पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/189

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमच्या सर्वांचे नेते म्हणून ते ही निवडणूक लढवणार आहेत. शेतकरी संघटनेने त्यांना फक्त उभे केले असे नव्हे तर संघटनेचे सर्व कार्यकर्ते आपली ताकद पणाला लावून या निवडणुकीत काम करणार आहेत.

 शेतकरी संघटना राजकीय पक्ष नाही. निवडणुकीत संघटनेला स्वारस्य नाही. मग आम्ही प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची भूमिका का घेत आहोत? सत्तेच्या खुर्चीत कुणीही जाऊन बसला तरी तो गरिबांचे प्रश्न सोडवू शकत नाही. फार तर तो काहीतरी थातुरमातुर सुधारणा करून अगदी स्वत:ला आपल्या प्रदेशाचा 'शिल्पकार' म्हणवून घेऊ शकेल. अशा शिल्पकारांचा देशात तोटा नाही. कोणी साताऱ्याचे शिल्पकार, कोणी सांगलीचा, तर कोणी विदर्भाचा, कोणी मराठवाड्याचा, कोणी महाराष्ट्राचा, तर कोणी भारताचा शिल्पकार म्हणवला जाऊ लागला; पण गरीब गरीबच राहिले. शेतकरी कर्जात बुडतच राहिले. गरीब अन्नाला मोतादच राहिले. मायबहिणींना अंगभर वस्त्राचीही व्यवस्था झाली नाही आणि सगळेच जण वर्षानुवर्षे पावसाने जरा डोळे वटारले, की खडी फोडायला जात राहिले.

 मुंबईला गेलेला कुणी आमदार, दिल्लीला गेलेला कुणी खासदार, कुणी मुख्यमंत्री, कुणी केंद्रीय मंत्री, फार काय अगदी कुणी पंतप्रधानसुद्धा गरिबी हटवेल यावर शेतकरी संघटनेचा यत्किंचितही विश्वास नाही. निवडून गेलेला प्रत्येकजण गरिबांना लुटणाऱ्यांच्या जाळ्यात सापडतो. काही जण त्यांनाच सामील होतात. काही हतबल होऊन जातात. दिल्लीत किंवा मुंबईला गेलेला कोणीही आमची सुटका करणार नाही. त्यासाठी सर्व गरिबांना, सर्व श्रमिकांना, सर्व शोषितांना, सर्व दलितांना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे. आपण घाम गाळतो. त्या घामाचे दाम हराम छिणावून नेतात. आपल्या घामाचे दाम मिळावे याकरिता आपल्याला लढावे लागणार आहे आणि आपण लढत आहोत.

 मग निवडणुकांचा उपयोग काय ? पाच वर्षे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगाव वणवण फिरायचे, संघटना बांधायची, आंदोलनात उतरायचे, लाठ्या खायच्या, तुरुंगात जायचे, गोळ्या खायच्या आणि पाव वर्षानंतर निवडणुका आल्या म्हणजे त्यांनी घरी जाऊन बसायचे आणि पक्षापक्षाच्या, इतका वेळ लपून राहिलेल्या पुढाऱ्यांनी वटवाघळाप्रमाणे निवडणूक आली, की बाहेर पडायचे असे संघटनेला अपेक्षित आहे काय? अर्थातच नाही. हे तर सत्ताधाऱ्यांना फारच सोयीचे होईल. ते म्हणतील, हे बरे आहे. पाच वर्षे या वेड्यांना धावू द्या. पोलिसांकरवी आपण त्यांना कापून काढू, निवडणुकीतही काही जात नाही. आपली सत्तेची खुर्ची कायम ती कायम. भले चालू द्या यांची संघटना आणि भले चालू द्या यांचे आंदोलन !

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १८०