पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/69

हे पान प्रमाणित केलेले आहे.



५६

ळत असते व ही बाष्पमिश्रित हवा जमिनीवर येऊन तिसरा प्रहर झाला म्हणजे परतू लागते. व ह्याचमुळे ह्या दिवसांत तिसरे प्रहरानंतर वळिवाचे लहान लहान पाऊस पडतात. ह्या पावसांचे वर्षाचे सरासरी मान *५ इंचांपेक्षा जास्त नसते. व त्यांपासून शेतकीसही फारसा फायदा नसतो. म्हणून ह्या पावसांस फारसे महत्त्व नाहीं.

 नैर्ऋत्येकडील नियतकालिक वारे:–पाऊस आणणारे महत्त्वाचे वारे हेच होत. मार्च महिन्याचे १५ तारखेचे सुमारास सूर्य विषुववृत्तावर असतो. तो नंतर उत्तरेकडे येऊ लागला म्हणजे उत्तरगोलार्धात उन्हाळा होऊ लागतो. सूर्य मे महिन्याचे अखेरीस कर्कवृत्ताजवळ येतो व त्यामुळे उत्तर हिंदुस्तानांत त्या वेळीं उन्हाळा फारच कडक भासू लागतो. उत्तर हिंदुस्तानचे उत्तरेस हिमालयपर्वत असून त्याचे पलीकडे तिबेट देश, व नंतर मध्य एशियांतील विस्तीर्ण वाळवंटें आहेत. ह्या बाजूस समुद्र अगर इतर मोठे जलसमूह, तसेच झाडे वगैरे अंशतः उष्णता नाहीसे करणारे सृष्टपदार्थ नसल्याकारणाने उष्णता अतिशय होते. पंजाबांत तर उष्णतेची कमाल होते, व या वेळीं उत्तर हिंदुस्तानांत मोठी भट्टी पेटते असे म्हणण्याचा परिपाठ आहे. अशा रीतीने उष्णता अतिशय वाढल्या कारणाने उत्तरेकडील हवा गरम होऊन तिची जागा भरून काढण्यास दक्षिणेकडील थंड ( अर्थात् घन ) हवा येऊ लागते. व जून महिन्याचे सुरुवातीस वाऱ्याचा एक मोठा प्रवाह

-----

 *आसामांत ह्या पावसाचे मान २० पासून ५० इंच असते.