सत्यार्थ प्रकाश/५. चौथा समुल्लास

चौथा समुल्लास सामावर्तन संस्कार

समावर्तन विवाह गृहाश्रम विधि विषयी

वेदानधीत्य वेदौ वा वेदं वापि यथाक्रमम्। अविप्लुतब्रह्मचर्यो गृहस्थाश्रममाविशेत्।।१।। मनु०।। अ.३ ।। श्लो. २।।

यथायोग्य ब्रह्मचर्याचे पालन करून, आचार्यांच्या अनुकूल वागून, धर्मपूर्वक चार, तीन, दोन किंवा एका वेदाचे सांगोपांग अध्ययन करून ज्याचे ब्रह्मचर्य खंडित झाले नसेल अशा पुरुषाने अथवा स्त्रीने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. ॥१॥

तं प्रतीतं स्वधर्मेण ब्रह्मदायहरं पितुः। स्रग्विणं तल्प आसीनमर्हयेत्प्रथमं गवा।।२।। मनु०।।अ.३ ।। श्लो. ३।।

जो स्वधर्म म्हणजे यथावत आचार्य व शिष्य यांचा धर्म आहे त्याने संयुक्त, पिता, जनक अथवा अध्यापक यांच्याकडून ब्रह्मदाय म्हणजे विद्यारूपी भाग ग्रहण केला आहे आणि जो माला धारण करणारा, आपल्या पलंगावर बसलेल्या आचार्याचा प्रथम गोप्रदान करून सत्कार करावा. अशा लक्षणांनी युक्त विद्यार्थ्यांचाही मुलीच्या पित्याने गोप्रदान करून सत्कार करावा. ॥२ ॥

विवाह

गुरुणानुमतः स्नात्वा समावृत्तो यथाविधि। उद्वहेत द्विजो भार्यां सवर्णां लक्षणान्विताम्।।३।। मनु०।। अ.३ ।। श्लो. ४।।

गुरूची अनुमती घेऊन, स्नान करून, गुरुकुलातून अनुक्रमपूर्वक येऊन ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य आपापल्या वर्णास अनुकूल व सुंदर लक्षणांनी युक्त कन्येशी विवाह करावा. ॥३॥

असपिण्डा च या मातुरसगोत्र च या पितुः। सा प्रशस्ता द्विजातीनां दारकर्मणि मैथुने।।४।। मनु०।। अ.३ ।। श्लो.५।।

जी कन्या मातृघराण्याच्या सहा पिढ्यांमध्ये येत नसेल आणि पित्याच्या गोत्रातील नसेल अशा कन्येशी विवाह करणे योग्य होय. ॥४॥

त्याचे कारण असे की, दूर देशी विवाह संबंध

परोक्षप्रिया इव हि देवाः प्रत्यक्षद्विषः।। शतपथ०।।

    परोक्ष वस्तू जशी प्रिय असते तशी प्रत्यक्ष वस्तु प्रिय असत नाही. यात तिळमात्रही संदेह नाही. ज्याप्रमाणे एखाद्याने खडीसाखरेचे गुण ऐकले असतील पण ती खाल्ली नसेल तर त्याचे मन त्या खडीसाखरेत गुंतून राहते. त्याप्रमाणे एखाद्या परोक्ष वस्तूची प्रशंसा ऐकल्यानंतर तिच्या प्राप्तची उत्कट इच्छा उत्पन्न होते. म्हणूनच जी आपल्या गोत्राशी मातेच्या कुळाशी जिचा जवळचा संबंध नसेल अशाच दूरस्थ मुलीशी वराचा विवाह झाला पाहिजे.

जवळच्या व दूरच्या नात्यात विवाह करण्यामध्ये हे गुण आहेत:- (१) जी मुले लहानपणापासून जवळ रहात असतात, एकमेकांशी खेळणे, भांडणे आणि प्रेम करतात, ज्यांना एकमेकांचे गुणदोषस्वभाव व बाल्यावस्थेतील विपरीत आचरणाची माहीती झालेली असते आणि ज्यांनी एकमेकांना उघडे-नागडे पाहिलेले असते त्यांचा परस्परांशी विवाह झाल्यास त्यांच्यामध्ये प्रेम कधीही उत्पन्न होत नाही. (२) ज्याप्रमाणे पाण्यात पाणी मिसळल्याने काही विशेष गुण उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे सपिंडात व सगोत्रात विवाह झाल्याने धातूंमध्ये अदलाबदल होत नसल्याने असा विवाह उन्नतिकारक ठरत नाही. (३) ज्याप्रमाणे दुधामध्ये खडीसाखर किंवा सुंठ वगैरे औषधी मिसळल्याने त्या मिश्रणात उत्तम गुण निर्माण होतात त्याचप्रमाणे भिन्न गोत्रे व भिन्न कुळे यातील स्त्रीपुरुषांचा विवाह होणे उत्तम आहे. (४) ज्याप्रमाणे एका देशातील (प्रदेशातील) रोगी दुसऱ्या देशात जातो व हवा आणि अन्न पाणी बदलल्याने रोगमुक्त होतो. त्याप्रमाणे दूरदेशी राहणाऱ्या स्त्रीपुरुषांचा विवाह होण्यात उत्तमता आहे. (५) जवळच्या नात्यांत विवाहसंबंध झाल्याने व पतीपत्नींनी घरे जवळ असल्याने एकमेकांच्या सुखदुःखांची जाणीव व विरोध तीव्र होणेसुद्धा संभव आहे. दूर राहणाऱ्या कुटुंबांमध्ये तसे होण्याची शक्यता नसते. दूरस्थ स्त्रीपुरुषांमधील विवाहामुळे प्रेमाचा धागा लांबवर वाढत जातो तसे निकटस्थांच्या विवाहामध्ये होत नाही. (६) दूर-दूरच्या प्रदेशातील स्त्रीपुरुषांचे विवाह झाल्याने तिकडील वर्तमान समजते व तद्देशीय पदार्थाची सहज प्राप्ती होते. जवळच्या विवाहातून हा लाभ मिळत नाही. दुहिता दुर्हिता दूरहिता भवतीति । निरु.अ.३।मं.४। कन्येचे नाव दुहिता आहे याचे कारण असे की तिचे लग्न दूरच्या गावी झाल्याने ते हितकारक होते. जवळ लग्न झाल्यास त्याने हित होत नाही. (७) मुलीचे माहेर जवळ असल्यास ती वारंवार माहेरी येईल व दर खेपेस तिला काही ना काही द्यावे लागेल. त्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांना दारिद्रय येण्याची शक्यता आहे. (८) सासरच माहेर एकमेकांजवळ असल्यास पती व पत्नी यांना आपल्या आपल्या पित्याच्या कुटुंबाकडून साह्य मिळून त्याबद्दल त्यांच्या मनांत घमेंड उत्पन्न होईल आणि पतिपत्नींमध्ये थोडेसे वैमनस्य निर्माण होताच पत्नी चटकन माहेरी निघून जाईलएकमेकांची निंदा आणि विरोधही अधिक होईल. कारण स्त्रियांचा स्वभाव बहुधा तीक्ष्ण व मृदु असतो. या अशाच इतर कारणांमुळे पित्याचे गोत्र, आईच्या कुळातील सहा पिढ्यांचा संबंध आणि जवळचा प्रदेश यांमध्ये विवाह करणे हितकारक नसते.

महान्त्यपि समृध्दानि गोSजाविध्नधान्यतः | स्त्री सम्बन्धे दशैतानि कुलानि परिवर्जयेत ||१|| मनु०।। अ.३ ।। श्लो.६।।

धन, धान्य, गायी, शेळ्या, हत्ती, घोडे, राज्य, श्री इत्यादींनी कुळे कितीही समृद्ध असली तरी विवाहसंबंधाच्या दृष्टीने पुढील दहा कुळांचा त्याग करा. ॥१॥

हीनक्रियम निष्पुरुषं निश्छन्दो रोमशार्शसम क्षय्यामयाव्यपस्मारिश्वित्रिवुफष्ठिवुफलानि च ||२|| मनु०।। अ.३ ।। श्लो.७।।

जे घराणे सदाचारहीन, सत्पुरुषरहित, वेदाध्ययनापासून विमुख असेल, ज्या कुळात अंगावर लांब केस असणारी माणसे असतील अथवा ज्या कुटुंबात मूळव्याध, क्षय, दमा, खोकला, अमांश (आव), अपस्मार श्वेतकुष्ठ व गलितकुष्ठ (महारोग) हे रोग असतील अशा कुळातील वधू किवा वर यांच्याशी विवाह करू नये. कारण हे सर्व दुर्गुण व रोग विवाह करणाऱ्या कुळातही प्रविष्ट होत जातात. म्हणून उत्तम कुळातील तरुण व तरुणी यांच्यामध्येच विवाह झाला पाहिजे. ॥२॥

नोद्वहेत्कपिलां कन्यां नाऽधिकाङ्गीं न रोगिणीम्। नालोमिकां नातिलोमां न वाचाटान्न पिङ्गलाम्॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.८।।

रंगाने पिवळी, पुरुषाहून अधिक लठ्ठ, उंच किंवा बलिष्ठ, रोगट, अंगावर मुळीच केस नसलेली, किंवा फार केस असलेली, बडबडणारी, गारसे डोळ्यांच्या मुलीशी विचार न करता विवाह करू नये.

न र्क्षवृक्षनदीनाम्नीं नान्त्यपर्वतनामिकाम्। न पक्ष्यहिप्रेष्यनाम्नीं न च भीषणनामिकाम्॥४॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.९।।

अश्विनी, भरणी, रोहीणीदेवी, रेवतीबाई, चित्तारी वगैरे नक्षत्रांची नावे; तुळशी, झेंडू, गुलाब, चंपा, चमेली, वगैरे झाडा-फुलांची नावे; गंगा, यमुना अशी नद्यांची नावे, चांडाली वगैरे अत्यंज नावे; विंध्या, हिमालया, पार्वती यांसारखी पर्वतांची नावे; कोकिळा, मैना अशी पक्ष्यांची नावे; नागी, भुजंगी यांसारखी सापांची नावे; माधोदासी, मीरादासी यांसारखी दासभाव व्यक्त करणारी नावे; आणि भीमाबाई, चंडीका, काली असली भीषण असणाऱ्या कन्येशी विवाह करू नये. कारण अशी नावे निंदनीय व इतर पदार्थाचीही असतात,

अव्यङ्गाङ्गीं सौम्यनाम्नीं हंसवारणगामिनीम् । तनुलोमकेशदशनां मृद्वङ्गीं उद्वहेत्स्त्रियम् ॥५॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.१०।।

जी अव्यंग असेल म्हणजे जिचे सर्व अवयव प्रमाणबद्ध असतील, जिचे नाव सुंदर अर्थात यशोदा, सुखदा असेल, हंस व हत्तीणी यांसारखी जिची चाल असेल, (जी गजगामिनी असेल,) जिचे लोम (अंगावरील लव), केस व दात सूक्ष्म असतील आणि जिचे सर्वांग कोमल असेल अशा स्त्रीबरोबर विवाह केला पाहिजे. ॥५॥


बालविवाह निषेध

(प्रश्न) विवाहाचा कोणता काळ व प्रकार चांगला असतो ? (उत्तर) मुलीच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून चोवीसाव्या वर्षापर्यंत आणि पुरुषाच्या पंचविसाव्या वर्षापासून अठ्ठेचाळीसाव्या वर्षापर्यंतचा काळ विवाहाच्या दृष्टीने उत्तम होय. यापैकी सोळा वर्षांची मुलगी व पंचवीस वर्षांचा मुलगा यांचा विवाह कनिष्ठ, अठरा-वीस वर्षांची तरुणी आणि तीस-पस्तीस किंवा चाळीस वर्षाचा तरुण यांचा विवाह मध्यम, आणि चोवीस वर्षांची स्त्री आणि अठ्ठेचाळीस वर्षाचा पुरुष यांचा विवाह उत्तम होय. ज्या देशात याप्रमाणे श्रेष्ठ विवाह होतात, ब्रह्मचर्यपालन आणि विद्याभ्यास या गोष्टी मोठ्या प्रमाणावर चालतात तो देश सुखी होतो. याउलट ज्या देशातील मुले ब्रह्मचर्याचे पालन करीत नाहीत, विद्याभ्यासाकडे लक्ष देत नाहीत आणि बाळपणी व अयोग्य स्त्रीपुरुषांचे विवाह होतात तो देश दु:खात बुडून जातो. कारण ब्रह्मचर्यपालन व विद्याभ्यास केल्यानंतर लग्न करण्याची सुधारणा अमलात आल्यास सर्व गोष्टीत सुधारणा घडून येते. तसे झाले नाही तर सर्व काही बिघाड होत असतो.

