पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/26

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत या भावनेने पोरे होण्यासाठीसुद्धा नवस त्यांचेच होऊ लागले आणि मुलांच्या नावात बाजीराव, हिम्मतराव, जानराव सर्रास आढळू लागले.

 मुसलमानी सत्तेच्या लाटेस तोंड देण्याचे जे काही किरकोळ प्रयत्न झाले ते समूळ मोडून काढण्यात आले. इ.स.१४७२ पर्यंत महाराष्ट्रात प्रतिकार करणारी संघटित शक्ती शिल्लकच राहिली नाही. या नंतरचा महाराष्ट्राचा सगळा इतिहास हा बहामनी राज्यांच्या मोडतोडीचा आणि विजयनगरच्या वैभवाचा. तालीकोटाच्या लढाईनंतर तर सर्वच आशा संपल्या आणि नामदेवाच्या म्हणण्याप्रमाणे कलियुगाचा अंत होईल तेव्हा कलंकी अवतारच म्लेंच्छांना नष्ट करेल, तोपर्यंत हरिनाम घेण्यापलीकडे पर्याय नाही अशी अगदी भल्याभल्यांची धारणा झाली होती.

 यानंतरचा इतिहास हा प्रामुख्याने मोगल सुलतानांच्या आपापसातील लढायांचा आहे. बहामनी राज्याचे तुकडे झाले; त्यांच्यातील लढायांचा शेवट म्हणून फक्त आदिलशाही व निजामशाहीच काय ती उरली आणि त्याचवेळी दिल्लीतील मोगल सत्ता स्थिर होऊन तिने दक्षिणेकडे नजर फिरवली आणि सहधर्मीय पातशाह्यांवर आक्रमण चालू केले. दिल्लीच्या आक्रमणाला तोंड देणे आदिलशहास व निजामशहास दोनशे वर्षांपूवी रामदेवरायास जितके कठीण गेले तितकेच कठीण वाटू लागले. अशा परिस्थितीत धर्माभिमान वगैरे बाजूला ठेवावा लागतो. दक्षिणेतील सुलतानांनी मराठे सरदारांना आपल्या पदरी ठेवून घेण्यास, एवढेच नव्हे तर त्यांना दरबारात मानमरातबाच्या जागा देण्यासही सुरूवात केली. मराठ्यांच्या अभ्युदयाला सुरूवात झाली ती उत्तरेतील मोगल आणि दक्षिणेतील सुलतानशाह्या यांच्यातील स्पर्धांच्या युद्धांमुळे.

 संतांची कामगिरी

 मुसलमानी आक्रमणाखाली अनेक देश भरडले गेले. स्पेनसारख्या देशात मुसलमानांचा पराभव झाला. आर्मेनियासारख्या देशात मुसलमानी आक्रमकांशी स्थानिक जनतेने सतत तीव्र संघर्ष केला आणि त्यांना तुर्कस्थानात परत जाण्यास भाग पाडले. याच्या अगदी उलट्या टोकाला मलाया, इंडोनेशियासारखे देश ! या देशात मुसलमानी आक्रमणपूर्व संस्कृती नामशेष झाल्या. या देशांप्रमाणेच महाराष्ट्रही मुसलमानी आक्रमणाच्या पहिल्या धक्क्यामुळे कोसळला.पण ३०० वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर त्यातून बाहेर पडला ही एक विशेषच घटना आहे. या काळात पराभूत झालेले,उपासमारीने, दुष्काळाने दुःखाने गांजलेले लोक काय विचार करीत होते? आपल्या डोळ्यासमोर घरच्या मायबहिणींनाओढून नेत असताना हताशपणे पाहण्याची ज्यांच्यावर पाळी आली त्या लोकांनी मनात काय विचार आणला असेल? ३०० वर्षांपर्यंत हा समाज सुप्तावस्थेत गाडला गेला होता.३०० वर्षांनी तो त्यातून बाहेर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / २३