हे पान प्रमाणित केलेले आहे.
[३]

बुद्धिसामर्थ्यानें इतकीं शास्त्रे व विद्या निर्माण केल्या व त्यांवर नामांकित ग्रंथरचना केली त्यांना या तीन विषयांवर सर्वमान्य ग्रंथरचना करतां आली नसती असें समंजस मनुष्य म्हणणार नाहीं. तर मग आमच्या वाङ्मयांतील या विषयांच्या अभावाची मीमांसा काय?
 आमची समजूत अशी आहे कीं या अभावाला कांहीं सबळ कारणें आहेत; व त्यांचा थोडासा विचार करणें येथें अप्रासंगिक होणार नाहीं व ज्या अर्थी या उपोद्धाताचा प्रत्यक्ष संबंध अर्थशास्त्राशीं आहे त्या अर्थी या शास्त्राच्या आमच्या वाड्मयांतील अभावाचा मुख्यत्वेंकरून येथें विचार करणें बरें.
 आर्यलोक प्रथमतः हिंदुस्थानांत आले त्या वेळीं त्यांचेमध्यें वर्ण व जाती हा भेद नव्हता ही गोष्ट आतां निर्विवाद सिद्ध झाली आहे. परंतु येथें आल्यानंतर वर्णाची कल्पना समाजांत बद्धमूल होऊं लागली व येथल्या मूळच्या काळ्या वर्णाच्या रहिवाशांना आर्यलोकांनीं शूद्र या नांवाच्या चेौथ्या वर्णामध्यें सामील केल्यापासून तर वर्णावर्णामधील भेद कडक होत चालले. धर्मशास्त्रदृष्ट्या जरी विद्या व ज्ञान मिळविण्याचा अधिकार वरच्या तीनही आर्यवर्णांस होता, तरी प्रत्यक्ष व्यवहारांत ज्ञानाची गुरुकिल्ली ब्राह्मणांच्या हातांत आली व बाकींचे वर्ण आपापल्या धंद्यांत चूर होऊन गेले. विद्या व ज्ञान मिळविणें, तें जतन करुन ठेवणें व वाढविणें आणि तें दुस-यांस शिकविणें हें काम फक्त ब्राह्मणांचें, असा सक्त नियम झाला. दुस-या वर्णाच्या मनुष्यानें ब्राह्मणांचें काम करणें किंवा त्यांचे आचार पाळणें म्हणजे एक मोठें पाप आहे, असा दृढ समज झाला. याचें प्रत्यंतर रामायणांतील शंबुकाच्या गोष्टीवरून खासें येतें. रामासारख्या सत्वशील राजाला तपश्चर्या करणा-या शूद्र शंबुकाचा गुन्हा देहान्त प्रायश्चित्तास योग्य असा वाटला. या कडक नियमानुरूप समाजांतील ब्राह्मणवर्गच कायतो विद्याव्यासंगी वर्ग राहिला; व आपल्या विशिष्ट धंद्याखेरीज त्यांना जे कामधंदे करतां आले किंवा प्रसंगानें करणें भाग पडलें तितक्या धंद्यांसंबंधीं सोपपत्तिक ज्ञानाचें वाङ्मय त्यांनीं भाषेंत निर्माण केलें. धार्मिक आचार चालविणें व समाजाला धर्मशिक्षण देणें हें त्यांचें मुख्य काम असल्यामुळें धर्मशास्त्र व वेदांतशास्त्र यांतच त्यांनीं आपलें बहुतेक बुद्धिसर्वस्व खर्च केलें व