(प्रश्न) अष्टवर्षा भवेद् गौरी नववर्षी च रोहिणी । दशवर्षा भवेत्कन्या तत ऊध्र्वं रजस्वला ॥१॥ माता चैव पिता तस्या ज्येष्ठो भ्राता तथैव च । त्रयस्ते नरकं यान्ति दृष्ट्वा कन्यां रजस्वलाम् ॥२॥

हे श्लोक पाराशरी व शीघ्रबोध या ग्रंथामध्ये लिहिले आहेत. त्यांचा अर्थ असा आहे की मुलीला आठव्या वर्षी गौरी,नवव्या वर्षी रोहिणी, दहाव्या वर्षी कन्या आणि त्यानंतर रजस्वला अशी नावे होतात. ॥१॥ दहाव्या वर्षापर्यंत मुलीचे लग्न न करता तिला रजस्वला या स्वरूपात पाहून तिचे आईबाप व मोठाभाऊ हे तिघेही नरकात जातात. ॥२॥

(उत्तर) ब्रह्मोवाच- एकक्षणा भवेद् गौरी द्विक्षणेयन्तु रोहिणी। त्रिक्षणा सा भवेत्कन्या ह्यत ऊर्ध्वं रजस्वला ॥१॥ माता पिता तथा भ्राता मातुलो भगिनी स्वसा । सर्वे ते नरकं यान्ति दृष्ट्वा कन्यां रजस्वलाम् ॥२॥

हे सद्योनिर्मित ब्रह्मपुराणातील वचन आहे. अर्थ :- परमाणूला स्वत:भोवती फिरण्यास जेवढा वेळ लागतो त्याला क्षण असे म्हणतात. मुलगी जन्मली को पहिल्या क्षणी गौरी, दुसया क्षणी रोहिणी, तिसन्या क्षणी कन्या आणि चौथ्या क्षणी रजस्वला होते ॥१॥ त्या रजस्वला मुलीला पाहून तिची आई,बाप,भाऊ, मामा आणि बहीण सगळे नरकात जातात. ॥२॥ (प्रश्न) हे श्लोक प्रमाण नाहीत. (उत्तर) का प्रमाण माहीत ? ब्रह्मदेवाने उच्चारलेले हे श्लोक जर प्रमाण नसतील तर तुम्ही उद्धृत केलेले श्लोकही प्रमाण होऊ शकत नाहीत.

(प्रश्न) वाहवा ! पराशर व काशीनाथ यांचे श्लोकही तुम्ही प्रमाण मानीत नाही काय? (उत्तर) वाहवा ! तुम्ही ब्रह्मदेवाचे श्लोक प्रमाण मानीत नाही? पराशर व काशीनाथ यांच्यापेक्षा ब्रह्मदेव मोठा नाही काय? तुम्ही ब्रह्मदेवाचे श्लोक प्रमाण मानीत नसाल तर आम्हीही पराशर व काशीनाथ यांचे श्लोक प्रमाण मानीत नाही. (प्रश्न) तुमचे श्लोक अशक्य कोटीतील असल्यामुळे त्यांना प्रमाण मानता येत नाही. कारण मुलगी जन्माला येताच तिच्या लनाची तयारी सुरू केली तरी त्यात हजारो क्षण निघून जाणार. मग चार क्षणांत विवाह कसा होऊ शकतो? आणि त्या अवस्थेत लग्न करण्याचे काहीही लाभ दिसून येत नाही. (उत्तर) आमचे श्लोक अशक्य कोटीतील असतील तर तुमचे श्लोकही तसेच आहेत. कारण आठव्या, नवव्या व दहाव्या वर्षीही लग्न करणे निरर्थक आहे. कारण सोळाव्या वर्षांनंतर स्त्रीच्या गर्भाशयाची पूर्ण वाढ होते व तिचे शरीर बलवान होते; आणि पुरुषाचे शरीर चोवीस वर्षांनंतर सुदृढ होऊन त्याचे वीर्य परिपक्व होते.म्हणून अशा स्त्रीपुरुषांची संतति उत्तम होत असते. ज्याप्रमाणे आठ वर्षे वयाच्या मुलीला संतति होणे असंभव असते त्याचप्रमाणे सरसकट सर्व मुलींना गौरी रोहिणी अशी नावे देणेही अयोग्य आहे. मुलगी गोरी नसून काळी असेल तर तिचे नाव गौरी असे ठेवणे व्यर्थ आहे. शिवाय गौरी ही महादेवाची पत्नी व रोहिणी ही वसुदेवाची पत्नी होती. त्यांना तुम्ही पौराणिक लोक मातेसमान मानता. प्रत्येक मुलगीही गौरी वगैरे समान असते अशी तुमची भावना असेल तर तिच्याशी लग्न कणे कसे योग्य व धर्मयुक्त ठरते? म्हणून तुम्ही व आम्ही प्रस्तुत केलेले दोन- दोन श्लोक मिथ्याच आहेत. ज्याप्रमाणे 'ब्रह्मोवाच' म्हणून नमूद केलेले श्लोक आम्हीच केलेले आहेत, त्याचप्रमाणे पराशर वगैरेंच्या नावांनी तुम्ही उद्धृत केलेले श्लोक कोणीतरी रचलेले आहेत. म्हणून असल्या श्लोकांचा आधार घेणे सोडून वेदांनाच प्रमाण माना आणि त्याप्रमाणे सर्व कामे करा. मनुस्मृतीमध्ये असे सांगितले आहे की,

त्रीणि वर्षाण्युदीक्षेत कुमार्यृतुमती सती। ऊर्ध्वं तु कालादेतस्माद्विन्देत सदृशं पतिम्।। मनु०।। अ.९ ।। श्लो.९०।।

कन्या ऋतुमती झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत तिच्यासाठी योग्य पतीचा शोध करावा आणि योग्य वराशी तिचा विवाह करून द्यावा. दर महिन्यास एकदा रजोदर्शन होते. याप्रमाणे तीन वर्षांत छत्तीस वेळा रजोदर्शन झाल्यावर तिचे लग्न करणे योग्य होय. तत्पूर्वी विवाह करणे उचित नाही.

कामं आ मरणात्तिष्ठेद्गृहे कन्या र्तुमत्यपि । न चैवैनां प्रयच्चेत्तु गुणहीनाय कर्हि चित् ।। मनु०।। अ.९ ।। श्लो.८९।।

मुला मुलीने वाटल्यास जन्मभर अविवाहित राहवे, परंतु गुण-कर्म-स्वभाव सदृश्य परस्परविरूद्ध असलेल्यांचा विवाह कधीही होता कामा नये. यावरून असे सिद्ध होते को पूर्वोक्त वेळेच्या आधी आणि विज्ञोड स्त्रीपुरुषांचा विवाह होणे अयोग्य आहे. (प्रक) विवाह हा आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे व्हावा की मुला व मुलीच्या अधीनस्थ रहावा? (उत्तर) विवाहाचा निर्णय मुला व मुलीचे मताने होणे हे चांगले आईवडिलांच्या मनात कधी आपल्या मुलामुलींचा विवाह करण्याचा विचार आला असेल तरीही त्यांनी मुलाच्या किंवा मुलीच्या प्रसन्नते शिवाय विवाह करू नये. कारण वधुवरांनी एकमेकांना पसंत केल्यावर विवाह झाल्यास त्यांच्यात फारसा विरोध निर्माण होत नाही; आणि संततिही चांगली निपजते. मनाविरुद्ध केलेल्या विवाहाने नेहमीच दुःख होत राहते. विवाहामध्ये मुख्य संबंध वधू व वर यांचा असतो; आईबापांचा नव्हे कारण ती दोघे एकमेकांवर अनुरुक्त असतील तर त्यांनाच सुख होते; आणि त्यांच्यात विरोध असल्यास त्यांनाच दुः ख भोगावे लागते.

संतुष्टो भार्यया भर्ता भर्त्रा भार्या तथैव च । यस्मिन्नेव कुले नित्यं कल्याणं तत्र वै ध्रुवम्॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.६०।।

    ज्या कुळामध्ये स्त्री पुरुष हे एकमेकांवर सदैव प्रसन्न असतात, त्याच कुळात आनंद, लक्ष्मी आणि

कीर्ती निवास करतात आणि जेथे पतिपत्नींमध्ये विरोध व कलह असतो तेथे दु:ख, दारिद्रय व अपकिर्ती निवास करतात.

    म्हणून आर्यावर्तात परंपरेने चालत आलेली स्वयंवराची विवाह पद्धतच उत्तम होय. जेव्हा स्त्रीपुरुष विवाह करू इच्छितात तेव्हा विद्या, विनय, शील, रूप, वय, बळ, कूळ, शरीर यांचे परस्परांशी प्रमाण यथायोग्य असले पाहिजे. जोपर्यंत या बाबतीत त्यांच्यामध्ये मेळ होत नाही तोपर्यंत अशा विवाहापासून काहीही सुख होत नाही. तसेच लहानपणी विवाह केल्यानेही सुख मिळत नाही.

युवा सुवासाः परिवीत आगात्स उ श्रेयान्भवति जायमानः । तं धीरासः कवय उन्नयन्ति स्वाध्यो मनसा दवे यन्तः ।।१।। ऋ० मं० ३। सू० ८। मं० ४।।

जो पुरुष (परिवीतः) सर्व प्रकारे यज्ञोपवीत धारण करून, ब्रह्मचर्याचे पालन करून उत्तम शिक्षण व विद्या यांनी युक्त बनून (सुवासाः) सुंदर वस्त्रे परिधान करतो आणि ब्रह्मचर्याच्या पालनाने (युवा) पूर्ण यौवनसंपन्न होऊन विद्याग्रहण करून गृहस्थाश्रमात (आगात्) प्रवेश करतो (स उ) तोच दुसऱ्या विद्याजनामध्ये (जायमानः) प्रसिद्ध होऊन (श्रेयान्) अतिशय शोभिवंत व मंगलकारक (भवति) होतो. (स्वाध्यः) उत्तम ध्यानाने युक्त असणाऱ्या (मनसा ) विज्ञानाने (देवयन्तः) विद्यावृद्धीची अभिलाषा बाळगणारे (धीरासः) धैर्यवान (कवयः) विद्वान लोक (तम्) त्याच पुरुषाला (उन्नयन्ति) उन्नतिशील समजून प्रतिष्ठा देतात. याउलट जे पुरुष ब्रह्मचर्याचे पालन करीत नाहीत आणि उत्तम विद्या व सुशिक्षण प्राप्त केल्याशिवाय लहानपणीच लग्न करतात अशा स्त्रीपुरुष नष्ट भ्रष्ट होऊन विद्वानांमध्ये प्रतिष्ठेस प्राप्त होत नाहीत. ॥१

आ धेनवो धुनयन्तामशिश्वीः सबर्दुघाः शशया अप्रदुग्धाः । नव्यानव्या युवतयो भवन्तीर्महद्देवानामसुरत्वमेकम् ।।२।। ऋ० मं० ३। सू० ५५। मं० १६।।

(अप्रदुधाः) ज्यांची कुणीही धार काढलेली नाही अशा (धेनवः) गायींप्रमाणे ब्रह्मचारी असणान्या, (अशिश्वीः) बालपण ओलांडून तारुण्यात पदार्पण केलेल्या, (सबर्दुघाः) सर्वप्रकारचे उत्तम व्यवहार पूर्ण करणाऱ्या, (शशयाः) कौमार्यावस्था ओलांडलेल्या (नव्यानव्याः) नवनवीन शिक्षण व अवस्था यांनी परिपूर्ण, (भवन्तीः) असलेल्या (युवतयः) पूर्ण यौवनात असणान्या स्त्रिया (देवानाम्) ब्रह्मचर्य व चांगले नियमानी युक्त पूर्ण विद्वान बनलेल्या (एकम्) अद्वितीय (महत्) महान (असुरत्वम्) प्रज्ञाशास्त्रशिक्षण युक्त प्रज्ञेत रममाण भावार्थासह तरुण पतींना प्राप्त करून (आधुनयन्ताम्) त्यांच्या पासून गर्भ धारण करतात. स्त्रियांनी कथा चुकूनसुद्धा बालपणी पुरुषाचा विचार मनात आणू नये. कारण तसे कर्मच इहलोकी व परलोकी सुखाचे साधन आहे. बालविवाहामुळे जितके नुकसान पुरुषाचे होते त्याहून अधिक स्त्रीचे नुकसान होते॥२॥

पूर्वीरहं शरदः शश्रमाणा दोषावस्तो रुषसो जरयन्तीः । मिनाति श्रियं जरिमा तनूनामप्यू नु पत्नीर्वृषाणो जगम्यु: ।।३।।-ऋ० मं० १। सू० १७९। मं० १।।

ज्याप्रमाणे (नु) शीघ्र (शश्रमाणाः) अत्यंत श्रम म्हणजे पुरुषार्थ करणारे (वृषणः) वीर्यसंचन करण्यास समर्थ पूर्ण यौवनयुक्त पुरुष (पत्नीः) युवावस्थेतील हृदयांना प्रिय स्त्रियांना(जगम्युः) प्राप्त करून पूर्णशंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक आयुष्य आनंदाने उपभोगून पुत्रपौत्रादिकांसह सुखाने एकत्र राहतात; त्याचप्रमाणे इतर स्त्रीपुरुषांनीही सदोदित राहावे. तसेच, (पूर्वीः) पूर्वी व हल्ली असणारे (शरदः) शरद ऋतू व (उषसः) प्रभातकाळच्या वेळा (जरयन्तीः) ज्याप्रमाणे वृद्धावस्थेला प्राप्त करतात व नाहीसेही करतात किंवा (दोषाः) रात्री व (वस्तोः) दिवस हे ज्याप्रमाणे (तनूनाम्) शरीरांची (श्रियम्) शोभा (जरिमा) अतिशय वाढवितात किंवा ती (मिनाति) नाहीशी करतात त्याप्रमाणे (अहम्) मी स्री अथवा पुरुष (उ) चांगल्याप्रकारे निश्चयपूर्वक ब्रह्मचर्याचे पालन करून, उत्तम विद्या, सुशिक्षण प्राप्त करून, शरीर व आत्मा यांचे बळ आणि तारुण्य प्राप्त करून विवाह करीन. त्यानेच मला सुख मिळेल. त्याविरुद्ध वर्तन करणे हे वेदाच्या विरुद्ध असल्यामुळे असा विवाह कधीही सुखकारक होत नाही. ॥३॥

    जोपर्यंत अशा प्रकारे सर्व ऋषीमुनी, राजेमहाराजे,आर्य लोक ब्रह्मचर्य पालन करून विद्याध्ययन पूर्ण

केल्यावरच स्वयंवर पद्धतीने विवाह करीत असत तोपर्यंत या देशाची सतत उन्नती होत होती. परंतु जेव्हापासून ब्रह्मचर्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. विद्याभ्यास थांबला आणि पराधीन अशा बाल्यावस्थेत आईबापांच्या इच्छेप्रमाणे विवाह होऊ लागले तेव्हापासून या आर्यावर्त देशाची अवनती उत्तरोत्तर होऊ लागली. म्हणून ही वाईट प्रथा बंद करून सज्जनांनी पूर्वीप्रमाणे स्वयंवर विवाह करावे ते विवाह वर्णानुसार झाले पाहिजेत आणि वर्णव्यवस्थाही गुण-कर्म-स्वभावानुसार असली पाहिजे.

