पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/134

हे पान प्रमाणित केलेले आहे.


 ठरावांतील शेकाप


 म्युनिस्ट पक्षाच्या धर्तीवर शेकापही प्रत्येक अधिवेशनात विस्तृत ठराव करतो. प्रचलित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा या ठरावांत घेण्यात येतो. विविध घटनांचा अर्थ मार्क्स-लेनिनवादाच्या प्रकाशात लावण्याचा प्रयत्न होतो. पक्षाच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा आखण्यात येतो.
 इंग्रजी सत्तेचा अंत उंबरठ्यावर येऊन ठेपला असता,
 आलेल्या सत्तेचा उपयोग शेतकरी, कामकरी यांच्या अधिकाधिक फायद्यासाठी करून, अखेर त्या सत्तेचा परिपाक शेतकरी कामकरी राज्यात होणे अत्यंत जरूर आहे व अशा तऱ्हेची घोषणा काँग्रसने केली आहे. सदर घोषणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.

 परंतु भांडवलदार, जमीनदार वगैरे वर्ग आलेली सत्ता स्वत:चे हितासाठीच वापरतील या भीतीपोटी,

 शेतकरी व कामगार यांची वर्गनिष्ठ संघटना करून शेतकरी कामकरी यांचे राज्य स्थापण्याच्या घोषणेस शक्य तितक्या लवकर मूर्त स्वरूप येण्यासाठी...

 काँग्रेसच्या अंतर्गत एक कार्यकर्त्यांचा संच स्थापन करण्यात आला. (आळंदी, ३ ऑगस्ट १९४७.)

 काँग्रेसच्या घोषणांवरील विश्वास आठच महिन्यांत संपुष्टात आला आणि काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. (मुंबई, २६ एप्रिल १९४८)

 नवीन पक्षाचे स्वरूप मार्क्सवादी. मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान लाखो श्रमजीवी जनतेपर्यंत पोचवण्याचे काम शेकापने अंगावर घेतले, तरी पक्षाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र हे सुरुवातीसच स्पष्ट करण्यात आले.

 महाराष्ट्रातील कामगार शेतकऱ्यांची परंपरा क्रांतिकारक व साम्राज्यशाहीविरोधी असल्याने... संयुक्त महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा हा पक्ष आहे. (दाभाडी)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १२७