पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/13

हे पान प्रमाणित केलेले आहे.



 इतिहास-राजांचा आणि शेतकऱ्यांचा


 शिवाजी महाराजांचा आणि तत्कालीन रयतेचा -शेतकऱ्यांचा इतिहास याचे इतिहासातील इतर कालखंडांपेक्षा एक देदीप्यामान वेगळेपण आहे. हा राजाच्या धाडसी पराक्रमाचा इतिहास आहे, रयतेचा राजासाठी बलिदान करण्याची तयारी दाखवण्याचा इतिहास आहे, राजावरील आक्रमण म्हणजे आपल्या घरादारावरील आक्रमण असे रयतेने प्रत्यक्ष समजून वागण्याचा इतिहास आहे. रयतेसाठी लष्करी पराभव स्वीकारणाऱ्या राजाचा इतिहास आहे. राजा- रयत, शासन-शेतकरी यांच्या परस्पर सौहार्दपूर्ण संबंधांचा इतिहास आहे.

 शिवाजी महाराज आणि त्यांची रयत यांच्या इतिहासाचे देदीप्यमान वेगळेपण समजण्यासाठी महाराष्ट्रातील आधीच्या इतिहासाची नोंद घेणे आवश्यक आहे. या इतिहासात राजा-रयत संबंधांची माहिती फारच कमी आहे.

 शेतीतून अतिरिक्त धान्य निर्माण झाले तरच दुसरा कोणी बिगरशेतीचे व्यवसाय करू शकतो. बिगरशेतीचे व्यवसाय म्हणजे त्या काळी गावोगावची बलुतेदारीची कामे, उद्योगधंदे व्यापार, किल्ले बांधणे, गढ्या बांधणे, लढाया इ.इ.इतर सर्व व्यवसायांचा जन्म शेतीतून निघालेल्या धान्याच्या मुठीतून होतो. पण इतिहास लिहिला गेला तो शेतीबाहेरील घडामोडींचाच. शेतीतून निर्माण होणाऱ्या संपत्तीच्या लुटालुटीचा, गुलामगिरीचा, वेठबिगारीचा, लुटणाऱ्या दरोडोखोरांचा,राजांचा, लुटलेल्या संपत्तीच्या कैफाचा, अवतीभवती जमणाऱ्या भाटांचा, पुरोहितांचा, नर्तक- नर्तकींचा आणि संस्कृती संस्कृती म्हणून ऊर बडविणाऱ्यांचा. या सगळ्या डोलाऱ्यात गाडीत गेलेली धनधान्य संपत्ती आली कुठून, जमा कशी झाली याचा विचार इतिहासकारांनी टाळला. संपत्तीमुळे खरेदी केले गेलेले तंत्रज्ञान, विकसित झालेले तंत्रज्ञान, कलाकुसार इ. गोष्टी संपत्ती निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की नाही याची इतिहासकारांनी दखल घेतली नाही. या गोष्टी पोहोचल्या तर नाहीचत पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या याची जाणीवही नाही. इतिहास व बखरी लिहिणारे शेतकरी समाजातले नव्हते. शेतीच्या लुटीवर पोसल्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १०