बनून पुढे येते. बाबा आमटे यांचा पिंड पोसला तो महात्मा गांधी, साने गुरुजी, गौतम बुद्धाच्या करुणेवर. पण ही करुणा अश्रू घेऊन जन्मत नाही. हा कवी अश्रूच्या सागर आटवायला निघालेला आधुनिक अगस्ती होय. त्याला या गोष्टीचं मोठं दुःख आहे की या तिघांच्या जीवन दर्शनाचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला. बाबा आमट्यांना विचारशरण अनुयायी नकोत. त्यांना श्वेत, प्रतिबद्ध कार्यप्रवण कार्यकर्ते जे स्वकर्तृत्वावर जग जिंकतील... ‘एकलव्य' त्या कांक्षेचं गर्वगीत होय. बाबा आमटे आपलं जीवन एकलव्याप्रमाणे असणारी ‘एकान्त साधना' मानतात. संगराचं निबीड अरण्य त्यांच्या पाचवीलाच पुजलं होतं. इतक्या टोकाच्या विधायक कार्याला स्थानिक विरोधाचं ग्रहण ठरलेलं होतं. ते पचवत ते विधायकता जारी ठेवतात, म्हणतात... ‘निबिडातून नवी वाट घडवण्याचे जीवनाचे आव्हान मी स्वीकारले आहे.'
बाबा आमटे यांना ‘विश्वामित्र' आपला अंतर्यामी आवाज वाटतो. विश्वामित्र होतं 'भुकेचं झाड.' त्याला संतोष नव्हता. त्यानं एकामागून एक कांक्षा सिद्ध केल्या... त्यात पतन... पराभवही त्याला पत्कारावा लागला. त्याचं बाबा आमटे गौरवीकरण करतात नि म्हणतात ‘विश्वामित्रांच्या महापतनालाही असते मेनकेचे लावण्य' हे पतनाला येणारं सौंदर्यसृष्टीच्या निर्मितीच्या ध्यासातून आलेलं असतं हे आपण विसरतो. ज्याची स्पर्धा स्वतःशी त्याला जिंकणार कोण? अशी अपराजेय सामाजिक महत्त्वाकांक्षा घेऊन तुम्ही काय करू पाहाल तर परिवर्तनाचा एक तुकडा, तुमच्या हाती येईल. कारण इथं बदल हे गनिमी विरोधाला हुलकावण्या देऊनच मिळवावे लागतात, हे आपलं समाज वास्तव बाबा आमटे ‘ज्वाला आणि फुले' मधील अशा व्यक्तिरेखांतून आपणास समजावतात.'
‘ज्वाला आणि फुले' वाचत असताना बाबा आमटेंच्या वाचन, व्यासंगाचा परीघ किती व्यापक होता हे सतत प्रत्ययास येत राहातं. पुरोहित ते पोप, धनुष्य ते स्कायस्कॅपर, मनू ते कॉनरॅड, सावित्री ते तेरिश्कोव्हा, वरोरा ते वॉर्सा, गांधी ते नित्शे, झांजीबार ते बॅस्टिल, भारतीय ते मे फ्लाय संस्कृती असं चतुरस्र वाचन त्यांचं ! भारतीय समाज, संस्कृतीच्या प्रश्नांवर मांड ठोकून उभारलेला हा सामाजिक दर्यावर्दी. त्याची आकांक्षा मात्र ब्रह्मांड कवेत घ्यायची! बाबा आमटे कधी कूपमंडूक विचार करूच शकले नाहीत. त्यामुळे कुटुंबनियोजनात स्त्रियांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्यांना विरोध करणारं पोपचं वक्तव्य येताच त्यांना ग्रीक मायथॉलॉजीतील प्रॉमिथिअस