नाही' इतके चार शब्द बोलल्याची या कलमकसायांस बातमी लागली, की पुढे मग त्या दुर्दैव्याचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे. कारण ते कलेक्टरच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भट चिटणिसांपासून तो रेव्हिन्यूच्या अथवा जज्जाच्या सर्व भट कामगारांपावेतो आतल्या आंत यवनी गायत्रीची वर्दी फिरवून त्याच्या तंट्यात इतका गोंधळ करून टाकतात की यांत सत्य काय आणि असत्य काय हे निवडून काढण्याकरिता मोठमोठे विद्वान युरोपीय कलेक्टर आपली सर्व अक्कल खर्च करितात, तथापि त्यांस त्यांतील कधी कधी काडीमात्र गुह्य न कळता ते उलटे गाहाणे केलेल्या लंगोट्यांसच 'तू मोठा तरकटी आहेस' असे सांगून त्याच्या हातात नारळाची आई देऊन त्यांस शिमगा करण्याकरिता त्याचे घरी पाठवत नसतील काय?'
(पृष्ठ क्र. १३०)
एखादा जज भट शिरस्तेदार चूप बसवून प्रत्यक्ष कागद वाचून पाहणारा निघाला तरी
'... त्या कागदाला तो काय करील बापुडा! कारण पूर्वीच्या एकंदर सर्व कलेक्टर कचेरीतील भटांनी, कुळकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे... सर्व खटल्याचे स्वरूपच बदलून टाकले होते.' (पृष्ठ क्र. १३२)
राजे इंग्रज; पण राज्य जुने भटशाहीचेच अशी ही स्थिती.
शोषणाला विरोध हा जातीयवाद नव्हे
या धर्मव्यवस्थेचा हेतू आर्थिक शोषण हाच होता हे जोतीबांनी उजेडात आणले. साहजिकच त्यांच्यावर जातीयवादाचा, अगदी राष्ट्रद्रोहाचासुद्धा आरोप केला गेला. कुणाकडून? तर ज्यांनी देशातील बहुसंख्य शूद्रांना लुटून खाण्याचे काम हजारो वर्षे चालवले त्यांजकडून. शेतकरी संघटनेला केवळ शेतकरी संघटनेचे हित न पाहता सर्व समाजाचेही हित लक्षात घेण्याचा उपदेश करण्यात येतो त्यातलाच हा प्रकार.
'घाण करणारा लाजला नाही तरी पाहणाराने लाजावे' या न्यायाने जोतीबांनी जातीय भूमिका घ्यावयास नको होती असे मोठा मानभावीपणे सांगितले जाते. जोतीबा हे कुणाच्या हेव्यादाव्याची क्षुद्र बुद्धी ठेवणारे लटपटे संधिसाधू नव्हते; त्या काळच्या परिस्थितीत ही भूमिका घेणे त्यांना अपरिहार्य वाटले. महाराष्ट्रात उत्तर पेशवाईच्या अनागोंदी, अत्याचारी, क्रूर, मूर्ख राजवटीची पार्श्वभूमी जोतीबांची भूमिका लक्षात येण्यासाठी समजून घेतली पाहिजे.
'शेतकऱ्यांना नि शेतीवर राबणाऱ्या कामकऱ्यांना पेशव्यांचे अधिकारी व त्याचा दत्तक भाऊ अमृतराव हे छळून हैराण करीत असत. त्यांनी मागितलेली रक्कम