पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुकारामासारख्या वैरागी संताची प्रतिक्रिया अभंगात लिहिली गेली.

 बाईल मेली मुक्त झाले । देवी माया सोडविली ॥
 पोर मेले बरे झाले । देवे मायाविरहित केले॥
 माता मेली मजदेखता । दु:खात मना पळाली चिंता ॥
 बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरे या दुष्काळे पिडा गेली ॥
 बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोगे गुरे ॥

 पण संसारी गृहस्थांच्या मनात आपली पोरेबाळे आणि बायामाणसे डोळ्यासमोर भुकेने पटापट प्राण सोडताना पाहून काय आगीचा डोंब उसळला असेल याची कल्पनादेखील कठीण आहे.

 समर्थ रामदास याच काळात महाराष्ट्रात लोकदर्शनासाठी संचार करीत होते. त्यांनी या काळात महाराष्ट्राच्या परिस्थितीचे केलेले वर्णन असे-

 किती येक छंद ते छंद ना बंद नाही। किती येक बेबंद ते ठायि ठायी।
 किती येक ते धान्य लुटूनि नेती। किती येक ते पेव खणोनि नेती ॥
 किती येक ते पूरिले अर्थ नेति । किती पूरिलीं सर्व पात्रेचि नेती ॥
 किती येक ते प्राण कर्णेचि घेती। किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टवीती॥

 अशा परिस्थितीत त्या वेळेचे समाजधुरीण कसे वागत होते हे पाहण्यासारखे आहे. विद्वान पंडितराज जगन्नाथ हे शहाजहान राजाचा आश्रयाने होते. त्यांना जयपूरच्या हिंदू राजाने आपल्या राजसभेचे भूषण होण्यासाठी बोलाविले असता त्याला त्यांनी उत्तर दिले.

 दिल्लोश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान् पुरवितुं समर्थः
 अन्यैनृपालैः परिदीयमानं शाकाय वा स्थल्लवणाय वा स्थान

 (माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर व जगदीश्वर या दोघांच्यातच आहे. बाकि राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठमिरचीला पुरण्याइतपतच राहील.)

 पंडितराज जगन्नाथांसारख्या विद्वान माणसाची ही अवस्था, तर महाराष्ट्रातील किरकोळ पंडितांच्या अधिपत्याखालील धार्मिक संस्था तर पार रसातळालाच बुडाल्या होत्या. धर्माचा किंवा धार्मिक संस्थाचा सामान्य रयतेला आधार वाटावा अशी परिस्थितीच शिल्लक राहिली नव्हती. धार्मिक संस्थांवरील आपला हक्क ब्राह्मण लोकही वतनदार देशमुखांप्रमाणेच बादशहाकडून सही शिक्का आणून मिळवीत. धार्मिक संस्थाचे उत्पन्न कोणी घ्यायचे? यावर हक्क कोणाचा? यासाठी त्या काळातील तथाकथित विद्वान समाजधुरीण आपापसात भांडत आणि हे भांडण सोडविण्यासाठी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / २९