पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/187

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आजपर्यंत शेतकरी संघटनेमध्ये मला जो अनुभव आला त्यावरून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, की या देशातील सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेही जातीयवाद नाही, भाषावाद नाही, धर्मवाद नाही. हे सर्व क्षुद्रवाद स्वार्थी राजकारण्यांनी केवळ जोपासून ठेवले आहेत. सर्वसामान्य माणसे अर्थवादाच्या पायावर आवाज उठवू लागली, की ही मंडळी क्षुद्रवादाची भुतावळ उठवून त्यांना अर्थवादापासून दूर नेतात.

 देशातली गरिबी हटली, देशाचा विकास होत राहिला तर यांपैकी एकही भांडण झालं नसतं. आपल्या देशातलं एक राज्य म्हणतं, की आम्हाला फुटून जायचं आहे. अमेरिकेतलं एखादं संस्थान असं म्हणतं का? मुळीच नाही. तिथेसुद्धा अनेक धर्मांची, पंथांची माणसं आहेत; अनेक राज्यांची आहेत; पण तिथं असं कुणी म्हणत नाही. उलट अमेरिकेतील संस्थान असणं ही प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट समजली जाते. अशी भावना आपल्याकडे निर्माणच होऊ शकली नाही कारण आम्ही गरिबी हटवू शकलो नाही.

 (डिसेंबर १९८४ लोकसभा निवडणुका, शेतकरी संघटनेची भूमिका, शेतकरी संघटक, १४ डिसेंबर १९८४)


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १७८