पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/131

हे पान प्रमाणित केलेले आहे.

रामजी शिंदे प्रभृतींच्या सामाजिक कार्याच्या पायावरच स्वातंत्र्योत्तर काळातील वंचितांचा विकास झाला व त्यातून कल्याणकारी कार्याचे जाळे विकसित झाले. अशा वर्गातून उभारलेल्या स्त्री-पुरुषांच्या पुरुषार्थाची कथा म्हणजेच स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य होय.

 २. स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य

 स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्याचे विहंगमावलोकन करत असताना असे दिसून येते की, स्वातंत्र्यामुळे शिक्षण प्रसार झाला. समाजसुधारणा घडून आल्या. विकास योजनांचा लाभ समाजातील सर्व उपेक्षित वर्गापर्यंत पोहोचला. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ अनाथ, परित्यक्ता, विधवा, कुमारीमाता यांच्या प्रश्नांचा परीघ ओलांडून स्वातंत्र्योत्तर काळात हे वर्तुळ इतके रुंदावते की, यांचा मोठा अचंबा वाटत राहतो की, कुणाचे स्वातंत्र्य? कुणाला स्वातंत्र्य? कसले स्वातंत्र्य? स्वातंत्र्यानंतर वीस-पंचवीस वर्षांचा कालखंड असा आढळतो की, त्या कालखंडात सरळ अंगाने वंचितांबद्दल फारसे लिहिले गेले नाही. याला गती येते ती १९६० नंतर. सन १९६४ ला सत्यभामा सुखात्मे ‘गेले ते दिवस' सारख्या आत्मकथनेतून विवाहबाह्य पुरुष मैत्री सांगण्याचे धाडस करतात. याच काळात एकीकडे हंसा वाडकर ‘सांगत्ये ऐका' (१९७०) च्या माध्यमातून चंदेरी पडद्यामागचं स्त्री जीवनाचं वास्तव किती दारूण असतं ते शब्दबद्ध करतात. तर दुसरीकडे याचवेळी गोदावरी परुळेकर ‘माणूस जेव्हा जागा होतो' (१९७0) सारखी अनुभव कथा लिहून आदिवासी अस्मिता जागराची संघर्षकथा समजावितात. पुढे हीच वाट तुडवत अनुताई वाघ ‘दाभोळच्या जंगलातून' (१९९०) या पुस्तकातून आदिवासी स्त्री व बालकाच्या विकासासाठी वेचलेले श्रम शब्दबद्ध करतात. १९७५ च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं होतं आणि मराठीत स्त्रियांच्या आत्मकथेचा पूर वाह लागतो.

 ३. उत्तर आधुनिक काळातील वंचित साहित्य

 'वेगळ्या वाटेने जाताना' - कुमुद रेगे, ‘बिल्वदल' - अनुताई भागवत, ‘स्नेहांकित' - स्नेहलता प्रधान, ‘मी वनवासी' - सिंधुताई सपकाळ, ‘आठवणीतल्या गोष्टी' - विजया लवाटे, ‘बिनपटाची चौकट' - इंदुमती जोंधळे, ‘चाकाची खुर्ची' - नसीमा हुरजूक अशी एकामागून एक आत्मकथने प्रकाशित होत राहतात आणि मग वंचितांच्या प्रश्नांची नवनवी अंगे, स्त्रियांचे नवे प्रश्न समाजास समजणे शक्य होते. या सर्वांच्या मुळाशी लक्ष्मीबाई टिळक, विभावरी शिरूरकर, काशीबाई नवरंगे यांच्यासारख्यांचं लेखन

शब्द सोन्याचा पिंपळ/१३०