अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
मग आम्ही पहिल्यांदा आंदोलनासाठी कांदा का निवडला? संबंध देशामध्ये कांद्याच जे पीक येतं त्यापैकी ६० ते ७० टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात होतो. असं दुसरं कोणतंही पीक नाही. या ७० टक्क्यांपैकी ५० टक्के कांदा हा नाशिक व पुणे जिल्ह्यांच्या पाच तालुक्यांत होतो. म्हणजे देशातला निम्मा कांदा पाच तालुक्यांत होतो. या पाच तालुक्यांपैकी चाकण भागात दोन अर्ध्या तालुक्यांत संघटना आहे- मावळ भागात थोडी आणि खेड भागात थोडी. पण या दोन तालुक्यातील तेवढी ताकदही पुरेशी आहे. बाजारपेठेत हालचाली करायला काही १०० टक्के माल तुमच्या हातात असला तरी त्यामुळे बाजारावर ताबा आणता येतो. (वेगवेगळ्या मालाच्या बाबतीत त्याची बाजारपेठ ताब्यात ठेवण्याची ही ताकद वेगळी वेगळी असेल.) म्हणून कांद्याचं आंदोलन पहिल्यांदा घेतलं. दुसरं एक कारण म्हणजे त्यावेळी कांद्यावर निर्यातबंदी घातल्यामुळे कांद्याचा भाव एकदमच कमी झाला होता. त्यामुळे लोकांमध्ये चिडेची जाणीव होती, लोक उठायला तयार होते.
उसाचं आंदोलन चालू केलं त्यामागचंही कारण हेच. आकडेवारी पाहा देशामध्ये तयार होणाऱ्या एकूण साखरेपैकी ३५% साखर महाराष्ट्रात तयार होते आणि इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांना जास्त साखर पाठवतो. सगळ्यात मोठा साखरेचा गड्डा म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे उसाचं आंदोलन सुरू केलं.
भुईमुगाचं आंदोलन करू म्हणून जाहीर केलं होतं. पण प्रत्यक्षात केलं नाही. त्यांच पहिलं कारण म्हणजे भुईमुगाला यंदा चांगला भाव मिळाला त्यामुळे आंदोलन करण्यात काही अर्थ नव्हता, लोकांना उठवणं अधिक कठीण झालं असतं. दुसरं कारण असं की गुजरात, आंध्र, तामिळनाडू येथील बाजारपेठांशी सहकार्य केल्याखेरीज भुईमुगाचा लढा जोमदारपणे उभा राहू शकत नाही.
आज तंबाखूचा लढा उभा करायचा म्हणून आम्ही जाहीर केलंय. पण आम्हाला काय चिंता लागून राहिलीय? तिकडे अहमदाबादेत दंगे चाललेत, गोळीबार चाललेत त्यामुळे आमचे गुजरातचे जे शेतकरी इकडे विचारविनियमासाठी येणार होते ते अडकून पडलेत, आम्हाला अजून त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही आणि गुजरातमध्ये तंबाखूच्या लढ्यात लढायची तयारी झाली नाही तर एकट्या निपाणी भागात तंबाखूचा लढा कसा काय द्यायचा ही चिंता आहे तरीसुद्धा तंबाखूचा लढा निपाणीला द्यायचा ठरवले आहे. त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. समजा गुजरातचे