पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/154

हे पान प्रमाणित केलेले आहे.

होता. त्याने प्रत्यक्ष शेतीउत्पादन वाढवण्याकरिता शेतकऱ्यांना साहाय्य करण्याचा मार्ग मान्य केला; पण वाढीव उत्पादन शेतकऱ्यांच्या हातून काढून घेताना कामगारवर्गाने सर्व शेतकरी सारखे लेखू नयेत, शेतमजूर व शेतमालक यांत फरक केला पाहिजे. पहिला भाऊ आहे, दोस्त आहे; दुसरा नफेखोर, भांडवलदारांचा साथी आहे, भुकेलेल्या कामगारांचा शोषक आहे असा श्लेष साधून ठेवला. शेतीत सुधारणा करून, उत्पादन वाढवणाऱ्या व योग्य किमतीत शासनाला भरपूर धान्यपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याशी कामगारवर्गाने दोस्ती केली पाहिजे असे धोरण आखले.

 योग्य किंमत म्हणजे कोणती यासंबंधी एक मोठा वादविवाद झाला. प्रिओब्राझेन्स्की, बुखारीन हे या वादातील अध्वर्यु.

 प्रिओब्राझेस्कीचे एक कौतुक सांगावयास पाहिजे. शेतीमालाला अपुरा भाव देऊन कारखानदारीचा विकास साधण्याच्या तंत्राचा त्याच्याइतका खुलेआम पुरस्कार दुसऱ्या कोणीच केला नाही. तो प्रामाणिक होता. बाकीच्यांना शेतकऱ्यांना लुटण्याचे त्यांचे धोरण छातीठोकपणे सांगण्याचेही धाडस झाले नाही.

 प्रिओब्राझेन्स्की म्हणतो: समाजवादी भांडवलनिर्मिती झपाट्याने होण्यासाठी, शेतीमालाला शासनाने कमीत कमी किंमत दिली पाहिजे आणि कारखानदारी माल महागात महाग किमतीस विकला पाहिजे. शेतीमालाच्या बाजारपेठेत जाणूनबुजून दीड दांडीचा तराजू वापरण्याच्या धोरणाचा त्याने आग्रह धरला.

 त्याचा प्रबंध प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात आली, तरी त्याला अधिकृत मान्यता मिळाली नाही. प्रिओब्राझेन्स्की हळूहळू मागे पडू लागला आणि १९३७ मध्ये त्याला स्टॅलिनच्या हुकुमावरून ठार करण्यात आले.

 त्याचा गुन्हा एवढाच होता, की प्रचलित व्यवस्थेला शेतकऱ्यांच्या रक्ताची आवश्यकता आहे हे त्याने खुलेपणे सांगितले. त्याच्या वधाआधी आठ वर्षे म्हणजे १९२९ पासून त्याने पुरस्कार केले, ते धोरण स्टॅलिन प्रत्यक्ष अमलात आणत होता.

 शेतकऱ्याचे मोठेछोटे भेद पाडण्याचा डाव १९२९ पर्यंत यशस्वी झाला होता. आतापर्यंत शेतकऱ्यावर जाणूनबुजून अन्याय करण्याच्या धोरणाला त्याने विरोध केलेला होता; पण आता परिस्थिती अनुकूल झाली आहे असे पाहताच त्याने शेतकऱ्यांविरुद्ध आघाडी उभारली. मोठ्या शेतकऱ्यांचे शिरकाण रणगाड्याच्या मदतीने झाले. उरलेल्या छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सामुदायिक शेतीत रूपांतर झाले. मार्क्सच्या स्वप्नाप्रमाणे सामुदायिक आणि आधुनिक शेतीची प्रतिष्ठापना झाली; पण आजही रशिया अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकला नाही.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १४७