गुण कर्मानुसार वर्ण व्यवस्था

(प्रश्न) ज्याचे आईवडील ब्राह्मण असतात तोच ब्राह्मण होतो आणि ज्यांचे आईवडील इतर वर्णाचे असतील तर त्यांची मुले कधीतरी ब्राह्मण होऊ शकतात काय? (उत्तर) होय. पुष्कळ झाले, आज होत आहेत आणि पुढे होतीलही. जसे, छांदोग्य उपनिषदातील अज्ञातकुल जाबाल ऋषी, महाभारतातील क्षत्रिय वर्णाचे विश्वामित्र आणि चांडाळ कुळात जन्मलेले मातंग ऋषी हे ब्राह्मण झाले होते. आजही ज्याने उत्तम ज्ञान मिळविले आहे व जो सुस्वभावी आहे तो ब्राह्मणच आहे आणि मूर्ख माणूस हा शुद्रच असतो. यापूढेही असेच होत राहणार आहे (प्रश्न) जे शरीर ज्या वर्गाच्या रजोवीर्यापासून उत्पन्न झाले आहे ते बदलून दुसन्या वर्णाचे कसं काय होऊ शकते ? (उत्तर) ब्राह्मण शरीर रज व वीर्य यांच्या संयोगाने होत नसते ते खालील नियमांच्या पालनाने होते,

स्वाध्यायेन जपैर्होमैस्त्रैविद्येनेज्यया सुतैः। महायनैश्च यौश्च ब्राह्यं क्रियते तनुः॥ मनु०।। अ.२ ।। श्लो.२८।।

याचा अर्थ पूर्वी सांगितला आहे. तरीपण तो पुनः संक्षेपाने सांगतो. (स्वाध्यायेन) अध्ययन-अध्यापन, (जपैः) विचार करणे व करविणे, नानाविध होमांची अनुष्ठाने, संपूर्ण वेदांचे शब्द, अर्थ, संबंध, स्वरोच्चारण यांसह शिकणे-शिकविणे, (इज्यया) पौर्णमासी, इष्टि वगैरे करणे, पूर्वी सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक (सुतैः) धर्माने प्रजोत्पादन करणे, (महायज्ञेश्व) पूर्वोक्त ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, वैश्वदेवयज्ञ आणि अतिथियज्ञ, (यज्ञैश्च) अग्नियोष्टीमादी यज्ञ, विद्वानांचा सत्संग, सत्कार, सत्यभाषण, परोपकारादी सत्कर्म करणे आणि संपूर्ण शिल्पविद्यादी शिकणे, दुराचार सोडून सदाचाराचे वर्तमाने (इयम्) हे (तनुः) शरीर (ब्राह्मी) ब्राह्मण वर्णाचे (क्रियते) केले जात असते. हा श्लोक तुम्ही मान्य करीत नाही काय? अवश्य मान्य करता. मग रज व वीर्य यांच्या संयोगापासून वर्णव्यवस्था का समजता? मी एकटाच तसे मानतो असे नसून परंपरेने पुष्कळ लोक असेच मानतात. (प्रश्न) तुम्ही परंपरेचेही खंडन करणार काय (उत्तर) नाही. पण तुमच्या चुकीच्या समजुतीला न मानून तिचे खंडनही करतो. (प्रश्न) आमची समजूत चुकीची व तुमची बरोबर आहे, याला काय आधार ? (उत्तर) याला आधार हाच की तुम्ही पाच-सात पिढ्यांमध्ये असणाऱ्यास सनातन व्यवहार असे समजता आणि आम्हीं वेद व सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंतची परंपरा मानतो. असे बघा, ज्याचा पिता सज्जन असतो त्याचा पुत्र दुर्जन, आणि ज्याचा पुत्र सज्जन असतो त्याचा पिता दुर्जन अथवा कोठे-कोठे दोघेही सजन किंवा दुर्जन असल्याचे आढळून येते. तरीही तुम्ही भ्रमात पडला आहात. मनु महाराजांनी काय म्हटले आहे पाहा:

(प्रश्न) येनास्य पितरो याता येन याता पितामहाः। तेन यायात्सतां मार्ग तेन गच्छन्न रिष्यते। मनु०।। अ.४ ।। श्लो.१७८।।

ज्या मागनि पिता, आजोबा गेले असतील त्या मागनि मुलाने जावे. परंतु (सताम्) जे वाडवडील सत्पुरुष, सजन असतील त्यांच्याच मागने जावे आणि जे वाडवडील दुष्ट, दुर्जन असतील तर त्यांच्या मार्गाने कधीही जाऊ नये. कारण उत्तम धर्मात्मा पुरुषांच्या मार्गाने गेल्यास कधीही दुःख होत नाही. ही गोष्ट तुम्ही मान्य करता की नाही? (उत्तर) होय, मान्य करतो. (प्रश्न) आणि असे पाहा की परमेश्वराने वेदात जे सांगितले आहे तेच सनातन आहे आणि त्याच्या विरुद्ध जे काही आहे ते कधीही सनातन होऊ शकत नाही. असेच सर्व लोकांनी मानले पाहिजे की नाही? (उत्तर) अवश्य मानले पाहिजे. जो कोणी असे मानीत नसेल त्याला असे सांगा की, एखाद्याचा बाप दरिद्री असेल आणि त्याचा मुलगा धनाढ्य असेल तर त्याने आपल्या पित्याच्या दारिद्रयाचा अभिमान बाळगण्यासाठी संपत्ती फेकून द्यावी काय ? ज्याचा बाप आंधळा आहे म्हणून त्याच्या मुलाने डोळे फोडून घ्यावेत काय? ज्याचा बाप कुकर्मी असेल त्या पुत्रानेही कुकर्मच करावे काय ? मुळीच नाही. परंतु पूर्वजांची जी उत्तम कामे असतील त्यांचे अनुकरणे, आणि दुष्कर्माचा त्याग करणे हे सर्वांना अत्यावश्यक आहे

    जो कोणी रजोवीर्याच्या संयोगाने वर्णाश्रम व्यवस्था मानतो आणि ती गुणकर्मानुसार मानीत नसेल तर

त्याला असे विचारले पाहिजे की जर कोणी आपला वर्ण सोडून नीच, अन्त्यज किंवा खिश्चन, मुसलमान झाला असेल त्यालाही ब्राह्मण का मानीत नाही ? येथे तुम्ही असेच म्हणाल की त्याने ब्राह्मणाची कर्म सोडून दिली, म्हणून तो ब्राह्मण नाही. यावरून असेही सिद्ध होते की जे ब्राह्मणादी लोक उत्तम कर्म करतात त्यांनाच ब्राह्मण समजावे तसेच पूर्वी नीच असलेली व्यक्ती उच्चवर्णाचे गुण-कर्म-स्वभाव बाळगणारी असेल तर तिलाही उच्च वर्गीय समजावे आणि उच्च वर्गाचे लोक वर्णानुसार कर्मे करीत नसतील तर त्यांची गणना योग्य त्या वर्गात अवश्य करावी

(प्रश्न) ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।

       ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्या  शूद्रो अजायत ।।
    हा यजुर्वेदातील ३१व्या अध्यायातील ११ वा मंत्र आहे. याचा अर्थ आहे की ईश्वराच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उदारातून वैश्य व पायांपासून शूद्र उत्पन्न झाले. म्हणून ज्याप्रमाणे मुख हे बाहू आदी होऊ शकत नाहीत आणि बाहू आदि मुख होऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे ब्राह्मण हे क्षत्रियादी किंवा क्षत्रियादी हे ब्राह्मण होऊ शकत नाहीत.

(उत्तर) या मंत्राचा जो अर्थ तुम्ही लावला आहे तो बरोबर नाही. कारण येथे पुरुष या शब्दाची अनुवृत्ती म्हणजे निराकार, सर्वव्यापक परमात्मा असा आहे, तो निराकार असल्यामुळे त्याला मुखादी अवयव असू शकत नाहीत ज्याला मुखादी अवयव असतील तो पुरुष अर्थात व्यापक नाही आणि जो व्यापक नसेल तो सर्वशक्तिमान जगाचा निर्माता, धारणकर्ता, प्रलयकर्ता, जीवांच्या पापपुण्याची व्यवस्था किंवा निर्णय करणारा, सर्वज्ञ, अजन्मा मरणरहीत इत्यादी विशेषणयुक्त होऊ शकत नाही. म्हणून या मंत्राचा अर्थ असा आहे की, जो (अस्य) पूर्ण व्यापक परमेश्वराच्या सृष्टीमध्ये मुखाप्रमाणे सर्व अवयवांमध्ये प्रमुख व उत्तम गुणांनी युक्त असेल तो (ब्राह्मणः) ब्राह्मण होय. (बाहू) ‘बाहुर्वै बलं बाहुर्वै वीर्यम्’ -शतपथब्राह्मण. बळ व वीर्य म्हणजे बाहू. ते ज्यामध्ये अधिक असते तो (राजन्यः) क्षत्रिय . (ऊरू) कमरेच्या खालचा व गुडघ्याच्या वरचा जो भाग त्याला ऊरू म्हणतात. जो सर्व पदार्थांच्या प्राप्तीसाठी व सर्व देशांत उरूच्या बळावर प्रवेश करतो, जातो व येतो तो (वैश्यः) वैश्य होय आणि जो (पद्भ्याम्) पायाप्रमाणे नीच अंग सदृश मूर्खत्वादि गुणवाला असेल तो शूद्र होय. अन्यत्र शतपथादी ब्राह्मण ग्रंथामध्येही या मंत्राचा असाच अर्थ केला आहे.

यस्मादेते मुख्यास्तस्मान्मुखतो ह्यसृज्यन्त । इत्यादि

     ज्यामुळे हे मुख्य आहे ते मुखापासून उत्पन्न झाले असे म्हणणे सुसंगत ठरते. म्हणजे असे की ज्याप्रमाणे मुख हे सर्व अंगामध्ये श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे पूर्ण विद्या आणि उत्तम गुण-कर्म-स्वभाव यांनी युक्त असल्यामुळे मनुष्यजातीमध्ये उत्तम ब्राह्मण म्हटला जातो. परमेश्वर निराकार असल्यामुळे त्याला मुख वगैरे अवयव असू शकत नाहीत. तेव्हा त्याच्या मुखापासून ब्राह्मण उत्पन्न होणे असंभव आहे. वंध्या स्त्रीच्या मुलाचे लग्न झाले असे म्हणण्यासारखेच हे आहे. मुखादी अवयवांपासून ब्राह्मण उत्पन्न झाले असते तर उपादान कारणाप्रमाणे ब्राह्मणादिची आकृति अवश्य असती. उदाहरणार्थ, मुखाचा आकार गोल असतो. म्हणून मुखापासून उत्पन्न होणाऱ्या ब्राह्मणाचे शरीर तोंडासारखे वाटोळे असावयास हवे होते. क्षत्रियांचे शरीर बाहूंसारखे, वैश्यांचे मांडीसारखे आणि शुद्रांचे शरीर पायांसारखे आकाराचे असावयास हवे होते. परंतु तसे असत नाही. म्हणून जे कोणी प्रश्न करील की मुखापासून उत्पन्न झाले त्यांना ब्राह्मण ही संज्ञा प्राप्त झाली परंतु तशी तुमची नाही कारण जसे इतर लोक गर्भाशयातून जन्माला येतात तसेच तुम्हीही जन्मला आहात. तुम्ही काही मुखातून उत्पन्न झाला नाहीत. म्हणून तुम्ही ब्राह्मण या संज्ञेचा अभिमान करता आहात म्हणून तुम्ही केलेला अर्थ चुकीचा असून आम्ही लावलेला जो अर्थ आहे तो बरोबर आहे. असेच इतर ग्रंथामध्येही सांगितलेले आहे. उदाहरणार्थ,

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम्। क्षत्रियाज्जातमेवन्तु विद्याद्वैश्यात्तथैव च॥ मनु०।। अ.१० ।। श्लो.६५।।

जो शुद्ध कुळात उत्पन्न होऊनही ज्याच्या अंगी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्यासारखे गुण, कर्म व स्वभाव असतील तर तो शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य होईल. याचप्रमाणे जो ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य कुळात उत्पन्न झाला असेल आणि त्याचे गुण, कर्म, स्वभाव हे शूद्रसारखे असतील तर तो शूद्र होतो. अर्थात चार वणपैिकी ज्या-ज्या वर्णाचे गुण, कर्म व स्वभाव स्त्रीपुरुषांमध्ये असतील त्या-त्या वर्णाची ती स्त्री किंवा तो गणला जाईल.

