पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/14

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचार करणे आवश्यक असल्याचे वाचकांच्या मनावर ठसत गेले. वाचक ‘संस्कृती माला गंभीरपणे वाचतात हे लक्षात आले.
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीप्रणित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत झाल्यापासून हिंदुत्ववादी व प्रतिगामी शक्ती डोके वर काढत आहेत. त्या देशाची बहुसांस्कृतिक वीण उसवू पाहात असल्याची भावना देशात वाढत जाऊन अस्वस्थता पसरत निघाली. तिचा स्फोट ९ ऑक्टोबर, २०१५ रोजी झाला. हिंदीतील प्रख्यात साहित्यिक उदय प्रकाश, नयनतारा सहगल व अशोक वाजपेयी यांनी वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली. पाठोपाठ भारतातील विविध भाषांमधील सुमारे ४० साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. त्याचे लोण चित्रपट, संगीत, कलाक्षेत्रात पोहोचले. तिथेही जवळ जवळ इतक्याच अभिनेते, दिग्दर्शक, कवी, पटकथाकार यांनी या पुरस्कार वापसी'स आंदोलनाचे स्वरूप आणले. या घटनेतून परत एकदा भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. इथे सत्तेच्या बळावर कुणास निरंकुश सत्ता गाजवता येणार नाही. इथले एकात्म वातावरण हे पारंपरिक बहुवंशीय, बहजातीय, बहप्रांतीय, बहुभाषिक, बहुधार्मिक समन्वय, सामंजस्य व समादरावर उभे आहे. त्यात कोणत्याही एका घटकाचा वरचष्मा वा आक्रमण सहन केले जाणार नाही. इथे सर्व जाती, धर्म, वर्गसमूहाला घटनेने समान नागरिक हक्क व स्वातंत्र्य दिले आहे. गोवंश पूजेचे स्वातंत्र्य येथे आहे, तसेच गोमांस भक्षणाचेही आहे, हेही विसरता येणार नाही. हिंदू-मुसलमान धर्म एकता मध्ययुगापासून इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. महाराष्ट्रातील वारी ही भागवत संप्रदायाने धर्मांतर्गत घडवून आणलेली जातीय एकता म्हणूनही पाहाता येते. इथे अस्पृश्योद्धार, मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश, सर्व धर्म बांधवांना मंदिर, मशीद, गुरूद्वार, चर्च, अग्नीगृहादि मंदिरे उभारण्याचे व आपापल्या पूजा विधी, खानापान, सवयीचे स्वातंत्र्य आहे अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण अत्याचार, हिंसाचार, जबरदस्ती, धर्मांतर लादता येणार नाही व सत्तेचा दुरुपयोग करुन राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही, हे जनतेने सत्ताधा-यांना दाखवून दिले.
 सन २०१५ ते २०१७ अशी दोन वर्षे ही ‘संस्कृती माला' समाज प्रबोधन पत्रिकेत अखंडपणे प्रकाशित होत राहिली. एकूण १० लेख प्रकाशित झाले. पैकी सहा लेखातून ग्रंथांचा परिचय करून देण्यात आला. या ग्रंथांतील