रुपये सहज खर्चातात तेथे तो माल विकायचा. व्यापारी मध्यस्थांना तस्करांची संधी आणि धोका मात्र काहीच नाही.
इंडियातील उत्पन्नाची पातळी आणि भारतातील उत्पन्नाची पातळी यातील तफावतीमुळे शेतकऱ्याच्या भावात आणि ग्राहकाच्या किमतीत तफावत पडते. येथून स्वित्झर्लंडमध्ये भूईमूग पाठवला. येथे ८ रु. किलो, पाठवण्याचा खर्च ४ रु. किलो. पण तेच दाणे स्वित्झर्लंडमध्ये काही १२ रु. किलोने विकले जात नाहीत, ते विकले जातात ५२ रु. किलोने. ही स्वीस किंमत ठरली तेथील अर्थकारणाने, तुल्य वस्तूंचे भाव आणि ग्राहकांची ताकद लक्षात घेऊन.
शेतकऱ्याला जितकी किंमत जास्त दिली जाईल तितका मध्यस्थांचा फायदाच कमी होत जाईल. कारण ग्राहकाकडून जास्तीत जास्त जे उकळता येण्यासारखे आहे ते आजही उकळले जात आहे. त्यात वाढ करायला फारसा वाव नाही. शेतीमालाला भाव देताना शहरी उत्पन्नावर योग्य नियंत्रण ठेवले तर ग्राहकावर काहीही विपरीत परिणाम होणार नाहीत; किमतीची पातळीही वाढणार नाही. केवळ मध्यस्थांची नेफेखोरी आटेल.
ग्राहकांच्या प्रश्नांवर विचार करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. 'ग्राहक' हा शब्द वापरताना आपल्या डोळ्यासमोर केवळ शहरी, सुखवस्तू ग्राहकच उभा राहतो. ग्राहक केवळ 'इंडिया'तच आहेत असे नाही. भारतातही ग्राहक आहे. शेतकरी हा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्याच्या गरजा प्रचंड आहेत. दारिद्र्य अपार आहे. पण क्रयशक्ती नाही. रास्त भावाने त्याच्या हाती क्रयशक्ती येणार आहे आणि शतकांची भूक भागविण्याची शक्यता प्रथम निर्माण होणार आहे. ग्राहकाचा म्हणून जर विचार करावयाचा असेल तर ग्राहकाचे रास्त भावाच्या कार्यक्रमाने कल्याण होणार आहे. ग्राहक म्हणून जर आपण मूठभर शहरी पांढरपेशाचाच विचार करणार असलो तरीही त्यांचे अकल्याण काहीच होणार नाही.
आणि समजा या शहरी ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या किरकोळ किमती वाढल्या तर असे कोणते आभाळ कोसळणार आहे? शहरातील कमी कष्टाचे बौद्धिक तसेच शारीरिक काम करून शेतकऱ्यांच्या मानाने ते आनंदात दिवस काढत आहेत.
आंदोलनाविषयी एक ग्राहक तक्रार करीत होते. त्यांना स्पष्ट सांगितले, 'तुमची अडचण होणार आहे हे मान्य. पण मला सांगा तुम्हाला सदरे किती आणि तुमच्या