शीखच होते, चंडीगढमध्ये राजभवनावर, कोणीही धडा गिरवावा इतके शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण पिकेटिंग केले. इतके, की त्याची झळ पाहोचलेल्या चंडीगढच्या नागरिकांना आपल्या या नव्या पाहुण्यांची सरबराई करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मे ८४ च्या पहिल्या आठवड्यात भारतीय किसान युनियनने शेतीमालाला उत्पादनखर्चावर रास्त भाव मिळवणे आणि कृषिमूल्य आयोग बरखास्त करणे या मागण्यांसाठी 'बहू मंड्या'वर जो अद्वितीय बहिष्कार टाकला; त्यामुळे या काळात गव्हाचा एक दाणासुद्धा बाजारात आला नाही.
स्वत: महात्माजींनी उभारलेल्या कोणत्याही चळवळीपेक्षा काकणभर सरस अशा या आदर्श चळवळीची दखल घेण्यास मात्र सरकार तयार नाही. भारतीय किसान युनियनच्या निवेदनांची पाहोचसुद्धा देत नाही, मग वाटाघाटी तर दूरच. धर्मनिरपेक्ष, अ-राजकीय, शांततामय आणि अर्थशास्त्रीय स्वरूप असलेल्या; पण गैरसोयीच्या या किसान चळवळीच्या अस्तित्वाकडे शासन काणाडोळा करू पाहते आणि अधिक सोईस्करपणे हाताळता येतील अशा आंदोलनांवर मात्र भडक प्रकाशझोत टाकते. संपूर्ण देशावर भविष्यकाळात याचे काय परिणाम होतील याची शासनाला तमा नाही. राज्यकर्त्यांनी खरेतर ते ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्यांचे आर्थिक हितसंबंध जपणे आवश्यक आहे; पण इथे पुन्हा एकदा 'मोपल्या'ना त्यांना स्वीकारण्यास उत्सुक असलेल्या 'मुल्लां'च्या हाती जाणे भाग पाडले जात आहे.
७. उद्योगधंद्यांसाठी लागणारे भांडवल जमा करण्यासाठी मुख्यत्वे शेतीमालाच्या किमती कमी ठेवून वरकड उत्पन्न निर्माण करणारे शासनाचे आर्थिक विकासाचे जे धोरण आहे तेच पंजाबमधील असंतोषाचे मूळ कारण आहे. पंजाबमधील असंतोष हे केवळ इंडिया-भारत दरीचे पूर्णपणे प्रतिबिंब आहे.
उज्ज्वल हरितक्रांती आणि टिमक्या वाजवून नावाजलेली पंजाबी शेतकऱ्यांची समृद्धी विस्मृतीत गडप झालेली आहे. श्री. मुल्कराज आनंद यांनीसुद्धा आता मान्य केले आहे, की शीख शेतकऱ्यांपैकी एक तृतीयांश शेतकरी 'दारिद्र्य रेषेखाली' जगत आहेत. पंजाबने शेतीउत्पादनात निश्चित आघाडी मिळविली आहे; आधुनिक तंत्र आत्मसात केले आहे. खते, कीटकनाशके वगैरेंचा पुरेपूर वापर केला आहे. शासनाने त्यांना ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक मोटार, पंपसेट इत्यादी घेण्याकरिता सुलभ कर्जाची सोय केलेली आहे. त्यामुळेच आधीच कष्टाळू असलेला पंजाबी शेतकरी आनंदी आणि कृतज्ञ झाला आणि गेल्या २० वर्षांच्या काळात त्याने देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले.
पण आता जाणिवा जाग्या झाल्या आहेत आणि हरितक्रांतीचे अर्थशास्त्रीय