पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/64

हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांना जराही धक्का लागू दिला नाही. वतनदारी नष्ट करताना महाराजांनी प्रसंगी जी कठोरता दाखविली त्याप्रमाणे मायेची कुंकर घालून, स्वराज्याचे महत्त्व पटवून देऊन स्वाभिमानाला आणि शौर्याला आवाहन करून काही वतनदारांना राज्यकारभारात गुंफून घेतले. जेधे, बांदल, पासलकर या वतनदारांनी स्वराज्य उभारणीसाठी केलेली कामगिरी अतिशय बहुमोल आहे. महसुलाची वसुली आपल्या सरकारी अधिकाऱ्यामार्फत करून स्वराज्याचा खजिना समृद्ध करीत असतानाच वतनदारी मोडून काढण्याचे राजांचे कसब अनन्यसाधारण होय. हे सर्व करीत असतानाच राजा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध जोडत होता. ही त्या काळात अगदी जगावेगळी घटना. शेतकऱ्यांच्या शेकडो वर्षाच्या लुटीचा कालखंड संपत होता. शेतकऱ्यांच्या नव्या राज्याची स्थापना हळूहळू होत होती.

 शिवाजीराजाच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून असे दाखविता येईल की, तो जनसामान्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा होता. व्यक्तिगत मानसन्मानाचा प्रश्न कधी प्रतिष्ठेचा होऊ न देता प्रसंगी शेतकऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शिवाजीराजाने माघारसुद्धा घेतली आहे. स्वराज्यात घुसून कोणालाही रयतेस उपद्रव देता येऊ नये याची काळजी त्यांनी क्षणोक्षणी घेतली. इ. स. १६४८ ते १६६६ हा शिवाजी राजाच्या एतद्देशियांच्या राज्याचा परीक्षेचा कठीण काळ होता. १६६८ मध्ये विजापूरकरांचे पहिले आक्रमण झाले त्यावेळी राजाचे सैन्य ते काय? जहागिरीच्या संरक्षणाचे काम करणारे मर्यादित सैन्य आणि कालपर्यंत ज्यांनी किंवा ज्यांच्या बापांनी हाती नांगरच धरला होता आणि आज तलवारी घेतल्या होत्या असे सवंगडी. तरीसुद्धा त्यांनी विजापूरकरांच्या पहिल्या आक्रमणात शत्रूसैन्याला आपल्या रयतेच्या मुलुखात घुसू दिले नाही. त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवरच्या पुरंदर गडाखाली बाजी पासलकर वगळता कोणीही वतनदार म्हणजे वतनदारच्या पदरीचे सैन्य महाराजाबरोबर नव्हते. कान्होजी जेधे त्यावेळी शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच होते. केवळ यावेळी मावळे शेतकरीधारकरी पोरं त्या युद्धात लढली, विजयी झाली.

 एक नवा जोम मावळी मुलूखात पसरला. आपली आपण शेतीभाती तर करू शकतोच, शेतीच्या संरक्षणाची व्यवस्था तर करू शकतोच पण त्याबरोबर बादशाही सैन्याला पराभूत करू शकतो हे रयतेतून उभ्या राहिलेल्या धारकऱ्यांना आणि त्याचबरोबर रयतेला कळून आले.

 १६५६ पर्यंतच्या काळात परत रयतेला बटिक समजणाऱ्या चंद्रराव मोरे आणि संभाजी मोहिते यांना याच सैन्याने नेस्तनाबूत केल आणि दुसरीकडे विस्तारलेल्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ६१