मुलांना रात्री दिसत नाही. व्हिटॅमिन 'ए' ची कमतरता त्यांच्यात होती. डोंगरात गाजरं होत पण ती म्हशीला दूध वाढावं म्हणून घातली जात, पण मुलांना मात्र दिली जात नसे.
नव्या मित्रांमध्ये नव्या नव्या कामामध्ये श्रीनाथ बुडून गेला. घरात आला की अनूचा तनमन भरून सहवास. नवनव्या कादंबऱ्याचे कथानक, लेखकाच्या प्रतिभेची झेप अनू श्रीला सांगत असे. श्रीनाथ खेड्यातील लहान शेतकऱ्याची होणारी गुदमर पाहून हतबुध्द होई. बलुतेदारांपैकी अनेक जणांनी केव्हाच घराला कुलपे ठोकली होती. पाणी, सरपण, धान्य यासाठीही बायांना करावी लागणारी वणवण, बोडके होत जाणारे डोंगर…माळ. हे सारे अनुला सांगतांना त्याचे मन अस्वस्थ होई. पण तरीही आत… अगदी आत कुठे तरी वाटे की, अनूने खोलात जाऊन त्यांच्या बेसहारा जगण्याबद्दल विचारावे…
"... जनक, ये ना जवळ, मला ओळखलं नाहीस? पिल्लू… बेटा…" असं काही पुटपुटत अनूने कूस बदलली. तिला बहुदा जनकचे स्वप्न पडले असावे. ते झोपेतले अस्फुट शब्द ऐकून श्रीनाथ खूप अस्वस्थ झाला. अनूचा पीएच.डी.च्या अखेरच्या वळणावरचा अभ्यास, श्रीनाथच्या मागची धावपळ त्यामुळे दीड वर्षाच्या जनकला आई जळगावला घेऊन गेल्या होत्या. त्यालाही सहा महिने उलटून गेले होते. श्रीनाथचे डोळे भरून आले. त्याने अनूला अलगद जवळ ओढले. तिच्या माथ्यावर हळूवारपणे थोपटीत तो पुटपुटला…
अने, उद्याच जनकला भेटायला जाऊ आपण. आणि मीही येणार आहे तुझ्या बरोबर".... अनूला थोपटतांना मनाशी खूणगाठ बांधली. येणाऱ्या बाळाच्या नंतर कुटूंबवाढीला पूर्ण विराम. खरं तर पीएच.डी. नंतरच… पण होतात कधी कधी चुका माणसाच्या हातून. मनातल्या मनात हसत त्याने डोळे मिटून घेतले.
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२१
हे पान प्रमाणित केलेले आहे.
शोध अकराव्या दिशेचा / २१