________________
( ११३ ) द्या माउलीने तो करून पहावा. ह्यापासून दोष वाढण्याची भीति नाही. फुलाबोलास गांठ पडून सुदैवाने आला तर गुणच येईल. पुण्यांत हिंदु व मुसलमानांमध्ये तंटे होण्याचा संभव नसतां ते सुरू झाले, ह्यांत परमेश्वराचा संकेत काही तरी वेगळा असावा असे दिसते. कारण प्रसंग पडल्यास स्वार्थाचा त्याग करून परहितासाठी उड्या घालणारे जे लोक ते आपसांत तंटे व मारामाऱ्या करण्याच्या फंदांत कधी पडावयाचे नसतां, त्यांस अशी दुर्बुद्धि झाली, ह्यावरून असा तर्क होतो की, असली कृत्ये करणाऱ्यांस काय काय यातना भोगाव्या लागतात व त्यांचे कोणकोणत्या प्रकाराने किती नुकसान होतें ह्याचा स्वतः अनुभव घेऊन पहावा, आणि मग असले प्रकार पुण्यांत न होण्याविषयी चांगला बंदोबस्त करून नंतर असले दंगे बाहेरगांवीं जेथे जेथे झाले असतील तेथे मुद्दाम कांहीं मुसलमान व हिंदु गृहस्थांनी जाऊन तेथल्या लोकांस समजून सांगून पुनः असले तंटे व मारामाऱ्या न करण्याविषयी त्यांस पुणेकरांकडून बोध करवावा, असा ईश्वरी संकेत दिसतो. " पाण्यामध्ये मासा झोंप घेतो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे " ह्या वचनाप्रमाणे आमच्या सूज्ञ पुणेकर बंधूंनी असल्या आपसांतील तंट्याचा स्वतः अनुभव घेऊन आपली खात्री करून घेतली आहे. तीच गोष्ट खरी असेल तर यापुढे पुण्यांतील तंटे अगदी बंद पडतील, आणि हिंदु व मुसलमान बांधवांचे पुनः पुर्ववत् सख्य बनून येईल. पुण्यास हिंदु व मुसलमानांचा व्यवहारामध्ये परस्परांचा संबंध फार निकट असल्यामुळे त्यांचे हिताहित एकमेकांवर