पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/12

हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिस्थितीत प्रत्यक्ष शिवशंभूचा अवतार अशा तेजस्वी शिवाजीचा अवतार झाला. आणि त्याने युक्तिप्रयुक्तद्दने स्वत: भवानीदेवीच्या आशीर्वादाने हिदूंचे राज्य स्थापन केले."बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला", "उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया". स्वराज्याची येवढी मर्यादित मांडणी हिदुत्वनिष्ठांनी केली. देशात धर्माधर्माचे वाद माजवण्याच्या त्यांच्या राजकारणास पूरक अशी शिवाजीची मूर्ती तयार केली आणि मग दंग्यामध्ये सुरे घेऊन निघणारे गुंड आणि हरिजनांची घरे जाळणारे दादा 'शिवाजी महाराजकी जय' च्या घोषणा करीत आपली कृष्णकृत्ये उरकू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने लष्करभरतीच्या जाहिरातीवरसुद्धा शिवाजी महाराजांचे चित्र छापले होते, मग राजकीय स्वार्थासाठी धर्मही वेठीला धरणारे शिवाजीला काय मोकळा सोडणार आहेत?

 संस्थापक महात्मा निघून गेल्यानंतर उरलेल्या मठातील शिष्यांनी बाबांच्या शिकवणुकीचे तिरपागडे करून टाकावे तसे शिवाजीचे बीभत्सीकरण फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यात दुःखाची गोष्ट अशी की शिवाजीचे खरे मोठेपण झाकले गेले. त्या काळाच्या इतर राजेरजवाड्यांप्रमाणे एक, पण धर्माने हिंदू असलेला अशी त्याची प्रतिमा तयार झाली. परदेशात तर सोडा, पण देशाच्या इतर राज्यांतही शिवाजीविषयी यामुळे विलक्षण गैरसमज कानाकोपऱ्यांत आणि खोलवरपर्यंत पसरलेली आहेत. शिवाजी म्हणजे संकुचित, शिवाजी म्हणजे प्रादेशिक, शिवाजी म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रतीक आणि निव्वळ लुटारू व धोकेबाज अशी कल्पना महाराष्ट्राबाहेर सार्वत्रिक आढळते. जाती, धर्म, प्रदेश यांच्या संकुचित मर्यादांना सहज उल्लंघून जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नशिबी अशी अपर्कीर्ती यावी ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा राजा शिवाजी याला जातीयवाद्यांच्या वधर्ममार्तंडांच्या कैदेतून सोडविणे आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून इतिहासात त्याचा पुन्हा एकदा राज्याभिषेक होणे आवश्यक आहे.

 शिवाजीसंबंधी महाराष्ट्रात तरी खूप लिहिले गेले, पण त्याचे निर्णायक जीवनचरित्र आजही उपलब्ध नाही. नजीकच्या भविष्यकाळात तयार होण्याची काही शक्यता दिसतही नाही. शिवाजीविषयी अज्ञान जितके सार्वत्रिक, तितका त्याच्या जयंत्यांचा कार्यक्रम अधिकाधिक विपरीत. कर्ण्याच्या मदतीने वाटेल त्या गाण्यांची किंवा पोवांड्यांची उधळण केली म्हणजे शिवाजीचा उत्सव साजरा झाला अशी समजूत सार्वत्रिक होत आहे. शिवजयंतीउत्सवाला गणपतीउत्सवाचे स्वरूप येऊ नये आणि कर्ण्याच्या गदारोळात खरा शिवाजी हरवून जाऊ नये म्हणून या पुस्तिकेचा प्रपंच.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ९