पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/36

हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतिहासाने शिवाजीराजाकडून करून घेतले.

 मराठ्यांचा अभ्युदय

 १६ व्या शतकाच्या शेवटी मोगलांची धास्ती तयार झाल्यापासून दक्षिणेत सुलतानांनी मराठी माणसांना आश्रय व मान देण्यास सुरूवात केली. या वेळेपर्यंत सुलतानांच्या दरबारातील वजिरांपासून मनसबदारापंत सगळेजण सतत कट कारस्थानात गुंतलेले असत कधी सुलतानाची मर्जी सांभाळण्याकरिता, कधी सुलतानाला गादीवरून उठवून लावण्याकरिता, कधी दरबारातील दुसऱ्या मानकऱ्यांचा पाडाव करण्याकरिता, कधी आपल्या मर्जीतील सरदारांना मोठे करण्याकरिता कारस्थाने आणि लढाया सतत चालू असत. सुलतानांनाही कधी दरबारातील एका पक्षाकडे तर कधी दुसऱ्या पक्षाकडे झुकावे लागे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. मुसलमान सरदारांबरोबर महाराष्ट्रात घोरपडे,घाटगे, निंबाळकर, जाधव, भोसले इत्यादी घराणी बारगिरांचा फौजफाटा बाळगून नावारूपास येऊ लागली. दरबारातून मनसबदारी मिळवावी. आपले सैन्य बाळगावे, सरकारदरबारात सारा भरावा, दरबारच्या अधिकाऱ्याशी आणि जवळच्या कील्लेदारांशी लाचारी करावी म्हणजे आपल्या मुलखात आपल्याला सार्वभौम राजाप्रमाणे बेबंद वागता येते हे त्यांना पुरतेपणी कळले होते. आपल्या वतनांपलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या वतनातूनही लुटमार करावी अशी त्यांची प्रवृत्ती यामुळे रयतेचे जीवन पुन्हा एकदा मोठे कठीण होऊन गेले. देवगिरीपूर्व काळातील जुलमातून आणि लुटीतून मुसलमान आल्यामुळे जी काही मुक्तता झाली होती ती संपुष्टात आली आणि शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा एकदा अत्यंत दुःसह झाले.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ३३