या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ५७
 

घातली आहे." दल म्हणजे काँग्रेसांतर्गतच एका उपपक्षाचे स्वयंसेवक मंडळ आहे असे मला समजले. “अरे, जशी R.S.S.वर बंदी, तशी तुमच्यावर; त्यात एवढे संतापायला काय झाले?" "छे! छे! तुमच्याशी बोलण्यात काही फायदा आहे का? R.S.S. आमचे दल नि कम्युनिस्ट सर्व काय सारखे आहेत? त्यांच्यावर बंदी घातली, उत्तम झाले! पण आमच्या दलावर घातली हा काय न्याय आहे? म्हणजे बंदी घालणे योग्य की अयोग्य? हा प्रश्नच नव्हता, फक्त आमच्यावर असता कामा नये, इतरांवर असावी हा कटाक्ष होता. जी गोष्ट ह्या छोट्या मुलाची तीच इतर छोट्या-मोठ्यांची. परवापासून वाचते आहे व ऐकते आहे; “काय सांगावे हो, अठरा वर्षांखालील कोवळ्या मुलांनासुद्धा R.S.S.ने सत्याग्रह करावयास लावला!" शाळेतील व कॉलेजातील मुले म्हणजे सत्याग्रहातील मुख्य शस्त्र हे तंत्र पहिल्याने कोणी अंमलात आणले? ह्या बाबतीतील एका काँग्रेसजनाचा व एका भाईचा वादविवाद मोठा बोधप्रद वाटला म्हणून सांगते. काँग्रेस पक्षीयाने सांगितले की, “तेव्हाची गोष्ट निराळी होती. परकी सत्तेविरुद्ध प्राणपणाने लढावयाचे होते. राष्ट्राच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, तेव्हा सर्वच सैनिक होते- लहानमोठा भेद करण्याचे कारण नव्हते. आता आपले राज्य आहे. म्हणून पूर्वीचा मार्ग बरोबर ठरत नाही." भाईंनी तितक्याच गंभीरपणाने सांगितले, “गृहस्था, मागे फक्त राष्ट्राचा प्रश्न होता, आता सबंध मानवी मूल्याचा प्रश्न आहे. हा लढा जागतिक आहे- येथे सर्वांनी लढले पाहिजे - मुले आणि मोठी माणसे हा भेद ठेवता येत नाही..." पुढची पुस्ती मी जोडते; R.S.S.चा मनुष्य म्हणेल, “आमचा लढा न्यायासाठी आहे. मूलभूत मानवी हक्काचा लढा चालू असता मुले व मोठी माणसे असा भेद ठेवता येत नाही." म्हणजे मिळून काय, शाळांतील मुलांना राजकीय लढ्यात ओढू नये असे कोणीच म्हणत नाही, फक्त आमच्या मूल्यासाठी ओढावे, इतरांच्यासाठी नाही!
 जी गोष्ट सत्याग्रहाची तीच इतर बाबींची. प्रत्येक पक्षाचा गणवेश आहे, प्रत्येकाचे निशाण आहे, प्रत्येकाचा स्वयंसेवक संघ आहे, प्रतिज्ञा आहे, शिस्तपालन आहे. पक्षातीत राहणाऱ्याची ह्यात काय ओढाताण होते ते काय सांगू? मुलांच्या वर्गातून राजकीय पक्षाच्या नावावर सदैव भांडाभांडी चाललेल्या असतात. मूल अभ्यास टाकून कुठच्या पक्षात जाईल त्याचा नेम नाही. मूल म्हणून त्याला पक्षोपपक्षात ओढावयास कोणी कचरत