पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाश, ५) भारताच्या संपत्तीचे शोषण आणि दरिद्रीकरण, ६) भारतीयांना महत्त्वाच्या हुद्द्यांवर सहभाग नसणे, ७) जातीय भेदाभेद / सापत्नभाव, ८) न्यायदानात पक्षपातीपणा, ९) एतद्देशीयांच्या शिक्षणाबद्दल कमालीची उदासीनता, १०) सातारच्या राजाची अन्याय्य पदच्युती, ११) अफगाणिस्तानाबरोबर अनैतिक युद्ध, १२) चीनवर अनावश्यक लढाई, १३) ब्रिटिश इतिहासकारांकडून भारतीय इतिहासाचा विपर्यास." (नाईक, ज. वि., २०००, पृ. २९६) भाऊ महाजन यांनी ब्रिटिशांकडून केला जाणारा हिंदुस्थानच्या आर्थिक शोषणाविरुद्ध 'प्रभाकर' मधून सातत्याने हल्ला चढवला आणि हिंदुस्थानच्या जीवावर ब्रिटन कसा श्रीमंत होत आहे हे दाखविण्याचा अखंड प्रयत्न केला. व्हिक्टोरिया राणीच्या मुलाच्या नामकरण समारंभात झालेल्या प्रचंड खर्चाचा व संपत्तीच्या प्रदर्शनाचा ठळक वृत्तांत 'प्रभाकर' च्या ३० मार्च १८४२ च्या अंकात प्रसिद्ध केला. ही बेसुमार उधळपट्टी भारतातील संपत्तीच्या जोरावरच शक्य झाली असे त्यांनी स्पष्ट केले. रामकृष्ण विश्वनाथ हे इंग्रजांवर टीकास्त्र सोडणारे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील तिसरे महत्त्वाचे अभ्यासक. 'हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार' हे त्यांचे पुस्तक १८४३ च्या मे महिन्यात प्रकाशित झाले. रामकृष्ण विश्वनाथांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या आर्थिक धोरणाचे परीक्षण केले व हिंदुस्थानचे शोषण कशाप्रकारे चालले आहे ते दिग्दर्शित केले. या पुस्तकात हिंदुस्थानचा पूर्वेतिहास सांगून त्याला पूर्ववैभव कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल ते त्यांनी सुचविले आहे. याखेरीज इतर अनेक विषयांचा परामर्श घेत असताना अतिशय समतोलपणाने इंग्रजांनी या देशातील संपत्तीचा ओघ आपल्या देशाकडे कशा प्रकारे वळविला आहे ते स्पष्ट केले आहे. ते लिहितात, "असंतुलित व्यापारामुळे ब्रिटनकडे संपत्तीचा एक प्रवाह नियमितपणे वाहत आहे हे सिद्ध करण्यासाठक्ष रामकृष्ण विश्वनाथांनी बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स आणि अशा अनेक संदर्भांचा उल्लेख केला आहे. भारतातून सर्व कच्चा माल इंग्लंडला नेणे आणि पक्का माल आणून जास्त किमतीला विकणे या ब्रिटिशांच्या धोरणावर त्यांनी खूप टीका केली. भारताचा जीवनरस कसा सतत शोषून घेतला जात होता हे सिद्ध करण्यासाठी वस्तुस्थिती आणि आकडेवारी यांच्या आधारे त्यांनी कापूस व इतर कच्च्या मालाच्या निर्यातीविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरविली आहे." (नाईक ज. वि., तत्रैव, पृ. २९९) 'हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार' या पुस्तकाद्वारे १८५१-१८७१ या वीस वर्षांच्या काळात दादाभाई नौरोजी यांनी हिंदुस्थानच्या द्रव्याचे शोषण कोणकोणत्या प्रकारे चालू आहे आणि त्यामुळे हिंदी जनता किती दरिद्री झाली आहे याचा अचूक अंदाज केला. हे द्रव्यशोषण थांबवल्यावाचून हिंदी जनतेचा उद्धार होणे शक्य नाही असे ठाम प्रतिपादन केले. इ. स. १८७१ साली विलायतेत 'ईस्ट इंडिया फिनॅन्स कमिटी' या नावाची एक कमिटी हिंदुस्थानच्या जमाखर्चाचा विचार करण्यासाठी नेमली होती. तिच्या समोर दादाभाईंनी आपले विचार रोखठोक स्वरूपात मांडले. हिंदी जनतेचे दर माणशी वार्षिक उत्पन्न अवघे वीस रुपये आहे व हे उत्पन्न सरकार तुरुंगातील कैद्यांसाठी दर माणशी जो खर्च करते त्याहूनही कमी आहे, असे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.... हिंदी संपत्तीला ही जी मोठी गळती लागलेली आहे,... तिचे स्वरूप द्विविध आहे: पहिला प्रकार म्हणजे युरोपियन अधिकारी येथे जो पैसा साठवून विलायतेस पाठवितात तो, विलायतेत व येथे निरनिराळ्या गरजांसाठी जो खर्च करितात तो, इंग्लंडात नेमलेल्या लोकांना जे पगार व पेन्शने मिळतात ती आणि हिंदुस्थान सरकार विलायतेत जो खर्च करते तो. याच गळतीचा दुसरा प्रकार म्हणजे बिनअधिकारी युरोपियन लोक येथे जो पैसा कमावून विलायतेस पाठवितात तो. या गळतीमुळे हिंदुस्थानात भांडवल साठू शकत नसल्यामुळे जे ब्रिटिश; लोक येथून धुऊन नेलेला पैसा पुनः भांडवलरूपाने परत आणितात, त्यांना येथील व्यापाराचा व उद्योगधंद्यांचा जणू काय मक्ताच मिळतो आणि म्हणून या मार्गाने ते हिंदुस्थानच्या द्रव्याचे अधिकच हरण करितात. या सर्वांचा उगम सरकारी द्रव्यापहरणातच आहे."(जावडेकर, शं. द., १९६८, पृ. ११७) 'इंग्रजी राज्याची उलटी बाजू अथवा आमचे घोर दारिद्य' या निबंधात आगरकरांनीही इंग्रजी राजवटीमुळे भारताची जी आर्थिक दूरवस्था होऊन बसली आहे ती स्पष्टपणे मांडली आहे. वसाहतवादाचा नेहमीच वसाहतींच्या अर्थव्यवस्थेवर, राज्यव्यवस्थेवर आणि विविध सांस्कृतिक घटकांवर परिणाम होत असतो. हा वसाहतवादासंबंधीचा सार्वत्रिक सिद्धांत आहे. या विधानाचा प्रतिवाद करणारे असा प्रश्न विचारतात की, इंग्रजी राजवटीमुळे आपला काहीच फायदा झाला नाही का? याचे उत्तर इंग्रजी राजवट येथे आल्यामुळे जीवनविषयक आधुनिक दृष्टिकोण येथे प्रस्थापित झाला, वेगवेगळ्या सुधारणा घडून आल्या, शिस्त व कायदा रूढ झाला अशा अनेक शिल्पकार चरित्रकोश साहित्य खंड / एकोणऐंशी