पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय युवा धोरण - २०१४


 भारत सरकारने स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचे औचित्य साधून काही दिवसांपूर्वीच ‘राष्ट्रीय युवा धोरण - २०१४' जाहीर केले आहे. सरकारी पातळीवर त्याचा फारसा प्रचार, प्रसार न झाल्यामुळे ते युवकांपर्यंत पोहोचलेले नाही. माध्यमांनीही त्यांची फारशी दखल घेतलेली लक्षात आलेली नाही, म्हणून हा लेखप्रपंच.
 नव्या धोरणानुसार १५ ते २९ वयोगटातील मुला-मुलींना ‘युवा' (young) समजण्यात आले आहे. 'युनो'ने १५ ते २४ वर्षे हा वयोगट युवा मानला असला तरी भारताने वरील वयोगट स्वीकारण्याची अनेक कारणे आहेत. पूर्वीच्या (२00३) युवा धोरणात युवा वर्ष १३ ते ३५ मानण्यात आले होते, ते कोणत्याच निकषांवर समर्थनीय नव्हते. विद्यमान वयनिश्चितीमागे वैधानिक व वास्तविक व्यवहारी तर्क, तथ्य आढळून येते. बालमजुरांचे वय १४ मानण्यात आले आहे. त्याआतील मुलांना मजूर बनविण्यावर प्रतिबंध आहे. सन २00९ साली मंजूर झालेला सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायद्यात ६ ते १४ वयोगट स्वीकृत आहे. बाल न्याय अधिनियम २०१४ च्या नव्या प्रस्तावित दुरुस्तीनुसार ही १६ पुढील मुले युवक मानण्यात येणार आहेत. युवकांतील वाढते शिक्षणमान, नोकरीत स्थिरस्थावर होण्यास लागणारा काळ, विवाहाचे वाढत जाणारे वय अशा अनेकांगांनी पाहिले तर नव्या धोरणातील १५ ते २९ वयोगट हा 'युवा' मानणे मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजवास्तव या सर्वाधारे कालसंगत व सयुक्तिक ठरते.

 भारतीय युवकांची १५ ते २९ वर्षे वयोगटातील संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या २७.५टक्के भरते. म्हणजे भारताची एक चतुर्थांश लोकसंख्या । युवकांची आहे. सन २०२० पर्यंत युवकसंख्या १.३ सहस्रलक्ष (Billion),

सामाजिक विकासवेध/७०