धर्मचर्य्यया जघन्यो वर्णः पूर्वं पूर्वं वर्णमापद्यते जातिपरिवृत्तौ।।१।। अधर्मचर्य्यया पूर्वो वर्णो जघन्यं जघन्यं वर्णमापद्यते जातिपरिवृत्तौ।।२।।

    ही सूत्रे आपस्तंबातील आहेत.
    धर्माप्रमाणे आचरण करून खालच्या वर्गातील माणूस आपल्याहून उत्तम वर्णात जाऊ शकतो आणि

त्याच वर्गात त्याची गणना केली जावी. ज्या वर्णाची योग्यता त्यास असेल. ॥१॥

    याचप्रमाणे अधर्माचरण करणारा उत्तम वर्णातील मनुष्य आपल्यापेक्षा खालच्या वर्णास प्राप्त होतो आणि त्याची गणना त्याच वर्गात केली जावी. ॥२॥
    ज्याप्रमाणे पुरुष ज्या वर्णाच्या योग्यतेचा असतो त्या वर्णाचा तो आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीतही समजावे. यावरून असे सिद्ध होते की असे झाल्याने सर्व वर्ण आपापल्या गुण-कर्म-स्वभावानुसार पवित्रतेने राहतात. अर्थात ब्राह्मणकुळात कुणीही क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्याप्रमाणे राहू नये आणि क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्णही शुद्ध राहतात. त्यायोगे वर्णसंकर होणार नाही; आणि मग कोणत्याही वर्णाची निंदा अथवा तो अयोग्य आहे असे देखील होणार नाही.

(प्रश्न) एखाद्याला एकच मुलगा किंवा मुलगी असेल आणि तो किंवा ती दुसऱ्या वर्गात प्रविष्ट झाली तर त्यांच्या आईबापांची सेवा कोण करणार? शिवाय त्याने वंशही खुंटणार याची काय व्यवस्था असली पाहिजे? (उत्तर) कुणाचाही सेवाभंग अथवा वंशच्छेद होणार नाही. कारण त्यांना स्वतःच्या मुलगा अथवा मुलगी यांच्या बदली त्यांच्या स्वत:च्या वर्णास योग्य असा मुलगा किंवा मुलगी विद्यासभा व राजसभा यांच्या व्यवस्थेप्रमाणे मिळेल. त्यामुळे काहीही अव्यवस्था होणार नाही.

   ही गुणकर्मानुसार वर्णाची व्यवस्था. मुलींच्या सोळाव्या वर्षी आणि मुलांच्या पंचविसाव्या वर्षी परीक्षा

करून निश्चित केली पाहिजे आणि त्याप्रमाणे ब्राह्मण वर्णाचा ब्राह्मणी स्त्रीशी, क्षत्रिय पुरुषाचा क्षत्रिय स्त्रीशी, वैश्य पुरुषाचा वैश्य स्त्रीशी व शुद्ध पुरुषाचा शूद्र स्त्रीशी विवाह करावा, तेव्हाच आपापल्या वर्णाचे कर्म आणि परस्पर प्रेम सुद्धा यथायोग्य राहिल.

या चारही वर्णाची कर्तव्यकर्मे व गुण पुढीलप्रमाणे आहेत:

अध्यापनं अध्ययनं यजनं याजनं तथा । दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्मणानां अकल्पयत् ।।१।। मनु०।। अ.१० ।। श्लो.६५।।

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च। ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम्।।२।। भ० गी०।। अ. १८।। श्लो. ४२।।

शिकणे, शिकविणे, यज्ञ करणे व करविणे, दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कमी आहेत. परंतु ‘प्रतिग्रहः प्रत्यवरः’॥ मनु.॥ म्हणजे प्रतिग्रह दान घेणे हे नीच कार्य आहे॥१ ॥ (शमः) मनामध्ये वाईट काम करण्याची इच्छा देखील न आणणे आणि त्याला अधर्म करण्यास कधीही प्रवृत्त होऊ न देणे, (दमः) कान, डोळे आणि इंद्रियांना अन्यायाचरणापासून परावृत्त करून धर्ममार्गावरून चालविणे, (तपः) सदैव ब्रह्मचारी जितेंद्रिय राहून धर्मानुष्ठान करणे, (शौच)

अद्भिर्गात्राणि शुध्यन्ति मनः सत्येन शुध्यति । विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिर्ज्ञानेन शुध्यति॥ मनु०।। अ.५ ।। श्लो.१०९।।

पाण्याने बाह्य अंग, सत्याचरणाने मन, विद्या व धर्मानुष्ठान यांनी जीवात्मा आणि ज्ञानाने बुद्धि पवित्र होते. आतील रागद्वेषादी दोष आणि बाहेरील मळ काढून शुद्ध राहणे म्हणजे सत्य व असत्याचे विवेकपूर्वक सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करणे या मागनि मन पवित्र होते. (क्षान्तिः) म्हणजे निंदा, स्तुती, सुख, दुःख, शीतोष्ण, क्षुधा, तृष्णा, हानी, लाभ, मानापमान, हर्ष, शोकचा त्याग करून धर्मावर दृढ राहणे, (आर्वजम्) कोमलता, निरभिमान, सरलता, सरळ स्वभाव बाळगणे व कुटिलपणा वगेरे दोघांचा त्याग करणे. (ज्ञानम्) सर्व वेदादिशास्त्रे सांगोपांग शिकून व शिकविण्याची क्षमता, विवेक, सत्याचा निर्णय. जी वस्तू जशी असेल तशीच समजून घेणे म्हणजे जडाला जड (निर्जीवाला निर्जीव) व चेतनाला चेतन मानणे व जाणणे. (विज्ञानम्) पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत सर्व पदार्थाचे विशेष ज्ञान मिळवून त्यांचा यथायोग्य उपयोग करून घेणे (आस्तिक्यम्) वेद, ईश्वर, मुक्ती, पूर्वजन्म, धर्म, विद्या, सत्संग, माता, पिता, आचार्य व अतिथि यांची सेवा कधीही न सोडणे आणि कधीही निंदा न करणे. ही पंधरा कर्में व गुण ब्राह्मण वर्णांच्या मनुष्यांमध्ये अवश्य असले पाहिजेत. ॥२॥

क्षत्रियांचे गुण, कमें व स्वभाव

प्रजानां रक्षणं दानं इज्याध्ययनं एव च । विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासतः॥१॥ मनु०।। अ.१ ।। श्लो.८९।।

न्यायाने प्रजेचे रक्षण, म्हणजे पक्षपात न करता सज्जनांचा सत्कार व दुर्जनांचा तिरस्कार करणे, सर्व प्रकारे सर्वांचे पालन, (दानम्) विद्या, धर्मप्रवृत्ती व सत्पात्रांची सेवा यांमध्ये धनादी पदार्थाचा व्यय, (इज्या) अग्निहोत्रादी यज्ञ करणे अथवा करविणे, (अध्ययनम्) वेदादी शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे, ( विषयेषु अप्रसक्तिः) विषयवासनांमध्ये न गुंतता जितेंद्रिय राहुन सदा शरीर व आत्माद्वारा बलवान राहावे. ॥१॥

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्। दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्।।२।। भ० गी०।।अ. १८।। श्लो. ४३।।

(शौर्यम्) शेकडो, हजारो लोकांशी एकट्याने युद्ध करताना भय व वाटणे (तेजः) सदैव तेजस्वी म्हणजे दीनता रहित प्रगल्भतायुक्त दृढ राहणे, (धृतिः) धैर्यवान् बनणे, (दाक्ष्यम्) राजा व प्रजा संबंधीत व्यवहार व सर्व शास्त्रे यांमध्ये अत्यंत चतुर असणे, (युद्धे अपलायनम्) युद्धामध्ये हृढपणे व नि:शंक राहुन, युद्धापासून दूर पळून न जाणे अर्थात याप्रमाणे लढावे की निश्चित विजय होईल. पळून जाऊन अथवा शत्रूला चुकवून विजय होत असेल तर तसे करणे, (दानम्) दानशील असणे, (ईश्वरभावः) पक्षपातरहित सर्वांशी यथायोग्य वर्तन करणे, विचार करून देणे, प्रतिज्ञा पूर्ण करणे, कधीही वचनभंग होऊ न देणे ही अकरा कर्म व गुण क्षत्रिय वर्णाचे

वैश्याचे गुण व कामे

पशूनां रक्षणं दानं इज्याध्ययनं एव च । वणिक्पथं कुसीदं च वैश्यस्य कृषिं एव च ॥ मनु०।। अ.१।। श्लो.९०।।

(पशुक्षणम्) गायी, बैल वगैरे पशूचे पालनपोषण, वर्धन करणे, (दानम्) विद्या धर्म यांची वृद्धी करण्यासाठी व करविण्यासाठी धनादी खर्च करणे, (इज्या) अग्निहोत्रादी यज्ञ करणे, (अध्ययनम्) वेदादी शास्त्रांचे अध्ययन करणे, (वणिक्पथम्) सर्व प्रकारचा व्यापार करणे, (कुसीदम्) दरसाल दर शेकडा चार, सहा, आठ, बारा, सोळा किंवा वीस आणे त्यापेक्षा अधिक व्याज न घेणे आणि मूळ मुद्दलाच्या दुपटीपेक्षा जास्त रक्कम न घेणे. म्हणजे एक रुपया दिला असल्यास शंभर वर्षांनंतरही दोन रुपयाहून जास्त रक्कम न घेणे व न देणे आणि (कृषिम्) शेती करणे हे वैश्याचे गुण व कर्मे आहेत.

शूद्राचे गुण व कामे

एकं एव तु शूद्रस्य प्रभुः कर्म समादिशत् । एतेषां एव वर्णानां शुश्रूषां अनसूयया । मनु०।। अ.१ ।। श्लो.९१।।

शूद्रास उचित आहे की निंदा, ईर्ष्या, अभिमान आदी दोष सोडून ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची योग्य प्रकारे सेवा करणे आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह चालविणे. शूद्राचे हेच एकमेव कर्म व गुण होय.

    असे थोडक्यात वर्णाचे गुण व कर्मी लिहिली आहेत. ज्या पुरुषामध्ये ज्या वर्याचे गुण व कसे असतील

त्याला त्या वर्णाचा अधिकार द्यावा, अशी व्यवस्था ठेवल्यास सर्व माणसाची उन्नती होते. कारण उच्चवर्गीयांना सदैव अशी भीती वाटत राहील की आपली मुले मूर्खत्वादी दोषयुक्त राहिली तर ती शूद्र समजली जातील. तसेच मुलांनाही भिती राहील की आपण सदाचारी राहिलो नाही व विद्यार्जन केले नाहीतर आपल्याला शुद्ध बनावे लागेल. याउलट खालच्या वर्गातील लोकांना वरच्या वर्गात जाण्यास या व्यवस्थेमुळे प्रोत्साहन मिळेल.

    विद्या व धर्म यांच्या प्रसाराचा अधिकार ब्राह्मणांना द्यावा. कारण ते पूर्ण विद्यावान व धार्मिक असल्याने हे काम उत्तम प्रकारे करू शकतात. क्षत्रियांना राज्य करण्याचा अधिकार दिल्यास कधी राज्याची हानी अथवा देशावर संकट येत नाही. पशुपालनादिकाचा अधिकार वैश्यांनाच असणे योग्य होय. कारण ते काम ते उत्तम प्रकारे करू शकतात. शूद्रांना सेवेचा अधिकार यासाठी आहे की तो विद्याशून्य मूर्ख असल्याने ज्ञान विज्ञानांसंबंधी काहीही काम करू शकत नाही. परंतु ते शारीरिक सर्व कामे करू शकतात. अशा प्रकारे चारही वर्णांना त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार कार्य करण्यास प्रवृत्त करणे राजाचे व सभ्य सज्जनांचे काम आहे

विवाहाची लक्षणे (व प्रकार)

ब्राह्मो दैवस्तथैवार्षः प्राजापत्यस्तथासुरः । गान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोऽधमः ॥ मनु०।। अ.३।। श्लो.२१।।

विवाह आठ प्रकारचे होतात

ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस व पैशाच या विवाहांची ही व्यवस्था आहे की (१) वधू व वर दोघेही यथावत ब्रह्मचर्य पूर्ण विद्वान, धार्मिक व सुशील असावे त्यांचा एकमेकांच्या प्रसन्नतापूर्वक विवाह होणे त्याला ब्राह्म विवाह असे म्हणतात(२) विस्तृत यज्ञ करीत असता ऋत्विजाचे काम करणाऱ्या जावयास अलंकारयुक्त कन्या देणे याला 'दैव', (३) वराकडून काही घेऊन विवाह होणे, हा ‘आर्ष' (४) ‘प्राजापत्य' विवाहात केवळ धर्माच्या वृद्धीसाठी वधूवरांचे लग्न लावले जाते. (५) वधू व वर या दोघांनाही काही देऊन केला जाणारविवाह ’आसुर' होय(६) नियम व काळ-वेळ यांना सोडून काही कारणाने वधू व वर यांचा स्वेच्छेने परस्पर संयोग होणे याला गांधर्व, (७) लढाई करून, बलात्कार म्हणजे हिसकाहिसकी करून किंवा कपटाने मुलीचे ग्रहण किंवा हरण करून केला जाणारा विवाह हा 'राक्षस' विवाह होय. (८) झोपलेल्या अथवा मद्य वगैरे पिऊन वेड्या मुलीशी बलात्काराने संयोग करणे हा 'पैशाच ' विवाह होय.

