पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/1

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक विकासवेध

 या ग्रंथाच्या लेखकाला कोणा एका पठडीत बसवणं अवघड. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, समीक्षक, संशोधक, संपादक, वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ,वक्ता, संघटक, सामाजिक कार्यकर्ता,कवी,कथाकार,भाषांतरकार,शिक्षण तज्ज्ञ,कुशल प्रशासक या सर्वांपलीकडे हा एक समाजसंवेदी अश्वत्थामा आहे, पण आधुनिक काळातला! महाभारतातल्या अश्वत्थाम्याला स्वतःचं गमावलेलं तेज परत मिळवण्यासाठी नि जखम भरून निघण्यासाठी वणवण करावी लागली होती. काही अश्वत्थामे सामाजिक जखमा भरून निघाव्यात म्हणून जीवनभर भटकत राहतात. त्यांच्या हाती येतात समाजाचे कूटप्रश्न. सापासारखे असतात ते, धरले तर चावतात,सोडले तर पळतात.काही समाजलक्ष्यी माणसं सर्पमित्रांच्या कौशल्याने प्रश्नांचे साप आपल्या पोतडीत पाळतात. दात न काढता,माणसाळतात त्यांना. विषाचं अमृत करून चुकलेल्या माणसांना ताळ्यावर आणत ते त्यांना परत समाजात विसावतात कसे कळतसुद्धा नाही.अशा सर्व प्रश्नांचा हा ‘सामाजिक विकासवेध'.

सामाजिक विकासवेध
डॉ. सुनीलकुमार लवटे