांतून पूर्वदीप्ती (फ्लॅशबॅक) शैलीचा उपयोग करून कलाकुसर अधिक मनोवेधक बनविली. ‘प्रीती’ उदाहरण म्हणून पाहता येईल. या संदर्भात ‘विकसन संग्रहातील कथा खांडेकरांच्या उत्तरायणातील. इथे खांडेकर कथेकडे अधिक जाणिवेने पाहतात असे लक्षात येते. सरत्या सरी'मधील त्यांच्या कथा सन १९७४ ते १९७६ च्या. त्या जीवनस्पर्शी, चिंतनप्रधान, चरित्रकेंद्री होत. विदेशी कथांच्या वाचनाने त्यांनी आपले तंत्र व मंत्र दोन्ही बदलून यंत्र बनणारा माणूस ‘मनुष्य'च कसा राहील याची काळजी घेत कथा लिहिल्या..

 समग्रतः कथाकार वि. स. खांडेकर हे रंजकतेपेक्षा बोधप्रद लेखन करणारे साहित्यिक. आपली कथा काल आणि आजपेक्षा उद्या अधिक कसदार कशी होईल, याचा ध्यास त्यांना होता. आपणाला कसदार लिहिता का येत नाही म्हणून मौन पत्करणारा हा कथाकार एक गंभीर लेखक होता. आपली प्रत्येक कथा प्रत्येक वाचकाचा कायाकल्प कसा करेल, हे त्यांनी पाहिलं. 'नीच कोण?', 'प्रेमलक्ष्मी'सारख्या प्रकरण कथा लिहिणोर खांडेकर शेवटी ‘मृत्यूसारखी रूपककथा लिहितात. ती इतकी अल्पाक्षरी, प्रतीकात्मक, चिंतनगर्भ होते की, वाचताना ही कथा आहे की काव्य असा प्रश्न पडावा. कथा आणि काव्याचा मिलाफ घडविणारी खांडेकरांची रूपक शैली म्हणजे मराठी सारस्वतात उघडलेलं नवं दालन! खांडेकर मराठी कथेचे अनभिषिक्त

वि. स. खांडेकर चरित्र/४६