पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/23

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पगारी सैन्याच्या आधारावर आक्रमण थोपवणे अशक्य होणे स्वाभाविकच आहे.

 यादवांचा पाडाव झाला. नंतर महंमद तुघलकाने राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि नंतर बरीच वर्षे महाराष्ट्रावर पहिल्यांदा बहामनी आणि नंतर आदिलशाही, निजामशाही मुसलमान सत्ताधीशांची सत्ता राहिली. बहामनी राजाच्या सुमारे अठरा सुलतानांतले सात आठजण तर घातपातात ठार झाले. आंधळे झाले, पांगळे झाले. दरबारी कारस्थानांना बळी पडले. उरलेल्यांतील चार-पाच बहामनी सुलतानांनी शेतीभातीची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण त्याचबरोबर हजारहजार लोकांच्या कत्तली करून दहशत बसवणेही चालू ठेवले होते. बहामनी राज्य फुटून त्याच्या पाच सुलतानशाह्या झाल्या. त्यावेळी मात्र मराठा जहागीरदार वतनदारांचा उपयोग सुलतानांनी सुरू केला. थेट प्रजेला लुटायचे काम वतनदार जहागीरदारांनी करायचे, त्यांच्याकडून लुटीचा काही भाग सुलतानांनी वसूल करायचा आणि आपल्या युद्धासाठी जहागीरदार, वतनदारांनी पदरी बाळगलेले सैन्य वापरायचे अशी लुटीची उतरंडीची व्यवस्था सुलतानांनी राबवायला सुरूवात केली. यातून वतनदार जहागीरदार शिरजोर तर झालेच, पण सरशी होणाऱ्या सुलतानाकडे तातडीने जायच्या वृत्तीमुळे प्रजेचीही वाताहत सुरू झाली.

 हिंदू राजाची सत्ता जाऊन मुसलमानी सत्ता महाराष्ट्रावर आली. स्थिर झाली याची कारणमीमांसा अनेकांनी केली आहे. 'राधामाधव विलास चंपू'च्या प्रस्तावनेत इतिहासकार राजवाडे म्हणतात,

 "हिंदू राजवटीतील महाराष्ट्र संस्कृतीची व्याप्ती अत्यल्प ब्राह्माणांपुरती आणि उत्तरेकडील क्षत्रियांपुरती होती. बहुसंख्य नागवंशी आदी मराठे अत्यंत मागासलेले असून त्यांच्यात राष्ट्रभावनेचा उदय झालेला नसल्यामुळे ते अभिमानाने लढण्यास पुढे येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे अल्पसंख्य आर्य क्षत्रियांचा पराभव होताच महाराष्ट्रात मुसलमानी झाली."

 राज्यकर्ते क्षत्रिय आणि त्यांच्या आश्रयाने 'नागवंशीय आदी मराठा शेतकऱ्यांच्या' लुटीत सहभागी होणारे आर्य ब्राह्मण यांच्या बाजूने अभिमानाने लढायला शेतकरी तयार होतील ही अपेक्षा करणेच वास्तविक चूक ठरेल.

 इतिहासकार शेजवलकरांनी राष्ट्रीयतेचा अभावाचे विश्लेषण अधिक शास्त्रीयतेने केले आहे.

 "एतद्देशीय अल्पसंख्याक ब्राह्मण क्षत्रियांना इतर आडमुठ्यांच्या साहाय्याने स्वातंत्र्य का टिकवता येऊ नये? तर त्यांच्या सामाजिक उच्चनीचतेच्या मूर्ख

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख /२०