इत्यादी अनेक रूपात आढळतात. वंचित वर्गाचे गद्य साहित्य प्रारंभी समाजहितैषी कार्यकर्त्यांनी कल्याणाच्या भावनेने केलेल्या कार्याची नोंद म्हणून केले. पुढे अशा वर्गातून विकसित झालेल्या लाभार्थी व आश्रितांनी आपल्या अनुभव कथनाद्वारे याला आधुनिक बनवले. त्यामुळे वंचित साहित्याचे वर्गीकरण करत असताना स्थूलरूपाने ते नाटक, कथा, कादंबरी, अनुभवकथन, आत्मकथन, वैचारिक व समीक्षात्मक अशा स्वरूपाचे आढळून येते. सांगितल्याप्रमाणे आधुनिक वंचित साहित्य इतिहासाच्या वर्गवारीच्या दृष्टीने पाहाता तीन कालखंडात ते विभगता येईल.
१. स्वातंत्र्यपूर्व वंचित साहित्य
२. स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य
३. उत्तर आधुनिक काळातील वंचित साहित्य
१. स्वातंत्र्यपूर्व वंचित साहित्य
त्र्यंबक नारायण अत्रे यांचे 'गावगाडा' (१९४१) हे पुस्तक स्थूलरूपाने ग्रामीण समाजशास्त्र समजाविते, तसेच ते खेड्यातील समस्या अधोरेखित करते. हे पुस्तक ग्रामीण व दलित साहित्याचा मूलाधार म्हणून पाहिले जाते. तसे ते वंचित साहित्याचा मूलाधार म्हणून पाहता येईल. पण खच्या अर्थाने वंचित साहित्याचा प्रारंभ हा महात्मा फुले समग्र साहित्य, महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मवृत्ताने सुरू होतो. त्यात ते स्वतःचे जीवन चरित्र जसे विस्ताराने सांगतात तसेच ते अनाथ मुले-मुली, विधवा स्त्रिया, परित्यक्ता, कुमारी माता यांच्यासाठी केलेल्या समाजकार्याचे वृत्तही सादर करतात. त्यांच्या सहकारी पार्वतीबाई आठवले या 'माझी कहाणी' (१९२८) मध्ये अनाथ बालिकाश्रमासाठी केलेल्या निधी संकलनाचा इतिहास नोंदवत आपली अमेरिकेची वारी सांगत विसाव्या शतकाच्या प्रारंभी या कार्याच्या पार्श्वभूमीवरील समाजमन समजावितात. त्यांच्यानंतर १९३४ ते १९३६ मध्ये ‘लक्ष्मीबाई टिळक' आपल्या स्मृतीचित्राद्वारे स्त्रियांच्या व्यथा-वेदना प्रकर्षाने मांडतात. तद्नंतर १९४३ मध्ये पार्वतीबाई आठवलेंप्रमाणेच हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्य करणा-या कमलाबाई देशपांडे आपले अनुभव कथन ‘स्मरणसाखळी' (१९४३) मधून ओवताना दिसतात. एका अर्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातील वंचितांचे साहित्य हे वंचितांविषयी समाजात भाव साक्षरता निर्माण करताना दिसते. या साहित्यातून वंचित वर्गाची दुरवस्था जशी स्पष्ट होते, तसे समाजाचे सनातनी व पारंपरिक रूपही त्यातून स्पष्ट होते. म. फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, महर्षि विठ्ठल