पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/38

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यानंतर शहाजीराजांकडे ती पुढे चालवण्यात आली. शहाजीराजांनी नौकऱ्या बदलल्या तरीही ती जहागिरी भोसल्यांकडेच राहिलेली दिसते. शहाजीराजांच्या जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेव पूर्वीपासूनच बघत असावेत; परंतु शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची दहा-बारा वर्षे या जहागिरीतील लोकांनी अतोनात हाल सोसले. शहाजी राजांनी विजापूरकरांशी पुकारलेल्या बंडामुळे आणि सरदार रायाराव यांनी केलेल्या वाताहतीमुळे सुपे व पुणे परगण्यातील या जहागिरीतील रयतेचे अतोनात हाल झाले होते. यापूर्वीही भोसले जरी जहागीरदार असले तरी त्यांचे वास्तव्य जहागिरीत नव्हतेच. शिवाजीराजे आणि जिजाबाई हे प्रथमच स्वत:च्या जहागिरीत राहायला आले. ही त्याकाळी दुर्मिळ घटना होती. जिजाबाईसोबत दादोजी कोंडदेवासारखा प्रशासकही होता. गेल्या दहा-बारा वर्षाच्या हालांच्या पार्श्वभूमीवर प्रजाहितदक्ष राजा रयतेची कशी सुव्यवस्था ठेवू शकतो याचे प्रात्यक्षिकच दादोजीने रयतेला दाखवून दिले. आजूबाजूच्या वतनातील पिचत राहणाऱ्या रयतेला आपल्या नातेवाईकांकडून जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांनी नव्याने सुरू केलेल्या कामाच्या बातम्याही समजत असतीलच. रयतेच्या दहा- बारा वर्षाच्या वाताहतीच्या आधी निजामशहाचा वजीर मलिकअंबर याने महसुलाची एक व्यवस्था लावून दिली होती. व्यवस्थेचे नियम करणे वेगळे आणि ते प्रत्यक्ष अमलात आणणे वेगळे-कारण महसुलाचे नियम अमलात आणण्याचे काम वतनदारच करत असत. परंतु मलिकअंबरने स्वीकारलेल्या पद्धतीचा 'धारा' शेतकऱ्यांना व त्यातल्यात्यात पुणे आणि सुपे परगण्यातील शेतकऱ्यांना त्याचा जाच नव्हता कदाचित त्याचे श्रेय दादोजी कोंडदेवांनाच द्यावे लागेल. दहा-बारा वर्षाच्या वाताहतीनंतर दादाजी कोंडदेवांना हीच 'धारा' पद्धत जहागिरीत बसवायची होती. परंतु सततच्या दुष्काळामुळे रयतेची स्थिती तेवढा वसूल देण्याइतकि अजिबात नव्हती.

 सततच्या स्वाऱ्यांमुळे पुणे प्रांत ओसाड पडला होता. चांगल्या सूपीक जमिनीमध्ये मशागतीच्या अभावी भर शेतात किर्र झाडी माजली होती. वाघ, चित्ते, रानडुक्कर, कोल्हे, तरस, लांडगे हेच माणसांच्या जागी राज्य करीत होते. दादोजींनी ओसाड गावाचे पाटील, देशकुलकर्णी, चौधरी, चौगुले यांना पुण्यात बोलावून घेतले.त्यांची तक्रार ऐकून घेतली, अभय देऊन वसाहत उभी करण्याचे आवाहन केले. गावे वसवा, कुस घाला, देव मांडा, तुमची फिर्याद ऐकावयास धाकटे राजे येथेच आहेत असा दिलासा दिला. दादोजींच्या दिलाशाच्या शब्दांनी हळूहळू गावे उभी राहू लागली. मुक्त हस्ते तगाई कर्ज वाटली. शेतीस उत्तेजन दिले.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ३५