या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "धन्यस्त्वं न त्वया तुल्यं पश्यामि जगतीतले ।
 अयत्नादागतं राज्यं यस्त्वं त्यक्तुमिहेच्छसि ।।"२-७९-१२
 "धन्य तुझी! अनायासे हातात आलेले राज्य तू नाकारलेस. तुझ्यासारखा माणूस पृथ्वीवर अजून आढळला नाही." गुहाचे शब्द हेच भरताच्या जिविताचे योग्य मूल्य करतात.
 गुहाने लक्ष्मणाचेही शब्द सांगितले. "आम्ही गेल्यावर राजा मरणारच. कौसल्येचे, सुमित्रेचे काय होईल, कोण जाणे? सुमित्रेचा शत्रुघ्न राहील, म्हणून तिला काहीतरी सुख. पण कौसल्येचे काय? मेलेल्या बापाचे सर्व संस्कार यथासांग नीटपणे होतील आणि मग सर्व इच्छा पूर्ण झालेले असे (सिद्धार्थाः) भरताच्या बाजूचे ते लोक राजधानीत सुखाने राहतील. प्रतिज्ञा पूर्ण होऊन आम्ही परत सुखाने अयोध्येला जाऊ की नाही कोण जाणे?" (अध्याय ८०) बिचारा भरत हे शब्द ऐकून बेशुद्धच पडला. त्यानंतर तो तेव्हाही भारद्वाज आश्रमात गेला व राम कुठे गेला म्हणून विचारू लागला, त्याला असाच अनुभव आला. भारद्वाजाने विचारले, "त्या बिचाऱ्या निरपराध रामाचे काही वाईट करण्यासाठी तर नाहीस ना तू आलास?" (२.८४.१५) भरत काय म्हणणार?
 "हतोऽस्मि यदि मामेवं भगवानपि मन्यते” २.८४.१६
 "आपणालाही असं वाटलं म्हणजे मी मेलोच."
 येथे एक सबंध अध्याय (८५) भारद्वाजाने आपल्या तपःसामर्थ्याने राजपुरूष, राजस्त्रिया व पौर आणि सैनिक ह्यांचे आतिथ्य कसे केले, याचे वर्णन आहे. सर्व स्वर्गातून मिळविले. भरतापुढे अप्सरा येऊन नाचून गेल्या. ब्राह्मणांचा महिमा अतिशयोक्तीने वर्णन केलेला आहे. दुःखीकष्टी भरताला व त्याच्या आयांना असले आतिथ्य नकोच होते. हा सर्वच अध्याय अतिशय हीन रुचीचा वाटतो. प्रक्षिप्त असावा काय ?
 येथेच पुढच्या घटनांची नांदी सूचित केली आहे. कैकयीने शरमिंदी होऊन ऋषीचे पाय धरले तेव्हा भारद्वाज म्हणतो, "भरता, कैकेयीला दोष लावू नको. रामाचे वनवासात जाणे हे सुखदायीच होणार आहे." (२.८६.२८)

।। संस्कृती ।।

३१