पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/77

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली. नाही तर मग घोडी बांधावी न लगेच. खायास घालावे, न लागे, पागाच, बुडाली. तुम्ही निसूर जालेत, ऐसे होईल. या कारणे तपशिले तुम्हास लिहिले असे. जितके खासे खासे जुमलेदार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोख तपशिले ऐकणे. आण हुशार राहाणे. वरचेवरी, रोजचा रोज खबर घेऊन, ताकिद करून येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल ज्याचा गुन्हा होईल. बदनामी ज्यावर येईल. त्यात मराठियाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा?..."

 "घोडी वाटेल तशी चारू नका, आता चारा संपवलात तर पावसाळ्यात मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली असे होईल. अशा परिस्थितीत लोक जातील कोणी शेतकऱ्याचे दाणे आणतील, कोणी भाकरी, कोणी गवत, कोणी जळण, कोणी भाजीपाला, असे जर तुम्ही वागू लागलात जे बिचारे शेतकरी कष्ट करून जीव सांभाळून राहिलेत ते जाऊ लागतील. कित्येक बिचारे उपाशी मरतील आणि त्यांना असे वाटले आपल्या मुलखात मुघल आला त्यापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात. त्यांचा तळतळाट होईल तेव्हा रयतेची आणि घोड्यांची सारी बदनामी तुमच्या माथी येईल. हे तुम्ही जाणून असावे. घोडेस्वार असो अगदी पायदळ असो ही गोष्ट विसरता कामा नये."

 रयतेच्या रक्षणात शिवाजी राजा किती सावध होता याचे अतिशय बोलके उदाहरण या पत्रावरून दिसून येते.

 आग्ऱ्याहून परत आल्यानंतर कोणतीही मोहीम हाती न घेता शिवाजीराजाने स्वराज्याची व्यवस्था लावण्यात लक्ष घातले. या शांततेच्या काळात महसुलाच्या उत्पन्नाची साधने त्याने ठरविले आणि एकदंर सर्व परिस्थितीचा विचार करता राजाने शेतजमिनीच्या साऱ्याच्या वसुलीसाठी एक आदर्श पद्धत घालून दिली. शेतकऱ्यांची सारा आकारणी त्या काळी दोन प्रकारात केली जाई. नगदी आणि धान्य. सारा म्हणून धान्य रूपाने गोळा केलेले धान्य कोठ्यामध्ये साठवून अडचणीच्या दिवसात विक्रीला बाहेर काढले जाई. दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना या धान्याचा उपयोग केला जात असे. शिवपूर्व काळात जमिनीची मोजणी करण्याची पद्धत नव्हती. नजरेने अंदाज करून वतनदार साऱ्याची रक्कम ठरवीत. स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या कार्याला शिस्त लागली. उदा. अंजनवेल तालुका १६७६ पर्यत आदिलशहाकडे होता. जमिनीची मोजणी झाली नव्हती. केवळ नजरेने साऱ्याची रक्कम ठरविली होती. असा उल्लेख आढळतो. हा प्रांत १६७६ मध्ये शिवाजी राजा येताच लगेच जमिनीची मोजणी झाली व जमिनीची प्रतवारी ठरविण्यात आली.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ७४