     या सर्व विवाहांमध्ये ब्राह्मविवाह हा सर्वोत्कृष्ट होय. दैव व प्राजापत्य हे विवाह मध्यम-प्रतीचे आणि आर्ष, असुर गंधर्व हे निकृष्ट प्रतीचे, राक्षस हा अधम प्रकारचा आणि पैशाच हा महाभ्रष्ट विवाह होय. म्हणून हा निश्चय ठेवला पाहिजे की लग्न होण्यापूर्वी मुलगा व मुलगी यांची एकांतात गाठ पडावयास नको कारण यौवनावस्थेत स्त्रीपुरुषांचा एकान्तवास हा दोषास्पद असतो. परंतु जेव्हा वर व वधू यांच्या विवाहाची वेळ येईल म्हणजे त्यांचा ब्रह्मचर्याश्रम व विद्याभ्यासपूर्ण होण्यास एक वर्ष अथवा सहा महिने अवकाश असेल, तेव्हा त्यांना एकमेकांची चित्रे, फोटो दाखवावे अथवा प्रतिकृती तयार करून मुलींच्या अध्यापिकांकडे मुलांची व मुलांच्या अध्यापकांकडे मुलींची छायाचित्रे पाठवून द्यावीत ज्यांचे रंगरूप जुळत असेल त्यांचा इतिहास अर्थात जन्मापासूनची माहिती अद्यावत मिळवून अध्यापकांनी जन्मपत्रिका पुस्तिका असल्यास मागवून ती तपासावी. ज्यांचे गुणकर्म व स्वभाव सारखे असतील तेव्हा ज्याचे ज्याचे बरोबर जिचा जिचा विवाह होणे योग्य वाटले त्यांना परस्परांची छायाचित्रे व जीवनवृत्तांत पाहण्यास द्यावेत व त्यांचे त्याबाबतीतील अभिप्राय निवेदन करावा तो जाणावा तेव्हा दोघांनी एकमेकांशी विवाह करण्याचे ठरविले तर त्या दोघांचा समावर्तन संस्कार एकाच वेळी करावा.
     वधू व वर या दोघांची इच्छा अध्यापकांसमोर विवाह करण्याची असल्यास तसे करावे; नाहीतर मुलीच्या आईवडिलांच्या घरी विवाह होणे योग्य होय. अध्यापक, मुलीचे आईवडील आणि इतर सभ्य लोक यांच्यासमोर वधूवरांनी एकमेकांशी जे काही बोलावयाचे असेल ते बोलावे शास्त्रार्थ करावा आणि काही गुप्त गोष्ट विचारावयाची असेल तर ती सर्वांच्या देखत कागदांवर लिहून ते कागद एकमेकांच्या हातात द्यावेत; व अशा प्रकारे प्रश्नोत्तरे करावीत.
    जेव्हा दोघांमध्ये दृढ प्रेम विवाह करण्याचे निर्माण होऊन तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था करावी. त्यायोगे आतापर्यंत ब्रह्मचर्यपालन व विद्याध्ययनरूपी तपश्चर्या च कष्ट केल्याने शिणलेले त्यांची शरीरे दुर्बल झाली होती ती चंद्राच्या कलेप्रमाणे विकसित होऊन थोड्याच दिवसात परिपुष्ट होतील. त्यानंतर वधू रजस्वला होऊन ज्या दिवशी शुद्ध होईल त्या दिवशी वेदी व मंडप रचून अनेक सुगंधी द्रव्ये तूप वगैरेंनी होम करावा आणि अनेक विद्वान स्त्रीपुरुषांचा यथायोग्य सत्कार करावा. नंतर जो दिवस ऋतुदानास योग्य असेल त्या दिवशी 'संस्कारविधी' या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सर्व विधी करून रात्री दहा वाजता किंवा मध्यरात्री अत्यंत प्रसन्न चित्ताने सर्वांसमोर पाणि ग्रहण करून विवाहाचा विधी पूर्ण करावा आणि मग एकान्तसेवन करावे. वीर्यस्थापनेच्या विधीप्रमाणे पुरुषाने वीर्यस्थापन करावे आणि वीयकर्षणाच्या विधीप्रमाणे स्त्रीने वीयकर्षण करावे. ब्रह्मचर्यानि प्राप्त झालेल्या वीर्याचा शक्यतोवर अपव्यय होऊ देऊ नये. कारण वीर्यापासून अथवा रजापासून जे शरीर निर्माण होते ते अपूर्व व उत्तम संतानाचे असते. जेव्हा वीर्याचे गर्भाशयात पतन होण्याची वेळ येताच स्त्री व पुरुष या दोघांनीही स्थिर राहावे आणि नाकासमोर नाक व डोळ्यांसमोर डोळे येतील अशाप्रकारे शरीर सरळ ठेवावे आणि अत्यंत प्रसन्नचित्त ठेवावे इकडे-तिकडे हलू नये. पुरुषाने आपले शरीर ढीले सोडावे आणि स्त्रीने वीर्याचा स्वीकार करताना अपान वायू वर ओढून घ्यावा, योनीचा संकोच करून आणि वीर्य वर आकर्षण करून ते गर्भाशयात स्थिर करावे. त्यानंतर दोघांनीही शुद्ध पाण्याने स्नान करावे.
     गर्भधारणा झाली आहे की नाही याचे पूर्ण ज्ञान विदुषी स्त्रीला त्याचवेळी होऊन जाते. परंतु एक

महिन्यानंतर येणारी पाळी चुकली की गर्भ राहिला असल्याविषयी सर्वांची खात्री होते. गरम दुधात सुंठ, केशर, अश्वगंधा, वेलदोडाव सालममिश्री घालून आधीच तयार व थंड केलेले दूध प्यावे व मग पतिपत्नींनी आपापल्या वेगवेगळ्या शय्येवर झोपावे. जेव्हा जेव्हा गर्भाधान करण्यात येईल तेव्हा तेव्हा हा विधी करणे उचित होय

     त्यानंतर एक वर्षभर पतिपत्नींनी कधीही समागम करू नये. अशाप्रकारे ब्रह्मचर्याचे पालन केल्यास मूल चांगले निपजते आणि दुसरे मूलही उत्तम होते. असे केले नाही तर वीर्य व्यर्थ जाते. दोघांचे आयुष्य कमी होते व अनेक प्रकारचे रोग होतात. मात्र दोघांतील संभाषणादी बाह्य व्यवहार प्रेमपूर्ण अवश्य ठेवावा. पुरुषाने विर्याचे व स्त्रीने गर्भाचे रक्षण करावे. भोजन व आच्छादन यांची व्यवस्था अशा प्रकारे करावी की पुरुषाचे वीर्य स्वप्नातही नष्ट होऊ नये आणि गर्भातील बालकाचे शरीर अत्यंत देखणे, धष्टपुष्ट, पराक्रमयुक्त बसून दहाव्या महिन्यात त्याचा जन्म व्हावा. चौथ्या महिन्यापासून व विशेषत: आठच्या महिन्यापासून गर्भाला फार जपले। पाहिजे. गर्भवती स्त्री कधीही रेचक, रूक्ष, मादक आणि बुद्धी व बळ यांचा नाश करणारे पदार्थ खाऊ नयेत. त्या ऐवजी दूध, तूप, उत्तम, तांदूळ, गहू, मूग, उडीद इत्यादी पदार्थांचे देशकालाचा विचार करून युक्तिपूर्वक सेवन करावे.
     गर्भावर चौध्या महिन्यात पुंसवन आणि आठव्या महिन्यात सीमंतोन्नयन असे दोन संस्कार विधिपूर्वक करावेत. मूल जन्मल्यानंतर बाळ व बाळंतीण यांच्या शरीराचे रक्षण खूप काळजी घेऊन करावेवी प्रसूत होण्याच्या आधीच सुंठपाक किंवा सौभाग्यसुंठी पाक तयार करून ठेवावा. बाळंतिणीला किंचित उष्ण अशा सुगंधी पाण्याने स्नान घालावे; व मुलालाही न्हाऊ घालावे. नाळ कापतांना मुलाच्या बेंबीजवळ मऊ सुताने नाळ बांधावी आणि त्यामध्ये चार अंगुळे अंतर सोडून नाळेचा पुढील भाग कापून टाकावा. नाळ अशा पद्धतीने बांधावी की शरीरातील रक्ताचा एकही थेंब बाहेर जाणार नाही. त्यानंतर प्रसूतीची ती जागा शुद्ध करून त्या ठिकाणी दाराच्या आतील बाजूस तूप व सुगंधी द्रव्ये यांचा होम करावा. त्यानंतर मुलाच्या बापाने त्याच्या कामात 'वेदोऽसीति' म्हणजे तुझे गाव वेद आहेअसे म्हणून तूप व मध यांनी सोन्याच्या सळईन मुलाच्या जिभेवर 'ओ३म्' अक्षर लिहावे; आणि त्याच सळईने त्याला तूप व मध चाटवावा. मुलाला हवे असल्यास त्याच्या आईन दूध पाजावे. आईला दूध नसल्यास एखाद्या स्त्रीची तपासणी करून तिचे दुध पाजावे.
     त्यानंतर दुसऱ्या एका शुद्ध हवा असलेल्या खोलीमध्ये बाळ व बाळंतीण यांना ठेवून तेथे सकाळी व

संध्याकाळी सुगंधित तुपाचा होम करावा. सहा दिवसापर्यंत आईने मुलाला अंगावर पाजावे. तिने शरीर पुष्ट होण्यासाठी उत्तम व पौष्टिक आहार घ्यावा आणि योनिसंकोच आदी करावे. सहाव्या दिवशी स्त्रीने बाहेर पडावे व मुलाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई ठेवावी. त्या दाईला उत्तम खाऊपिऊ घालावे. तिने मुलाला अंगावर पाजावे व त्याचे पालनपोषण करावे. मात्र मुलाच्या आईनेही मुलावर पूर्ण लक्ष ठेवावे आणि त्याच्या पालनपोषणात मुळीच हेळसांड होऊ नये. स्तनांतील दूध स्त्रवण होऊ नये म्हणून स्तनांच्या अग्रभागांवर विशिष्ट लेप लावावा. तसेच आपले खाणेपिणे हा व्यवहार यथायोग्य ठेवावा.

     'संस्कारविधि’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे नामकरणादी संस्कार योग्यवेळी केला जावा. स्त्री पुनः

रजस्वला होईल तेव्हा ती शुद्ध झाल्यावर पूर्वीप्रमाणेच ऋतुदान करावे.

ऋतुकालाभिगामी स्यात्स्वदारनिरतः सदा । पर्ववर्जं व्रजेच्चैनां तद्व्रतो रतिकाम्यया। मनु०।। अ.३ ।। श्लो.४५।।

जो आपल्याच पलीशी प्रसन्न असतो व ऋतुकाली रममाण होतो तो गृहस्थ असूनही ब्रह्मचारी असल्यासारखा आहे

संतुष्टो भार्यया भर्ता भर्त्रा भार्या तथैव च । यस्मिन्नेव कुले नित्यं कल्याणं तत्र वै ध्रुवम् ॥१ ॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.६०।।

ज्या कुळात पत्नीवर पती व पतीवर पत्नी हे पूर्णपणे संतुष्ट असतात त्याच कुळात सर्व प्रकारचे सौभाग्य व ऐश्वर्यं निवास करते. जेथे पतिपत्नीमध्ये कलह असतो तेथे दुर्भाग्य व दारिद्रय स्थिरावते. ॥ १॥

यदि हि स्त्री न रोचेत पुमांसं न प्रमोदयेत् । अप्रमोदात्पुनः पुंसः प्रजनं न प्रवर्तते ।।२॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.६१।।

जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करीत नाही व पतीला संतुष्ट ठेवीत नाही तर पतीच्या अप्रसन्नतेने कामभावना उत्पन्न होत नाही. ॥२॥

स्त्रियां तु रोचमानायां सर्वं तद्रोचते कुलम्। तस्यां त्वरोचमानायां सर्वं एव न रोचते ।।मनु०।। अ.३ ।। श्लो.६२।।

स्त्री प्रसन्न असली की सारे कुळ प्रसन्न राहते व तिच्या अप्रसन्नतेत सर्व कुटुंब अप्रसन्न म्हणजे दु:खदायक होत जाते

पितृभिर्भ्रातृभिश्चैताः पतिभिर्देवरैस्तथा। पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणं ईप्सुभिः ॥१ ॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.५५।।

ज्यांना आपले खूप कल्याण व्हावे असे वाटत असेल अशा पिता, भ्राता, पती व दीर यांनी स्त्रियांना भूषणादिकांनी प्रसन्न ठेवावे. ॥१॥

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥२॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.५६।।

ज्या घरात स्त्रियांचा सत्कार होतो तेथे विद्यासंपन्न पुरुष, देव या संज्ञेला पात्र होऊन ते आनंदाने क्रीडा करतात आणि ज्या घरात स्त्रियांना सन्मानाने वागविले जात नाही तेथे केलेल्या सर्व क्रिया निष्फळ होतात.॥२॥

शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलम्। न शोचन्ति तु यत्रैता वर्धते तद्धि सर्वदा।।३॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.५७।।

ज्या घरातील अथवा कुळातील स्त्रिया शोकग्रस्त होऊन दु:ख असतात ते कुळ लवकरच नष्ट भ्रष्ट होते. परंतु ज्या घरातील अथवा कुळातील स्त्री वर्ग आनंदी उत्साही व प्रसन्नतेने परिपूर्ण असतो त्या कुळाची सदैव अभिवृद्धी होते.॥३॥

तस्मादेताः सदा पूज्या भूषणाच्छादनाशनैः। तिकामैर्नरैर्नित्यं सत्करेषूत्सवेषु च ॥४। मनु०।। अ.३ ।। श्लो.५९।।

म्हणून ऐश्वर्याची इच्छा बाळगणार्यांनी नेहमी व उत्सवप्रसंगी स्त्रियांना भूषणे, वस्त्रे, भोजन इत्यादी देऊन त्यांचा वारंवार सत्कार करावा ||४||

    येथे ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी की 'पूजा' या शब्दाचा अर्थ 'सत्कार' असा आहे. जेव्हा जेव्हा दिवसा अथवा रात्री प्रथमतः गाठ पडेल तेव्हा किंवा निरोप घेताना परस्परांनी प्रेमाने 'नमस्ते’ करावे.

