सापडले आहे.
पण ह्यांचा धोका आपल्याला आहे. गेली दहा वर्षे अत्यंत कष्टात माणसाला माणूस म्हणून ओळखायला आपण शिकवलं. हिंदू असो, मुसलमान असो दोघांच्या पोटातील भुकेची कळ एकच आहे. मुसलमानांची भूक काही वेगळी नाही, हरिजनांची भूक काही वेगळी नाही असं म्हणून एका अर्थवादी पायावरती आपण सर्व समाजाला शोषकाच्या विरुद्ध उभं करण्याचं ठरविलं आणि पुष्कळ मोठं यश मिळालं; पण हे यश पाहून, हे फोडायचं झालं तर कसं फोडायचं? या सगळ्या लोकांना आर्थिक उत्तरे कुणी द्यायची? नुसतं शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यायला आमचा पाठिंबा आहे असं म्हणूनही भागत नाही तर तुम्हाला उभंआडवं फोडलं पाहिजे म्हणून धर्मवादी येणार आहेत. म्हणून जातीयवादी गिधाडं येणार आहेत. भगव्या रंगाची येणार आहेत. गावामधल्या सगळ्या शेतकरी कार्यकर्त्यांनी फक्त एक गोष्ट करावी. तुमचा काय प्रश्न असेल तो मांडा, या प्रश्नाचे आर्थिक रूप काय आहे ते आम्ही सांगतो; पण जर तुम्ही आम्हाला सांगू लागलात की अमका अमका माणूस वाईट आहे कारण तो मुसलमान आईच्या पोटी जन्माला आला, अमुक अमुक माणूस वाईट आहे कारण तो शीख आईबापांच्या पोटी जन्माला आला आहे, तर अशा माणसाला आमच्या गावात थारासुद्धा नाही. हे तुम्ही ठरवलं, तर तुमचं आंदोलन यशस्वी होणार आहे.
हा मुद्दा मी एवढ्याकरिता मांडला, की राजकीय समतोलाचा प्रश्न काही इतका सोपा नाही. नेहमीसारखं एक विरुद्ध दोन इतकं साधं समीकरण नाही. जर समजा या वेळी एखादं जातीयवादी संघटन पुढे आलं, तर व ते 'छोटा चोर' झालं तर? 'छोटा चोर' झाला म्हणून तुम्ही जातीयवादी संघटनेला पाठिंबा दिला तर ते विष प्यायल्यासारखं आहे. समतोलाचा अर्थ हा असा ८९ साली फार वेगळ्या तऱ्हेनं, फार वेगळ्या संदर्भात लावावा लागणार आहे.
(शेतकरी संघटक,६ एप्रिल १९८९)