पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/111

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भांडवलदार, कुणब्यांना रोजंदारीस बुडविणारी हिंदी रेल्वे आणि शेतकऱ्यांकडून भरमसाट करांची मागणी करणारे सरकार यांच्या माथी मारली पाहिजे.'

 'नेटिव्ह ओपिनियन'च्या अनामिक बातमीदाराने एक व्यापक भूमिका मांडली आहे हे निश्चित; पण या व्यापक भूमिकेची कल्पना जोतीबांना नव्हती असे नाही. या इतर कारणांविषयी त्यांनी तपशीलवार लिहिलेही आहे; पण धार्मिक विधीकरिता होणाऱ्या लुटीचे प्रमाण उपेक्षणीय मुळीच नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करणे हेही योग्य झाले नसते.

 खेड्यातील भटांचा वार्षिक फायदा त्या काळी केवळ वीसच रुपये होता ही माहिती खरी धरली, तरीसुद्धा ही रक्कम काही अगदीच क्षुद्र नाही. 'इशारा' पुस्तिकेत दुष्काळाच्या काळात बी-बियाण्यासाठी शेतकरी किती रुपयांचे कर्ज घेतो असे दाखविले आहे, माहीत आहे? दहाबारा रूपयांचे. एका शेतकऱ्याच्यास बी-बियाण्याच्या रकमेच्या दुप्पट भटाचा फायदा होता हीही काही क्षुल्लक गोष्ट नाही (समग्र वाङमय, पृष्ठ क्र ३१९-३२१). याच रकमेपोटी शेतकऱ्यावर जप्ती येऊन तो देशोधडीस लागतो किंवा प्राणत्याग करण्यास सिद्ध होतो. जोतीबांचे वडील गोविंदराव शेळ्या राखण्याचे काम करीत. तेव्हा त्यांचा रोज एक पै होता, म्हणजे वर्षाला २ रुपयेसुद्धा नव्हता. तेव्हा त्या काळात २० रु. ही रक्कम मामुली नव्हती.

 या पलीकडे जाऊन भटभिक्षुकांचे वास्तविक उत्पन्न खरोखरीच २० रुपयांइतके मर्यादित होते काय याचा विचार व्हावयास पाहिजे. प्रजेकडून मिळणाऱ्या दक्षिणा नेहमीच इतक्या किरकोळ असत असे जोतीबांच्या लिखाणातील संदर्भावरून तरी दिसत नाही. 'इशारा' पुस्तिकेच्या उपोद्घातात जोतीबांनी उल्लेख केला आहे,

  ....यांचे आर्यभट बंधू आम्हा शूद्र शेतकऱ्यांचे निढळाचे श्रमाची वीस वीस रूपयांची गोप्रदाने दररोज घेऊन नायकिणीच्या भरीस घालतात. (पृ. ३१२)

 यांना खाजगी दक्षिणांव्यतिरिक्त सार्वजनिक संस्था व सरकारी पीठे यांच्याकडून, मोठ्या प्रमाणावर प्राप्ती होत असली पाहिजे हे उघड आहे. जोतीबा म्हणतात :

  '(भट राजांनी) आपले जातीचे भट लोकांकरिता जागोजागी देवाची संस्थाने स्थापन करून तेथे त्याजकरिता अन्नछत्रे घातली. प्रजेकडून पैसा वसूल झाला, की लागलीच ब्राह्मण भोजन प्रीत्यर्थ अमुक संस्थानाकडे दोन लक्ष रुपये, अमुक संस्थानाकडे पन्नास हजार रुपये येणेप्रमाणे ठराव करून पैसा वाटून घ्यावा आणि दररोज पर्वतीसारख्या संस्थानावर आज काय, फक्त ब्राह्मणांस तूपपोळीचे जेवण व वर दहा दहा रुपये दक्षणा, आज काय लाडूचे जेवण व वर वीस वीस रुपये दक्षणा, आज ब्राह्मणांस केशरी भाताचे जेवण व वर ओगराळे भरून रुपये प्रत्येकास दक्षणा.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १०६