पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/74

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा देशाचा प्राधान्यक्रम बनविण्याचे या धोरणाचे उद्दिष्ट राहणार आहे. विविध खात्यांचे मंत्री युवा संपर्क अभियानाचा भाग म्हणून आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून विशेष उपक्रम योजणार आहेत. माहिती व तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जाणार असून भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात युवा जाणीवजागृती व नेतृत्वविकासाचे कार्यक्रम योजिले जाणार आहेत. कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा इत्यादींबरोबर सोशल नेटवर्किंगचा द्रष्टा वापर करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी युवाविकासार्थ स्वतंत्र संकेतस्थळ, संस्थळ (Portal), ब्लॉग, ट्विटर इत्यादींचा वापर केला जाणार आहे.
 एकविसाव्या शतकातील युवकांसमोर जागतिकीरण उदारीकरण, खासगीकरण, उदार अर्थ धोरण, बहुराष्ट्रीय कंपनी विस्तार या सर्वांच्या पार्श्वभूमीवर युवक ‘कर्ता' (Doer) व ‘सक्षम' (Enabler) बनविणे हे आपल्या देशापुढील खरे आव्हान आहे. युरोपमधील देशांत वा प्रगत जगात युवक स्वावलंबी, मिळवते व स्वतंत्र विचारांचे बनताना दिसतात. आपल्याकडील युवकांचे अवलंबित्व नष्ट करणे, त्याला पर्याय देणे, निर्माण करणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्या अनुषंगाने या धोरणात कूटनीती अवलंबिली जाणार असून, तसे झाल्यास लवकरच आपल्या देशात प्रगल्भ युवा पिढीचे दर्शन होऊ शकेल. यासाठी माहिती तंत्रज्ञान व युवक संघटनांचा द्रष्टा वापर करण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे.
 मी तरुण असताना बाबा आमटेंची युवकांची व्याख्या वारंवार ऐकवली जायची. ‘युवक तो, ज्याच्या तरुण खांद्यावर तरुण डोके असते. यातील मथितार्थ इतकाच की, जबाबदारी व ती पेलण्यासाठीच भान ज्या पिढीत असते ती तरुण. युवा पिढीसाठी योजलेले हे धोरण कागदावरचा संकल्प न राहता कृतिकार्यक्रम होईल तर युवकांना 'अच्छे दिन' पाहायला मिळतील व देश संख्येने नव्हे तर कार्यक्षमतेने तरुण होईल.

सामाजिक समाजवेध/७३