पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/9

हे पान प्रमाणित केलेले आहे.



 शेतकरी राजांचे दुर्दैव


 तिहासात शेतकऱ्यांचे असे राज्य आढळत नाही. शेतकरी म्हणजे रयत म्हणजे प्रजा.त्यांनी राबून कसून मेहनत करावी, पिके पिकवावी आणि स्वत:ला राजे म्हणविणाऱ्यांनी, त्यांनी पिकवलेली पिके कधी गोडी गुलाबीने कधी निघृणपणे काढून न्यावीत. शेतकऱ्यांकडून पिके काढून नेणाऱ्या राजांनी एका एका प्रदेशावर सत्ता बसवावी आणि त्या प्रदेशाच्या हद्दीपलीकडील दुसऱ्या राजाशी लुटीच्या हक्काकरिता मारामाऱ्या कराव्यात हे इतिहासाचे स्वरूप राहिले आहे.

 पहिला राजा बळी

 शेतकऱ्यांचा राजा असा शोधायला इतिहासकाल ओलांडून पुराणकाळात जावे लागते. देशभरचा शेतकरी बळिराजाला आपले दैवत मानतो. पुराणांतरी आणि वेगवेगळ्या ग्रंथांत बळिराजाविषयी दिलेला मजकूर सगळा अकटोविकटच आहे. याचक म्हणून आलेल्या वामनाने कपटाने तीन पावले जमीन मागितली काय आणि मग एकाएका पावलात पृथ्वी आणि आकाश व्यापले काय आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर जणू पृथ्वीच्या बाहेर राहिलेल्या बळीने डोके पुढे केले काय. खरेखुरे काय घडले याचा अर्थ या भाकडकथेवरून तरी लागत नाही. कदाचित ही कथा एक रूपक असेल.

 जोतीबा फुल्यांनी म्हटल्याप्रमाणे "भटशाहीने शेतकऱ्यांवर केलेल्या आक्रमणाची" ती सुरुवात असेल. निश्चितपणे काहीही म्हणणे कठीण आहे. पण जे ग्रंथकारांना जमले नाही ते गावोगावच्या घरी घरांतील मायमाऊल्यांनी करून दाखविले. बळिराजाला जमिनीत गाडून टाकला, समूळ नष्ट केला तरीही शेतकऱ्यांच्या बाया "इडा पिडा बळीचे टळो राज्य येवो" या आशेची ज्योत हर प्रसंगी जिवंत ठेवत असतात. हजारो-हजार वर्ष आपल्या एका राजाचे इतक्या मोठ्या समाजाने इतक्या कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवल्याचे क्वचितच दुसरे उदाहरण असेल.

 बळिराजाची राजधानी पश्चिम किनाऱ्याला होती व त्याचे राज्य महाराष्ट्रापर्यंत पसरले होते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. शेतकऱ्यांचा पहिला राजा बळी.तो

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/६