अनुभवयास पाहिजे.
विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली,
नीतिविना गति गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.(पृष्ठ क्र. १८९)
पण या अविद्येचे काय कारण? अगदी थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर दिले आहे. भटशाहीची दोन अंगे महत्त्वाची.
१. बनावट व जुलमी धर्म
२. सरकारी खात्यांतील ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य - विशेषतः युरोपियन कामगार ऐषारामी असल्यामुळे.
याखेरीज वेगवेगळ्या प्रसंगांनी विवेचन करताना जोतीबांनी इतरही काही कारणे घसघसून मांडली आहेत.
३. जंगल संपत्तीसंबंधी इंग्रज सरकारचे नवे धोरण.
४. कारखानदारी मालाच्या आयातीसंबंधी देशी उद्योग बुडविणारे धोरण
५. अपुरी व अनुत्पादक शेती
६. डाईजड सरकारी कर, शेतसारा, लोकल फंड, जकात, पाणीपट्टी वगैरे.
७. सरकारी उधळपट्टी, कामगारांचे पगार, विलायती व्याजादाखल देणी वगैरे.
ही कारणमीमांसा शेतकरी संघटनेच्या विचारांच्या संदर्भात तपासावयाची आहे. वेगवेगळ्या दिसणाऱ्या या सगळ्या कारणांचे एक शब्दांत रूप आहे- 'भटशाही'. 'कुणबी' विरुद्ध ‘भटशाही' हे शंभर वर्षांपूर्वी 'भारत' विरूद्ध 'इंडिया' संघर्षाचे स्वरूप होते. मनुष्यजातीचा इतिहास हा शेतीतील गुणाकार लुटण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा इतिहास आहे. लूटमार, गुलामगिरी, वेठबिगारी, सामाजिक व धार्मिक रूढी, अपुरी मजुरी, अपुऱ्या किमती हा वेगवेगळ्या पद्धतींचा साद्यंत इतिहास जोतीबांनी मांडला, शंभर वर्षांपूर्वी मांडला. यातच त्यांचे द्रष्टेपण आणि माहात्म्य.
□
तीन
जग बदलावयाचे आहे
जोतीबा केवळ पंडिती विचारवंत नव्हते. अत्यंत सचोटीचे आणि प्रामाणिक कार्यकर्ते होते. त्या काळच्या अनेक सुधारकांप्रमाणे 'खाणं थोडे मचमच फार' असा त्यांचा कारभार नव्हता. सनातन्यांच्या बहिष्काराला घाबरून शरणचिठ्ठी देणारे