पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/108

हे पान प्रमाणित केलेले आहे.

  'त्यांनी आपले अविचाराचे हेतू सिद्धीस जावे म्हणून हातांमध्ये अंमलरूपी अतितीव्र कोरडा घेऊन या देशांतील हस्तगत झालेले दीन प्रजेच्या अंगावर फडाफड उडवीत गेले. त्या वेळेस ते प्रजेस, ज्या हितकारक, सौख्यकारक गोष्टी त्यांजमध्ये सुधारणा न करता तिचा छळ कसा करावा यामध्ये मोठे प्रवीण होते...'

  'प्रजा याचा अर्थ काडी, कस्पट, ढेकूण अथवा काही एक प्रकारची जनावरे समजत असत. त्यांचा उपयोग म्हणजे त्यांनी राजे व त्यांचे जातीय लोकांकरिता, त्यांचे स्त्रियांकरिता व मुलाबाहांकरिता धान्य उत्पन्न कावे व वस्त्रे विणावी, त्यांच्याकरिता उन्हातान्हांत खपावे आणि त्यांस ज्या ऐषारामाच्या गोष्टी लागतात त्या पुरवाव्यात ह्याशिवाय दुसरे काही नाही. (इशारा, पृष्ठ क्र. ३१३-३१४)

  इंग्रजांचे राज्य अशा अवस्थेत संकट म्हणताच येणार नाही. उलट परमेश्वराने कनवाळू होऊन आपले दुःखांनी पीडित अशा शूद्रादि अतिशूद्र प्रजेस परमन्यायी, हितावह, सौख्यकारक, सदाचारी व शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अमलाखाली प्राप्त करून दिले. सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे...'

(इशारा, पृष्ठ क्र ३१५)


 इंग्रज प्रजेचे शोषण करीत नाहीत असे नाही. भरमसाट कर आकारणी, कारखानदारी मालाची आयात, जंगलविषयक इत्यादी घोरणे देशाला विघातक आहेत हे जोतीबांना पुरेपूर समजले होते. (असूड, पृष्ठ क्र २०४, २०५) पण त्याहीपेक्षा भयानक लूट होती ती भटांच्या सरकारी नोकरीतील प्राबल्यामुळे.

 देशी आणि विदेशी शोषक

 गावोगाव भोळ्याभाबड्या अज्ञानी रयतेला धर्मरूढीच्या नावाखाली भटब्राह्मण लुटतात. सरकारांतही त्याचेच प्राबल्य. इंग्रज अधिकारी ऐषारामी, अज्ञानी, कामात गढलेले. भट कामगार त्यास बनवतात व शेतकऱ्यांना नाडतात. उलट शूद्रांनाच इंग्रज राज्याविरूद्ध उठवण्याचा प्रयत्न करितात.

 जोतीबा स्वातंत्र्याविरुद्ध होते, इंग्रजांच्या बाजूने होते अशी कावकाव खूप झाली; पण जोतीबांचा विचार अगदी स्पष्ट होता.

 इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत. ते आपल्या जन्मास पुरवतील म्हणू कोणाच्याने खास करून सांगवत नाही. यास्तव या लोकांचे राज्य या देशात आहे तोच आपण शूद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित गुलामगिरीपासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठा शहाणपणा आहे. (गुलामगिरी, पृष्ठ क्र १३६)

 शूद्रांस भटांच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची संधी पुन्हा मिळणे नाही.


(गुलामगिरी, पृष्ठ क्र १३४)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १०३