पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/198

हे पान प्रमाणित केलेले आहे.





 मीरतची दंगल


 त्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्याचे मी दोन महिन्यांपासून कबूल केले होते. त्यासाठी तेवीस मे रोजी दिल्लीला येऊन पाहोचलो. दिल्लीतील सगळी वर्तमानपत्रे मीरत शहरातील दंग्याच्या बातम्यांनी आणि फोटोंनी भरून गेली होती. खुद्द जुन्या दिल्लीतच दंगा थंडावला असला तरी संचारबंदी कायमच होती.
 प्रशिक्षण शिबिर गंगेच्या काठी शुक्रताल या गावी भरायचे होते. दिल्लीपासून जवळजवळ दीडशे कि.मी. दूर; पण रस्ता मीरतमार्गेच जाणारा. 'मानुषी' च्या संपादिका मधु कीश्वर यांनी एवढ्या दंग्याच्या धुमाळीतही त्यांची कामगिरी बजावली होती. त्याबद्दलचा त्यांचा लेख शेतकरी संघटकमध्ये येऊन गेलाच आहे. मीरतमध्ये दंगे आणि हिंसाचार लोक करीत नाहीत, गुंडही करीत नाहीत तर तेथील सशस्त्र पोलिस दलाचे सैनिकच करताहेत ही बातमी त्यांनी मला पहिल्यांदा सांगितली. मलियाना येथे तर मुसलमान वस्तीत पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. एका ठिकाणी स्त्रिया आणि मुले वस्तीत घुसणाऱ्या पोलिसांच्या वाटेत येवून थांबली कारण पोलिस घराघरातून जाऊन पुरुष मंडळींना ठोकून काढीत होते किंवा ठार करीत होते. पोलिसांनी गाड्या थांबविल्यासुद्धा नाहीत. त्यांच्या गाडीखाली एक लहान मुलगी व तिची आई चेंगरली गेली.

 स्त्रिया आणि मुले यांना मारून पेटवून दिल्याची कल्पनातीत क्रूर घटना प्रत्यक्षात घडली. या गावाजवळून जाणाऱ्या कालव्यातूनच मुळी चोपन्न प्रेते काढण्यात आली. बाहेर न काढता वाहत गेलेल्या प्रेतांची संख्या किती असेल कुणास ठाऊक. सशस्त्र दलाच्या पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या बातम्या आता सगळ्या वर्तमानपत्रांत येऊन गेल्या आहेत. त्य कुणी नाकारणार नाही. सशस्त्र दलाच्या प्रमुखाला बडतर्फ करण्यात आले आहे. मलियाना येथे घडलेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी आता राज्य मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली आहे.

 ज्या वेळी प्रत्यक्षात या पाशवी अत्याचारांचे थैमान चालले होते त्या वेळी शुक्रतालला शिबिरातील कार्यकर्त्यांबरोबर बातम्या ऐकण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १८९