सदा प्रहृष्टया भाव्यं गृहकार्ये च दक्षया । सुसंस्कृतोपस्करया व्यये चामुक्तहस्तया ॥ मनु०।। अ.५ ।। श्लो.१५०।।

स्त्रीस उचित आहे की अति प्रसन्नतेने गृहकृत्यांमध्ये चातुर्याने सर्व पदार्थ उत्तम प्रकारे बनवावेत. घराची स्वच्छता ठेवावी आणि खर्च करताना फार उदार होऊ नये. जो जो खर्च होईल त्याचा हिशेब यथावत ठेवावा व तो पतीला सांगावा. सर्व खाद्य पदार्थ अशा प्रकारे पवित्र व शुद्ध बनवावेत की ज्यायोगे ते औषधरूप बनून शरीर व आत्मा यात रोगांना येऊ देणार नाही. घरातील नोकराचाकरांकडून यथायोग्य काम करून घ्यावे. घरातील कोणतेही काम बिघडू देऊ नये.

स्त्रियो रत्नान्यथो विद्या धर्मः शौचं सुभाषितम् । विविधानि च शील्पानि समादेयानि सर्वतः ॥ मनु०।। अ.२ ।। श्लो.२४०।।

उत्तम स्त्री, नाना प्रकारची रत्ने, विद्या, सत्य, पावित्र्य, सुभाषित, विविध प्रकारची शिल्पविद्या या गोष्टी सर्व देशांकडून व सर्व लोकांकडून घ्याव्यात.

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यं अप्रियम्। प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः ।।१॥ मनु०।। अ.४।। श्लो.१३८।।

नेहमी प्रिय, सत्य, इतरांना हितकारक असेल असेच बोलावे. जे अप्रिय सत्य असेल ते बोलू नये. म्हणजे जो तिरळा असेल त्याला तिरळा म्हणू नये. मात्र इतरांना खूष करण्यासाठी खोटे बोलू नये. ॥१॥

भद्रं भद्रं इति ब्रूयाद्भद्रं इत्येव वा वदेत् । शुष्कवैरं विवादं च न कुर्यात्केन चित्सह ॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.१३९।।

सदैव भद्र म्हणजे सर्वांना कल्याणकारक वचन बोलावे . कोणाशीही विना अपराध निष्कारण शत्रुत्व आणि निरर्थक वादविवाद करू नये.॥२॥ जे दुसऱ्याच्या हिताचे असेल ते त्याला त्याचे वाईट वाटत नसले तरी सांगितल्याशिवाय राहू नये.

पुरुषा बहवो राजन् सततं प्रियवादिनः। अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः।। (महा.) उद्योगपर्वः ३७।१५, विदुरनीति

हे धृतराष्ट्रा! या जगात इतरांना सदैव खुष करण्यासाठी गोड बोलणारे तोंडपुजे पुष्कळ लोक आहेत; परंतु ऐकण्यास अप्रिय वाटणारे मात्र अंती कल्याण करणारे वचन बोलणारा व ते ऐकणारा माणूस विरळा. जे सत्पुरुष असतात ते इतरांचे दोष त्यांच्या तोंडावर सांगतात व आपले दोष ऐकतात. परोक्ष त्यांच्या गुणांची वाखाणणी करतात. याउलट दुष्ट लोकांची हीच रीत असते की ते तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे निंदा करतात. जोपर्यंत मनुष्य इतरांच्या तोंडून आपले दोष ऐकून घेतनाही अथवा सांगणारा सांगत नाही तोपर्यंत मनुष्य दोषांपासून मुक्त होऊन सद्गुणी होऊ शकत नाही.

    कधी कोणाची निंदा करू नये. उदाहरणार्थ, 'गुणेषु दोषारोपणमसूया' अर्थात् 'दोषेषु गुणारोपणमप्यसूया', 'गुणेषु गुणारोपणं दोषेषु दोषारोपणं च स्तुतिः' गुणांच्या ठिकाणी दोषांचा व दोषांच्या ठिकाणी गुणांचा आरोप करणे ही निंदा होय आणि गुणांना गुण व दोषांना दोष म्हणणे ही स्तुति होय. अर्थात मिथ्याभाषणाचे नाव निंदा व सत्यभाषणाचे नाव स्तुति होय.

बुद्धिवृद्धिकराण्याशु धन्यानि च हितानि च। नित्यं शास्त्राण्यवेक्षेत निगमांश्चैव वैदिकान्॥१॥ मनु०।। अ.४।। श्लो.१९।।

जे शीघ्र बुद्धि, धन व हित यांची वृद्धि करणारी जी शास्त्रे व वेद आहेत त्यांचे नित्य श्रवण व श्रावण करावे. ब्रह्मचर्याश्रमात जे अध्ययन केले असेल ते ग्रंथ स्त्रीपुरुषांनी नित्य वाचावेतच शिकवावेत.॥१।

यथा यथा हि पुरुषः शास्त्रं समधिगच्छति । तथा तथा विजानाति विज्ञानं चास्य रोचते ॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२०।।

कारण मनुष्य जसजसा शास्त्रांना यथावत जाणतो तसतसे त्या विद्येविषयीचे त्याचे विशष ज्ञान वाढत जाते आणि त्यातच त्याची रूचि वाढत जाते. ॥२॥

गृहस्थाश्रमाच कर्तव्ये - पंच महायज्ञ

ऋषियज्ञं देवयज्ञं भूतयज्ञं च सर्वदा। नृयज्ञं पितृयज्ञं च यथाशक्ति न हापयेत् ॥१॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२१।।

अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्। होमो दैवो बलिर्भौतो नृयज्ञोऽतिथिपूजनम् ॥।२।। मनु०।। अ.३ ।। श्लो.७०।।

स्वाध्यायेनार्चयेत र्षीन्होमैर्देवान्यथाविधि । पितॄञ् श्राद्धैश्च नॄनन्नैर्भूतानि बलिकर्मणा। ३॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.८१।।

यांपैकी पहिल्या दोन यज्ञांविषयी ब्रह्मचर्य प्रकरणामध्ये विवेचन केले आहे. पहिल्यामध्ये वेदादी शास्त्रांचे अध्ययन व अध्यापन करणे, संध्योपासना व योगाभ्यास, दुसऱ्या देवयज्ञामध्ये विद्वानांचा सत्संग, सेवा, पावित्र्य, दिव्य गुण अंगी वाढविणे, दातृत्व, विद्येची वृद्धी करणे. हे दोन्ही यज्ञ दररोज सकाळी व संध्याकाळी करावयाचे असतात.

सायंसायं गृहपतिर्नो अग्निः प्रात: प्रात: सौमनसस्य दाता ।।१।। प्रात: प्रात:र्गृहपतिर्नो अग्निः सायंसायं सौमनसस्य दाता ।।२।।-अ० कां० १९। अनु० ७। मं० ३। ४।।

जो संध्याकाळी यज्ञ होतो त्या होमात टाकलेले द्रव्य सकाळपर्यंत हवा शुद्ध ठेवून हितकारक बनते. ॥१॥ जो सकाळी होम केला जातो त्या होमात टाकलेले द्रव्य संध्याकाळपर्यंत वायु शुद्धिद्वारा बळ बुद्धि आरोग्यकारक असते. ॥२॥

तस्मादहोरात्रस्य संयोगे ब्राह्मणः सन्ध्यामुपासीत। उद्यन्तमस्तं यान्तम् आदित्यम् अभिध्यायन्।।३।। ब्राह्मणे।। ४। ५ तै. आ.२।२

म्हणून दिवस व रात्र यांच्या संधिकाळी म्हणजे सूर्योदय व सूर्यास्तावेळी परमेश्वराचे ध्यान व अग्निहोत्र अवश्य केले पाहिजे. ॥३

न तिष्ठति तु यः पूर्वां नोपास्ते यश्च पश्चिमाम् । स शूद्रवद्बहिष्कार्यः सर्वस्माद्द्विजकर्मणः ॥४॥ मनु०।। अ.२ ।। श्लो.१०३।।

जे कोणी सकाळ संध्याकाळ संध्या व अनिहोत्र करीत नाहीत त्यांना सज्जन लोकांनी द्विजांच्या कमान बहिष्कृत करून काढून टाकावे म्हणजे त्यास शूद्रवत समजावे. ॥४॥

(प्रश्न) त्रिकाळ संध्या का करू नये? (उत्तर) तीन वेळेला संधिकाळ होत नसतो. प्रकाश व अंधकार यांची संधीही फक्त सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळाच होते. जो कोणी ही गोष्ट लक्षात न घेता दिवसाच्या मध्यभागीही म्हणजे मध्याह्नीस आणखी एक संधिकाळ मानून तिसऱ्यांदा संध्यावंदन करतो त्याने रात्रीच्या मध्यभागीही संध्योपासना का करू नये? मध्यरात्रीही संध्या करावयाची इच्छा असेल तर प्रत्येक प्रहरा प्रहराला, घटके घटकेला, प्रत्येक पळाला व क्षणालाही संघिकाळ असतो तेव्हाही संध्योपासना करावी ! वस्तुतः तसे करण्याची इच्छा असली तरीही तसे होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे मध्याह्न संध्या करण्यास कोणत्याही शास्त्रांत आधारसुद्धा नाही. म्हणून फक्त सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनदाच संध्या व अग्निहोत्र करणे समूचित होय. तिसऱ्यावेळी नव्हे आणि काळाची जी विभागणी शास्त्रकारानी भूत, भविष्य व वर्तमान यांच्यातील भेदाने अशी केली आहे ते तीनकाळ वेगळे आहेत. त्यांचा संध्योपासनेशी काही संबंध नाही.

    तिसरा पितृयज्ञ. ज्यात देव जे विद्वान-अध्ययन-अध्यापन करणारे ऋषी, माता, पिता आदी वयोवृद्ध ज्ञानी आणि परमयोगी यांची सेवा करणे म्हणजे पितृयज्ञ होय. पितृयज्ञाचे दोन भेद आहेत. एक श्राद्ध व दुसरे तर्पण. श्राद्ध म्हणजे 'श्रत् हे सत्याचे नाव आहे. 'श्रत्सत्यं दधाति यया क्रियया सा श्रद्धा श्रद्धया यत्क्रियते तच्छुद्धम्।' ज्या क्रियेने सत्याचे ग्रहण केले जाते तिला श्रद्धा असे म्हणतात. श्रद्धेने जे कर्म केले जाते ते श्राद्ध होय. तसेच ‘तृप्यन्ति तर्पयन्ति येन पितृन् तत्तर्पणम्' म्हणजे ज्या ज्या कर्माच्या योगाने विद्यमान म्हणजे हयात असणारी मातापितादि संतुष्ट होतात व त्यांना जे संतुष्ट केले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. मात्र हा दोन्ही प्रकारचा पितृयज्ञ जिवंत पितरांसाठी आहे. मृतकासाठी नाही.

तर्पण

ओं ब्रह्मादयो देवास्तृप्यन्ताम्। ब्रह्मादिदेवपत्न्यस्तृप्यन्ताम्। ब्रह्मादिदेवसुतास्तृप्यन्ताम् । ब्रह्मादिदेवगणास्तृप्यन्ताम्।। इति देवतर्पणम्।।

‘विद्वा सो हि देवाः।’ के विद्वान आहेत त्यांनाच देव म्हणतात, असे शतपथ ब्राह्मणात सांगितले आहे. ज्यांनी चारही वेदांचे सांगोपांग ज्ञान मिळविले आहे त्यांना ब्रह्मा असे म्हणतात. या ब्रह्मापेक्षा कमी शिकलेल्यांनाही देव म्हणजे विद्वान असे म्हणतात. त्यांच्याप्रमाणे विदुषी स्त्रीचे चे नाव ब्रह्माणी व देवी असे आहे. त्यांच्यासारखेच त्यांचे जे पुत्र, शिष्य व गण म्हणजे सेवक असतील त्यांची सेवा करणे म्हणजेच 'श्राद्ध ' व 'तर्पण ' होय.

