पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/39

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जहागिरीची व्यवस्था लावत असताना दादोजींनी केलेल्या विशेष सुधारणा अशा-

 १. मावळे लोकांच्या बिन कवायती पायदळ पलटणी त्यांनी तयार केल्या. तिच्यावर हुकमतीचा दर्जा ठरवून दिला. गावेगावच्या चौक्या, पहारे बसवून चोरांची आणि लुटारूंची भीती नाहीशी केली.

 २. वाघ आणि लांडगे यांच्यापासून होणाऱ्या त्रासामुळे रयत त्रस्त झाली होती. वाघ आणि लांडगे मारून आणणाऱ्यास बक्षिसी जाहीर केली.

 ३. शेतीची लागवड जोमाने सुरू व्हावी म्हणून साऱ्याची माफी दिली. एका बिघ्याला पहिल्या वर्षी अर्धा पैसा सारा आणि मग वाढवत वाढवत आठव्या वर्षी बिघ्यात मलिकंबरी धाऱ्याप्रमाणे एक रुपया अशी साऱ्याची व्यवस्था लावून दिली. फळबाग लावायला उत्तेजन दिले. दहा झाडाचे उत्पन्न पूर्णपणे मालकाला आणि इतर नऊ झाडांच्या तपासणी उत्पन्नापैकी १/३ भाग सारा म्हणून देणे अशीही सोय केली.

 बाल शिवाजीराजांच्या सामाजिक आयुष्यातील सुरूवात म्हणजे आजकालच्या पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरण्याने झाली हा प्रसंग फद्दत कापून उद्घाटन करण्याच्या किंवा कोनशिला बसवण्याच्या प्रकारचा नव्हता. गाव राबते व्हावे, बलुतेदारांनी व्यवसाय सुरू करावा यासाठी राजांनी रयतेला दिलेले हे अभयदान होते. स्वराज्य उभे करायच्या कित्येक वर्षे आधी शेतकऱ्यांच्या शेतीच्या संरक्षणाचे आणि विकासाचे प्रयोग शहाजी भोसल्यांच्या वतनाच्या मुलखात केले गेले.

 इतके दिवस वतनदारांच्या पदरी असलेल्या आणि खून-मारामाऱ्यांच्या सुपाऱ्या घेणाऱ्या रामोशांना दादोजीपंतांनी गावाच्या पांढरीच्या आणि काळीच्या रक्षणासाठी नेमले. त्यांच्या मदतीसाठी हत्यारबंद पायदळ फौज सदैव तयार ठेवली.

 शेतीची व्यवस्था लावत असतानाच पंतानी न्यायदानाची व्यवस्था निर्माण करून रयतेमध्ये राजांबद्दल विश्वास निर्माण केला. काझी देईल तोच न्याय अशी व्यवस्था होती. पंतानी काझींना दूर करून पुण्याच्या लाल महालात कज्जेखटले चालू केले. बालशिवाजीला घेऊन पंत स्वत: न्याय करीत.अर्थातच यामुळे शिवाजीराजांवर न्यायाचे संस्कार बालपणीच घडत गेले. पंतांनी दिलेली न्यायाची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. खेडेबारे तर्फे तील मौजे रांझे गावच्या मुकादम रामजी चोरघे यांनी दांडगाईने मुकादमाचे वतन पूर्णपणे गिळंकृत करायला प्रारंभ केला. याविरुद्ध गणोजी चोरघे, भणगे पाटील व चव्हाण यांनी महाराजांकडे जाऊन फिर्याद केली. त्यावेळी दादोजींनी उन्मत रामजी चोरघे यांना ठार मारले व वतन जप्त करून तेथे विहीर, बाग केली. पुढे रामजीचा पुत्र विठोजी याला महाराजांनी कौल देऊन परत बोलाविले व वडिलांचे वतन मुलास परत दिले.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ३६