पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/121

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'विद्या खात्यातील एका मुख्य भट कामगाराच्या निदान दरमहा सहाशे सुर्ती म्हणजे दरवर्षी (७२००) सात हजार दोनशे रुपये, पदरी आवळावे लागतात. आता सुलतानीचा तर घोरच नाही; परंतु असमानी मेहेर झाल्यास एवढी रक्कम तयार करण्याकरितां शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेतीत खपावे लागत असेल बरे ! निदान एक हजार कुटुंबे तरी म्हटली पाहिजेत कां नको? बरे या ऐवजाच्या मानाने या बृहस्पतीपासून शूद्रांस काही उपयोग होतो काय ! अरे, चार आणे दररोज मिळणाऱ्या शूद्र बिगाऱ्यास उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपली वहावी लागतात. त्याला बाहेर कोठे जाण्यास एक घटकेचीसुद्धा फुरसत होत नाही आणि वीस रुपये रोज मिळणाऱ्या भटचाकरांस शाळेत हवाशीर जगण्यात खुर्ची आसनावर बसून काम करीत बसता त्यास म्युनिसिपालिटीचा वराती होऊन, दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकांच्या ओळखीस यावे म्हणून मोठ्या डौलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरातील रस्तोरस्ती लोकांच्या पढव्या, शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसत कोठून मिळते?'

(गुलामगिरी, पान १३७)


 आठ


 'शेतकऱ्यांचा असूड' प्रसिद्ध झाल्यानंतर आज शंभर वर्षांनंतर भटशाहीची अवस्था काय आहे ?

 ब्राह्मण असा ग्रामीण भागांत तसा दुर्मीळच झाला आहे. तसे भटशाहीच्या ऐन भरातही ब्राह्मण घरे ग्रामीण भागात विरळच होती. महाराष्ट्रात पुणे ही त्यांची राजधानी. तेथे त्यांचे प्रमाण जास्तीत जास्त म्हणजेसुद्धा पाच सहा टक्क्यांवर कधी नव्हते. तालुक्याच्या गावाला ब्राह्मणवस्तीत पाचदहा घरे असायची. सज्जाच्या गांवचे एखादे घर आसपासच्या पाचदहा गावांची भिक्षुकी सांभाळायचे.

 आर्य हे मुळात बाहेरून आलेले या जोतीबांच्या विधानाबद्दल आता कोणी फारसा वाद घालत नाही. मूळस्थान कोणते, इराण, पूर्व युरोप का उत्तर ध्रुव याबद्दल चर्चा असली तरी ते बाहेरून आले याबद्दल आता वाद नाही. खरे म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा पुरावा शोधायला कागदपत्रे तपासण्याची आवश्यकता नाही. बाहेरून आलेल्या टोळ्या देशाच्या खोलवर कानाकोपऱ्यात लहान लहान वाड्या वस्त्यांपर्यंत पोचत नाहीत.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ११६