ओं मरीच्यादय ऋषयस्तृप्यन्ताम्। मरीच्याद्यृषिपत्न्यस्तृप्यन्ताम्। मरीच्याद्यृषिसुतास्तृप्यन्ताम्। मरीच्याद्यृषिगणास्तृप्यन्ताम्।। इति ऋषितर्पणम्।।

जे ब्रह्माचे प्रपौत्र मरीची सारखे विद्वान बनून इतरांना शिकवितात आणि त्यांच्याप्रमाणे ज्या स्त्रिया विदुषी असतात व मुलींना विद्यादान करतात त्यांची सेवा करावी. तसेच त्यांचे विद्वान पुत्र, शिष्य व सेवक त्यांच्याप्रमाणेच विद्यादान करीत असतील तर त्यांचाही सत्कार करावा. हेच खरे ऋषितर्पण होय.

ओं सोमसदः पितरस्तृप्यन्ताम्। अग्निष्वात्ताः पितरस्तृप्यन्ताम्। बर्हिषदः पितरस्तृप्यन्ताम्। सोमपाः पितरस्तृप्यन्ताम्। हविर्भुजः पितरस्तृप्यन्ताम्। आज्यपाः पितरस्तृप्यन्ताम्। यमादिभ्यो नमः यमादींस्तर्पयामि। पित्रे स्वधा नमः पितरं तर्पयामि। पितामहाय स्वधा नमः पितामहं तर्पयामि। मात्रे स्वधा नमो मातरं तर्पयामि। पितामह्यै स्वधा नमः पितामहीं तर्पयामि। स्वपत्न्यै स्वधा नमः स्वपत्नीं तर्पयामि। सम्बन्धिभ्यः स्वधा नमः सम्बन्धींस्तर्पयामि। सगोत्रेभ्यः स्वधा नमः सगोत्रंस्तर्पयामि।। इति पितृतर्पणम्।।

'ये सोमे जगदीश्वरे पदार्थविद्यायां च सीदन्ति ते सोमसदः' जे परमात्मा जाणण्यात व पदार्थविद्येमध्ये निपुण असतात ते 'सोमसद', ‘यैरग्नेर्विद्युतो विद्या गृहीता ते अग्निष्वात्ताः’. जे अमि म्हणजे विद्युत यांच्यासंबंधीच्या विद्यांचे जाणकार असतात ते अनिष्वात्त होत.‘ये बर्हिषि उत्तमे व्यवहारे सीदन्ति ते बर्हिषदः’ जे उत्तम विद्यावृद्धीयुक्त व्यवहारांमध्ये गुंतलेले असतात ते बर्हिषद होय. 'ये सोममैश्वर्यमोषधीरसं वा पान्ति पिबन्ति वा ते सोमयाः'. जे ऐश्वर्याचे रक्षक आणि सोमरसाचे पान केल्याने निरोगी बनलेले आहेत. तसेच जे दुसऱ्यांच्या ऐश्वर्याचे रक्षण करणारे असतात व इतरांना औषधे देऊन त्यांचे रोग नाहीसे करतात ते सोमपा होत. ‘ये हविर्होतुमत्तुमर्हं भुञ्जते भोजयन्ति वा ते हविर्भुजः’ जे मादक व हिंसायुक्त पदार्थाचा त्याग करून उत्तम खाद्यपदार्थाचे भोजन करतात त्यांना हविर्भुज म्हणतात. ‘य आज्यं ज्ञातुं प्राप्तुं वा योग्यं रक्षन्ति वा पिबन्ति त आज्यपाः’ जाणण्यास व प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तूंचे रक्षण करणारे आणि तूप खाणारे व दूध पिणारे जे लोक त्यांना आज्यपा म्हणतात. 'शोभनः कालो विद्यते येषान्ते सुकालिनः’ चांगले धर्मकृत्ये करण्यास ज्यांना सदैव उत्तम वेळ असतो त्यांना सुकालिन असे म्हणतात.‘ये दुष्टान् यच्छन्ति निगृह्णन्ति ते यमा न्यायाधीशाः’ जे दुष्टांना शासन करतात व सज्जनांचे रक्षण करणारे न्यायकारी आहेत ते यम 'य: पाति स पिता' जो मुलाबाळांना अन्नवस्त्रादिक पुरवून त्यांचे पालनपोषण व रक्षण करतो, तो जनक पिता होय. 'पितुः पिता पितामहः, पितामहस्य पिता प्रपितामहः' पित्याच्या पित्याला पितामह (आजोबा) आणि पितामहाच्या पित्याला प्रपितामह (पणजोबा) असे म्हणतात. 'या मानयति सा माता' जी अन्न आणि सत्कार देऊन संतानाची मान्यता करते ती माता. ‘या पितुर्माता या पितामही, पितामहस्य माता प्रपितामही'. पित्याची माता ती पितामही (आजी) आणि पितामहाची माता ती प्रपितामही (पणजी). आपली पत्नी, बहीण, नातेवाईक, स्वगोत्रज व अन्य कोणी सभ्य पुरुष अथवा वृद्ध या सर्वांना अत्यंत श्रद्धापूर्वक उत्तम अन्न, वस्त्र, सुंदर वाहन वगैरे देऊन त्यांना उत्तम प्रकारे संतुष्ट करावे. अर्थात ज्या-ज्या कृत्याने त्यांचा आत्मा तृप्त होईल आणि शरीर स्वस्थ राहील त्या-त्या कृत्याने त्यांची प्रेमपूर्वक सेवा करणे म्हणजेच श्राद्ध व तर्पण होय.

    चौथ यज्ञ म्हणजे बलि वैश्वदेवः- स्वयंपाक तयार झाल्यावर भोजनासाठी जे पदार्थ बनले त्यांतून आंबट, खारट पदार्थ व मीठ घातलेले पदार्थ वगळून तूप घातलेले पदार्थ व मिष्टान्ने घेऊन चुलीतून अनि बाहेर काढून त्या अनीमध्ये पुढील मंत्रांसह त्या अन्नाच्या आहुती द्याव्यात आणि भाग करावे. :-

वैश्वदेवस्य सिद्धस्य गृह्येऽग्नौ विधिपूर्वकम् । आभ्यः कुर्याद्देवताभ्यो ब्राह्मणो होमं अन्वहम् । मनु०।। अ.३ ।। श्लो.८४।।

पाकशाळेमध्ये भोजनासाठी जे काही अन्न तयार असेल त्याचा दिव्य गुणांच्या प्राप्तीसाठी त्याच पाकाग्नीमध्ये खाली दिलेल्या मंत्रांनी नित्य विधिपूर्वक होम करावा :-

होम करण्याचे मंत्र

ओम् अग्नये स्वाहा। सोमाय स्वाहा। अग्नीषोमाभ्यां स्वाहा। विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा। धन्वन्तरये स्वाहा। कुह्वै स्वाहा। अनुमत्यै स्वाहा। प्रजापतये स्वाहा। सह द्यावापृथिवीभ्यां स्वाहा। स्विष्टकृते स्वाहा ॥

या प्रत्येक मंत्राने एक-एक आहुती प्रज्वलित अग्नीमध्ये टाकावी. नंतर थाळीमध्ये अथवा जमिनीवर पान ठेवून त्याच्या पूर्वदिशेकडून क्रमानुसार यथाक्रम या मंत्रांसह भाग ठेवावेतः

ओं सानुगायेन्द्राय नमः। सानुगाय यमाय नमः। सानुगाय वरुणाय नमः। सानुगाय सोमाय नमः। मरुद्भ्यो नमः। अद्भ्यो नमः। वनस्पतिभ्यो नमः। श्रियै नमः। भद्रकाल्यै नमः। ब्रह्मपतये नमः। वास्तुपतये नमः। विश्वेभ्यो देवेभ्यो नमः। दिवाचरेभ्यो भूतेभ्यो नमः। नक्तञ्चारिभ्यो भूतेभ्यो नमः। सर्वात्मभूतये नमः।।

पानावर किंवा थाळत ठेवलेले हे भाग एकत्र करावेत आणि त्यावेळी कोणी अतिथी आला असल्यास त्याला जेवू घालावे; किंवा अग्नीमध्ये सोडून द्यावे. त्यानंतर लवणान्न म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी वगैरे घेऊन सहा भाग जमिनीवर ठेवावे. यासाठी आधार :-

शुनां च पतितानां च श्वपचां पापरोगिणाम्। वायसानां कृमीणां च शनकैर्निर्वपेद्भुवि ॥ मनु०।। अ.३ ।। श्लो.92।।

या प्रकारे ‘श्वभ्यो नमः। पतितेभ्यो नमः। श्वपग्भ्यो नमः। पापरोगिभ्यो नमः। वायसेभ्यो नमः। कृमिभ्यो नमः।।’ असे सहा भाग ठेवून कोणी दुखी, उपाशी प्राणी अथवा कुत्रे, कावळे इत्यादींना देऊन टाकावेत.

    या मंत्रातील 'नमः' या शब्दाचा अर्थ 'अन्न' असा आहे.कुत्री, पापी, चांडाळ, पापरोगी, कावळे आणि कृमी, मुंग्या इत्यादींना अन्न द्यावे असे मनुस्मृती आदिची विधि आहे
    पाकशाळेत होम-हवन करण्याचा उद्देश असा की तेथील हवा शुद्धव्हावी आणि अज्ञात अदृष्ट जीवांची नकळत जी हत्या होते त्याचा प्रति उपकार करणे होय.
     आता पाचवी अतिथिसेवा. ज्याच्या येण्याची तिथी निश्चित नसते त्याला अतिथी असे म्हणतात म्हणजे अकस्मात धार्मिक, सत्योपदेशक, सर्वांवर उपकार करण्यासाठी सर्वत्र हिंडणारा, पूर्ण विद्वान, परमयोगी, संन्यासी असा गृहस्थाच्या घरी आला तर त्याला प्रथम पाद्य, अर्ध्य व आचमनीय असे तीन प्रकारचे पाणी देऊन नंतर त्याला सत्कारपूर्वक आसनावर बसवून त्याला उत्तमोत्तम पदार्थ खाण्यास व पिण्यास द्यावेत आणि त्याची सेवाशुश्रूषा करून त्याला प्रसन्न करावे. त्यानंतर त्याच्या संगतीत बसून त्याच्या कडून ज्ञान-विज्ञानाच्या ज्या गोष्टीतून धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची प्राप्ती होईल अशा उपदेशाचे श्रवण करावे.त्याने केलेल्या उपदेशानुसार आपले आचरण ठेवावे. प्रसंगानुसार गृहस्थ व राजा आदी देखील अतिथींप्रमाणे सत्कार करण्यास योग्य आहेत. परंतु,

धूर्ताची लक्षणे

पाषाण्डिनो विकर्मस्थान्बैडालव्रतिकाञ् शठान् । हैतुकान्बकवृत्तींश्च वाङ्गात्रेणापि नार्चयेत् ॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.३०।।

(पाषण्डी) पाखंडी अर्थात वेदांची निंदा करणारे, वेदविरुद्ध आचरण करणारे, विकर्मस्थ, वेदविरुद्ध कृत्ये करणारे, मिथ्याभाषण आदी दुर्गुणांनी युक्त, (बैडाल.) जसा बोका लपून छपून दबा धरून टपून बसतो आणि उंदीर वगैरे प्राण्यांवर झडपघालून आपले पोट भरतो, तसे वर्तन करणाऱ्याला बैडालवृत्ती असे म्हणतात. (शठ) अर्थात ही, दुराग्रही, घमेंडखोर, ज्यांना स्वत:ला कळत नाही व दुसऱ्यांनी सांगितलेले ऐकत नाहीत, ते शठ. (हैतुक) तर्क-कुतर्क म्हणजे व्यर्थ बडबड करणारे जसे आजकालचे वेदांती बकतात 'मी ' ब्रह्म आहे, जग मिथ्या आहे. वेदादी शास्त्रे व ईश्वरसुद्धा कल्पित आहे. अशा थापा ठोकणारे आजकालचे वेदांती, (बकवृत्ती) जसा बगळा एका पायावर उभा राहून, ध्यानस्थ असल्याचा आव आणतो व समोर मासळी येताच तिला पकडून गठ्ठ करतो त्याप्रमाणे आपला स्वार्थ साधण्यासाठी आजकालचे बैरागी, गोसावी वगैरे हठ्ठी, दुराग्रही व वेदविरोधी आहेत. अशा लोकांचा सत्कार नुसत्या वाणीनेही करू नये. कारण त्यांचा सत्कार केल्यास त्यांची भरभराट होऊन ते जगाला अधर्मयुक्त करतात. ते स्वतः तर अवनतीची कामे करतातच; पण जे त्यांच्या नादी लागतात त्यांनाही ते अविद्यारूपी महासागरात बुडवून टाकतात.

