तीर्थयात्रार्थ पलायन सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुध्दा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो! परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मीलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे, ही पूर्वजांची थोर दृष्टी होती.

त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री-पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून कित्ती दूर! परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून किती तरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा-माझ्या आईचे चुलते-त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या दहा-बारा गाड्या एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलेभात करावा, जेवावे व पुढे जावे, असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टिमाईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद! आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे. यातील सुख, त्याचे वर्णन का करता येईल? निसर्गही आपली माताच. त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ? तिच्याजवळ घटका घटका राहू या. या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यांतील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो! आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे, ताऱ्यांसारखे डोळे! हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात.

लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले, की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो; परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, "आई! जाऊ दे ना मला! मी वाटेत हट्ट करणार नाही. खोल पाण्यात जाणार नाही. तात्या (माझे चुलत आजोबा) सांगतील तसा वागेन. भाऊंना (वडिलांना) सांग, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई! त्या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी माघस्नान, कार्तिकस्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊन दे. तुझा मुलगा पुण्यावान नको का व्हायला?"

आई म्हणाली, "श्याम! अरे, आजच्याने काय झाले? तू पुढे मोठा हो व जा गंगा-गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले, तरी पाच-सहा रुपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून आणायचे, बाळ, पैसे? आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलीक आईबापाचे पाय सोडून, समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरं ना?"

परंतु मी म्हटले, "आई! ध्रुव तर आईबापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई! पुढचे कोणी पाहिले आहे? चांगले करावयाचे मनात आले, की लगेच करावे. त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का? आई, जाऊ का? तात्यांना सांगितले, तर ते मला फुकटसुद्धा नेतील. ते का पैसे मागतील?"

आई म्हणाली, "अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा; परंतु असे आपण ओशाळवाणे जीवे का? दुसऱ्यावर बोजा घालावा का? दुसऱ्यांच्या जिवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल, तर पायी जा. आहे ताकद?"

मी म्हटले, "आई! मी दमून जाईन. सहा कोस चालेन. परंतु पुढे? आणि गाड्या पुढे निघून जातील. मला सोबत? मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे, हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस-पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे?"

आई म्हणाली, "ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला, त्याला कोणाची आली आहे भीती? साप-वाघ त्याला मार्ग दाखवितील. खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला, तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली, तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली, तर गाय-माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला, त्याला सारे मित्र, सारे सखे. त्याचे सारे गडी, सीरे साहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा? त्याचा तो भाव? वेडा! हे काय? रडावयास काय झाले? अरे, आपण लहान माणसे. अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस."

मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. त्या गाड्यांच्या पाठोपाठ त्याना न दिसू, अशा रीतीने आपण जावे, असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणांस भूक लागेल, खायला काय? नाना शंका मनात येत होत्या; पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा, बकरी पानांवर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पाने खाऊ, असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली, ते कळलेही नाही. मी उठलो, तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे, तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली. संध्या केली. नमस्कार घातले. तुळशीला पाणी घातले. पाटी-दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो.

आई म्हणाली, "अरे इतकी घाई का? मी पानगी करत्ये, ती खा व मग जा शाळेत. बन्या, बापू कोठे अजून गेले आहेत? बस जरा."

मी रागाने म्हटले, "मला नको जा पानगीबिनगी. खायला देतेस; पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपला शाळेत जाऊन बसतो."

आई जरा रागाने म्हणाली, "पुन्हा माग तर खरे खायला. बघ देईन का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देत्ये, ती नको म्हणतो, दुपारी पण नको जेवूस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी, ते तरी बघत्ये. श्याम, मागे फीर, आईचे ऐकावे हो सांगितलेले."

परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व "देवा! माझा निश्चय तू टिकव. तू माझा साहाय्यकारी हो." अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो, तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलीही नव्हती.

माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये, म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्ठ्यावर आलो. जेथे तीन रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या किती तरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या दहा-अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे, तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार?

मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळ्यांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, "गावात जाऊ नको. परत घरी जाऊ नकोस." पोट म्हणे, "घरी जा." घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई-बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे.

गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या, की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणानारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो.

परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले! "अरे, आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्याला फास लावायचास एखाद्या वेळी!" असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटीदप्तर घरी आणून दिले; तेव्हा कळले की, मी हरवलो.

आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती, म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो, त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित, म्हणून गेलो असेन, असे हेडमास्तरांस वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीनेसुद्धा मुलांच्या उपड्या हातावर, बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी, म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो, म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला, असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीत जीवबीव तर नाही ना दिला, अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले, तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले, की माराला भिऊन श्याम पळाला. वडील पहाटे उठवून मला घरी खर्डे घासायला व कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. "मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमीजास्त झाले, तर; न व्हावे ते झाले, तर!" असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले.

हेडमास्तर म्हणाले, "आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही. म्हणजे तर झाले ना? तुमची मुले चांगली व्हावी, म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे, भाऊराव!"

परंतु वडील म्हणाले, "पुन्हा लावणार नाही. परंतु आधी सापडू दे तर खरा!"

घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली; परंतु तिने ती बोलून दाखविली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणिले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात, तसे मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. "जा रे आपापल्या घरी. का तमाशा आहे?" वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली.

वडील माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो.

थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, "श्याम! ऊठ बाळ. पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छड्या मारीत. माराला भिऊन कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही, तो कसला मास्तर? ऊठ. हातपाय धू. तोंड बघ कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी."

मी उठलो. हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले! मारण्याचे आता कमी करतील, असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच, तर बेताने मारतील, असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला, असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील, असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य, अगदी पूर्ण जरी नाही, तरी वसाहतीचे तरी मिळाले! आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताही!

मी का पळून गेलो होतो, हे तीन जणांना माहीत होते. मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. तिन्हीसांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, "श्याम!" मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, "श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते? मी सांगितले, तरी ऐकले नाहीस!" असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेविले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, "आई! मी तुझे ऐकले नाही. असा पळून गेलो, म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारले, म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखादे वेळेस मारीत! म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले, की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस, "जायचे, तर पायी जा. आहे ताकद?" आई! मी पायी जाऊ पाहत होतो. परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम! आई, तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल, ते तो करू बघतो. मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व न सांगता पळून गेलो, म्हणून नाही ना रागावलीस. सांग, आई सांग. नाही म्हण."

माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, "श्याम मी का रागावेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलल्ये, माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास, हे फार वाईट केलेस, असे मनात येऊन सुद्धाही वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास? परवा गावातला कुणाचासा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला, असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम! एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव- "चोरी-चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा. अशी मी प्रार्थनाही करीन!"


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.