पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/77

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अशा प्रकारे अनेक धर्माचारांचा कबीर विरोध करतात कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरण प्रवृत्ती ‘मुंड मुंडाये हरि मिले, तो सब कोई लेय मुंडाय' म्हणणारे कबीर कर्मकांडातील वैयर्थच समजावितात. केवळ केशवपनाने मोक्ष मिळायचा तर माणसाआधी तो बकरीला मिळायला हवा. दाढी वाढवून मोक्ष मिळायचा तर तो आधी बोकडालाच मिळेल, अशी खात्री देणारे कबीर माणसाच्या ‘तन जोगी' वृत्तीवर प्रहार करून 'मन जोगी' होण्याचं समर्थन करतात-

 तन को जोगी सब करै, मन को बिरला कोई।

 सब बिधि सहजै पाइए, जे मन जोगी होइ।।

 सर्व प्रकारच्या विसंगत व्यवहारावर कबीरांचा प्रत्येक आघात म्हणजे नवधर्माचे अनुकरणीय आदर्शच रुजविण्यासाठी केलेली धडपड होय. कर्म, धर्मसंबंधी हिंसा, गुलामी यांना अशासाठी अमान्य होती की, त्याला तर्काचा काही आधार नसायचा. एकादशी दुप्पट खाशी'सारखी लोकोक्ती समाजात रूढ होती ती विसंगत व्यवहारामुळे. रोजा पाळायचा नि गोमांस भक्षण करायचे यासारखे विसंगत, दुटप्पी वर्तन ते कोणते?

 दिन को रोजा रखत है, रात हनत है गाय।

 यह खून, वह बंदगी, कह क्यों खुसी खुदाय।।।

 संत कबीर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे जनक होते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. संत कबीर हे पुरोगमी विचाराचे समर्थक संत होते. तर्कास आधार असायला हवा. आधार बोधगम्य हवा. प्रत्येक विचार, आचार हा कार्य, कारण कसोटीवर पारखून घेता आला पाहिजे. जे सारयुक्त आहे तेच स्वीकारायचं. जे फेकण्याच्या योग्यतेचं ते फेकायलाच हवं असं ते बजावायचे. ‘सार सार को कहि रहे, थोथा देई उड़ाय' म्हणताना कबीर त्यासच साधू मानत तो सारग्रही असतो. कबीर स्वतः असे सारग्रही संत होते. कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन, बाह्याचार त्यांना अमान्य होता. आज मंदिर-मशिदीच्या वादावरून राजकारण करणा-यांना कबीराचं काव्य अंजन ठरेल. पण गांधारीसारखी पट्टी बांधून ज्यांनी स्वार्थ हाच धर्म मानला आहे, अशा संकीर्ण जनांना बाबरी, बॉम्ब, बॉम्बे, गोध्रा अशा कितीतरी व्हाया प्रवासात आपण परत एकदा अंधश्रद्धेसच खतपाणी घालतो, हे कसं लक्षात येत नाही याचं आश्चर्य वाटतं. एकविसाच्या शतकातही कबीरांचे अंधश्रद्धा निर्मूलनपूरक विचार प्रस्तुत, सार्थकी वाटतात ते त्यातील मनुष्य कल्याणकारी वृत्तीमुळेच.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/७६