या पाच महायज्ञांची फळे अशी आहेत:

    ब्रह्मयज्ञ केल्याने विद्या, शिक्षण, धर्म, सभ्यता इत्यादी शुभ गुणांची वृद्धी होते. अग्निहोत्राने वायु, वृष्टी व जल यांची शुद्धी होऊन वृष्टीच्या द्वारे जगाला सुख मिळते. अर्थात शुद्ध वायुचां श्वासोच्छवास, स्पर्श व खानपान केल्याने आरोग्य, बुद्धि, बळ, पराक्रम वाढून धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे अनुष्ठान पूर्ण होते. म्हणूनच त्याला देवयज्ञ म्हणतात
    पितृयज्ञमध्ये माता, पिता आणि ज्ञानी महात्म्यांची सेवा केली जाते. त्यायोगे सेवा करणार्यांचे ज्ञान वृद्धिंगत होईल त्यापासून सत्यासत्याचा निर्णय करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करून तो सुखी होईल. दुसरा पैलू कृतज्ञतेचाही असतो. जशी सेवा माता, पिता व आचार्य यांनी आपल्या मुलांची व शिष्यांची केलेली असते, त्यांची परतफेड करणे उचितच आहे.
    बलिवैश्वदेवाचे फळ पूर्वी सांगितले तेच आहे.
    जोपर्यंत जगामध्ये उत्तम अतिथी नसतील तोवर जगाची उन्नती होत नाही. त्यांच्या सर्वत्र संचार भ्रमणाने वसत्याचा उपदेश केल्याने पाखंड वाढत नाही आणि सर्व ठिकाणी गृहस्थाना सहजासहजी सत्य विज्ञानाची प्राप्ती होत राहते आणि मनुष्यमात्रामध्ये एकच धर्म स्थिर राहतो. अतिथीशिवाय संदेहनिवृत्ती होत नाही. संदेह म्हणजे संशय दूर झाल्याशिवाय दृढ निश्चय होत नाही आणि निश्चयाशिवाय सुख कसे प्राप्त होईल?

ब्राह्मे मुहूर्ते बुध्येत धर्मार्थौ चानुचिन्तयेत् । कायक्लेशांश्च तन्मूलान्वेदतत्त्वार्थं एव च।। मनु०।। अ.४ ।। श्लो.92।।

रात्रीच्या चौथ्या प्रहरी किवा चार घटका रात्र असताना उठावे. आवश्यक कार्य करून धर्म व अर्थ शारीरिक रोगांचे निधन व परमात्म्याचे ध्यान करावे. कधीही अधर्माचरण करू नये. कारण,

नाधर्मश्चरितो लोके सद्यः फलति गौरिव । शनैरावर्त्यमानस्तु कर्तुर्मूलानि कृन्तति ॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.१७२।।

केलेला अधर्म कधीही निष्फळ होत नाही. मात्र ज्यावेळी माणूस अधर्म करतो त्याचवेळी त्यांचे फळ देखील मिळत नाही. म्हणून अज्ञानी लोक अधर्म करण्यास कचरत नाहीत. परंतु लक्षात ठेवा की, ते अधर्माचरण हळूहळू तुमच्या सुखाची मुळे कुरतडत जाते त्याचा क्रम असा

अधर्मेणैधते तावत्ततो भद्राणि पश्यति । ततः सपत्नान्जयति समूलस्तु विनश्यति॥ मनु०।। अ.४।। श्लो.१७४।।

जेव्हा तलावाचा बांध फोडून पाणी जसे चोहीकडे पसरते तसा अधर्मात्मा मनुष्य धर्माच्या मर्यादा ओलांडून मिथ्याभाषण, कपट, पाखंड म्हणजे रक्षण करणाऱ्या वेदांचे खंडन आणि विश्वासघात वगैरे नीच कर्मे करून इतरांच्या वस्तू लुबाडत प्रथम तो खूप भरभराटीस येतो. नंतर त्याला धन, धान्य, ऐश्वर्य, खानपान, वस्त्रे, आभूषणे, यान, स्थान, मान, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी त्याला प्राप्त होतात. अन्यायाने तो शत्रुसही जिंकतो. मात्र त्यानंतर लवकरच नष्ट होऊन जातो जसे पाळे मुळे कापलेला वृक्ष नष्ट होतो तसा हा अधर्मी माणूस नष्टभ्रष्ट होत जातो.

सत्यधर्मार्यवृत्तेषु शौचे चैवारमेत्सदा । शिष्यांश्च शिष्याद्धर्मेण वाग्बाहूदरसंयतः॥ मनु०।। अ.४।। श्लो.१७५।।

वेदोक्त सत्य धर्म अर्थात पक्षपातरहित होऊन सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग, न्यायरूप वेदोक्त धर्मादि, आर्य, उत्तम पुरुषांचे गुण, कर्म, स्वभाव व पावित्र्य यांमध्ये सदा रममाण व्हावे. वाणी, बाहु, उदर आदी अवयवांचा संयम करून म्हणजे धर्माने चालत राहून आपल्या शिष्यांचे उत्तम शिक्षण करीत असावे.

ऋत्विक्पुरोहिताचार्यैर्मातुलातिथिसंश्रितैः । बालवृद्धातुरैर्वैद्यैर्ज्ञातिसंबन्धिबान्धवैः ॥१॥ मनु०।। अ.४।। श्लो.१७९।।

(ऋत्विक्) यज्ञ करणारा, (पुरोहित) सदा उत्तम आचरणाचे शिक्षण देणारा, (आचार्य) विद्या शिकविणारा, (मातुल) मामा, (अतिथि) ज्यांच्या येण्याजाण्याची तिथी ठरलेली नसते तो, (संश्रित) आपले आश्रित, (बाल) बालक, (वृद्ध) म्हातारे(आतुर) पीडित, (वैद्य) आयुर्वेद जाणणारा, (ज्ञाति) आपल्या वर्गाचे किंवा गोत्राचे, (संबन्धी) सासरे वगैरे (बान्धव) मित्र॥१॥

मातापितृभ्यां जामीभिर्भ्रात्रा पुत्रेण भार्यया । दुहित्रा दासवर्गेण विवादं न समाचरेत् ॥२॥ मनु०।। अ.४।। श्लो.१८०।।

(माता) आई(पिता) बाप, (यामि) बहीण(भ्राता) भाऊ, (पुत्र) मुलगा, (भार्या) पत्नी , (दुहिता) मुलगी व (दास) गोकर यांच्याशी वाद म्हणजे त्यांच्याशी भांडण किंवा तंटाबखेडा कधीही करू नये. ॥२॥

दान

अतपास्त्वनधीयानः प्रतिग्रहरुचिर्द्विजः । अम्भस्यश्मप्लवेनेव सह तेनैव मज्जति ।। मनु०।। अ.४।। श्लो.१९०।।

एक (अतपाः) ब्रह्मचर्य, सत्यभाषण वगैरे तपरहित, दुसरा (अनधीयानः) न शिकलेला, तिसरा (प्रतिग्रहरूचिः) दुसऱ्यांकडून केवळ दान घेणारा असे हे तीन प्रकारचे लोक दगडी नौकेत समुद्रावर तरंगण्यासमान आपल्या दुष्कर्मानेच दुःख सागरात बुडून जातातते स्वतः तर बुडतातच परंतु स्वतःबरोबर दान देणार्यांनाही

त्रिष्वप्येतेषु दत्तं हि विधिनाप्यर्जितं धनम् । दातुर्भवत्यनर्थाय परत्रादातुरेव च ।। मनु०।। अ.४ ।। श्लो.१९३।।

जो धर्माने प्राप्त झालेले धन वरवर्णिलेल्या तीनपुरुषांना देतो त्यादानदात्याचानाश याच जन्मात आणि घेणाऱ्याच्या नाश पुढील जन्मी करते. जे असे असतात त्यांचे काय व्हावे?

यथा प्लवेनाउपलेन निमज्जत्युदके तरन् । तथा निमज्जतोऽधस्तादज्ञौ दातृप्रतीच्छकौ ॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.१९४।।

ज्याप्रमाणे दगडी नौकेत बसून पाण्यावर तरंगणारा बुडतो त्याप्रमाणे अज्ञानी दाता व ग्रहीता (दान घेणारा) हे दोघेही अधोगतीला अर्थात खास प्राप्त होतात.

पाखंड्यांची लक्षणे

धर्मध्वजी सदा लुब्धश्छाद्मिको लोकदम्भकः । बैडालव्रतिको ज्ञेयो हिंस्रः सर्वाभिसंधकः ॥१॥ मनु०।। अ.४।। श्लो.१९५।।

(धर्मध्वजी ) काहीही धर्म न करता धर्माच्या भावाने लोकांना ठकविणारा (सवालुब्ध) सर्वदा लोभी, (छाश्किः) कपटी, (लोकदम्भकः) संसारी लोकांसमोर आपल्या बढाईच्या गप्पा मारणारा, ढोंगी, (हिंत्र) प्राण्यांची हिंसा करणारा व इतरांशी वैर बाळगणारा, (सर्वाभिसन्धकः) भल्या व बाई अशा सर्व लोकांशी मिळून राहणारा असेल त्याला वैडालव्रतिक म्हणजे बोक्याप्रमाणे लबाड व नीच समजावे. ॥१॥

अधोदृष्टिर्नैष्कृतिकः स्वार्थसाधनतत्परः । शठो मिथ्याविनीतश्च बकव्रतचरो द्विजः॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.१९६।।

(अधोदृष्टिः) कीर्तीसाठी अधोदृष्टि ठेवणारा, (नैष्कृतिकः) खुशी, कोणी त्याचा थोडासा पैसा भर अपराध केला असेल तर त्याचा सूड घेण्यासाठी मरेपर्यंत धडपडणारा, (स्वार्थसाधनतत्परः) कपट, अधर्म, विश्वासघात वगैरे वाटेल त्या साधनांचा वापर आपल्या हेतु सिद्धिसाठी करणारा, (शठः) आपले म्हणणे खोटे असले तरी आपला हळून सोडणारा, (मिथ्याविनितः) आपण अत्यंत सुशील, संतुष्ट व सज्जन आहोत असे खोटे नाटे वरून भासविणारा (बकव्रत चरः) त्याला बगळ्याप्रमाणे नीच समजावे, अशी लक्षणे असणारे लोक नीच व पाखंडी असतात. त्यांचा विश्वास अथवा त्यांची सेवा करू नये. ॥२॥

गृहस्थांची कर्तव्ये

धर्मं शनैः संचिनुयाद्वल्मीकं इव पुत्तिकाः । परलोकसहायार्थं सर्वभूतान्यपीडयन्।१॥ मनु०।। अ.४।। श्लो.२३८।।

मुंग्या (किंवा वाळवी) ज्याप्रमाणे हळूहळू प्रयत्न करून वारूळ बांधतात त्याप्रमाणे स्त्रीपुरुषांनी, कोणालाही पीडा न देता, परलोकात म्हणजे परजन्मात सुख मिळावे म्हणून, हळूहळू धर्माचा संचय करावा. ॥१॥

नामुत्र हि सहायार्थं पिता माता च तिष्ठतः । न पुत्रदारं न ज्ञातिर्धर्मस्तिष्ठति केवलः ॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२३९।।

कारण, परलोकामध्ये माता, पिता, पुत्रपली अथवा आपली जाती, लोक यांपैकी कोणीही साह्य करू शकत नाही परंतु फक्त धर्मच सहायक होत असतो. ॥२॥

एकः प्रजायते जन्तुरेक एव प्रलीयते । एकोऽनुभुङ्क्ते सुकृतं एक एव च दुष्कृतम्॥३॥ मनु०।। अ.४।। श्लो.२४०।।

पहा ! प्राण एकटाच जन्माला येता व एकटाच मरतो. तसेच धर्माचरणाचे फळ सुख आणि अधर्माचरणाचे दुःखरूपी फळ तो एकटाच भोगतो. ॥३॥

एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः। भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्त्ता दोषेण लिप्यते।।४।। महा, उद्योग.।। आ. ३३।। श्लो. ४७।।

हेही समजून घ्यावे की कुटुंबातील एक पुरुष पाप करून वस्तू आणतो आणि महाजन म्हणजे कुटुंब त्याचा उपभोग घेतात ते उपभोग घेणारे पापाचे भागीदार होत नाहीत. परंतु अधर्म अथवा पाप करणाराच पापाचा भागीदार होतो. ॥४॥

मृतं शरीरं उत्सृज्य काष्ठलोष्टसमं क्षितौ । विमुखा बान्धवा यान्ति धर्मस्तं अनुगच्छति ॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२४१।।

जेव्हा कुणाचा नातेवाईक मरतो तेव्हा त्याला मातीच्या ढेकळाप्रमाणे त्याचे शरीर जमिनीत पुरून त्याच्याकडे पाठ देऊन बंधुवर्ग विमुख होऊन निघून जातात. त्याच्या बरोबर जाणारा कोणीही नसतो परंतु एकटा धर्मच त्याचा साथी होतो. ॥५॥

तस्माद्धर्मं सहायार्थं नित्यं संचिनुयाच्छनैः । धर्मेण हि सहायेन तमस्तरति दुस्तरम् ॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२४२।।

परलोकात म्हणजे परजन्मात सुख व्हावे म्हणून या जन्मातच सहायतार्थ नित्यधर्माचा संचय हळू हळू करीत जावे. कारण धर्माच्याच साहाय्याने जीव मोठेमोठे दुस्तर दुःखसागर तरून जाऊ शकतो.॥१॥

धर्मप्रधानं पुरुषं तपसा हतकिल्बिषम् । परलोकं नयत्याशु भास्वन्तं खशरीरिणम् ॥ २॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२४३।।

परंतु पुरुष धर्मालाच मुख्य समजतो, धर्माच्या अनुष्ठानाने ज्याचे केलेले पाप दूर झाले असते त्याला त्याने धर्मच, प्रकाशस्वरूपी आणि आकाश हे ज्याला शरीराप्रमाणे आहे अशा परलोक म्हणजे परमदर्शनीय परमात्म्याची शीघ्र प्राप्त करवून देतो. ||२॥ म्हणून

दृढकारी मृदुर्दान्तः क्रूराचारैरसंवसन् । अहिंस्रो दमदानाभ्यां जयेत्स्वर्गं तथाव्रतः ॥१॥ मनु०।। अ.४।। श्लो.२४६।।

सदा दृढ असणारा, कोमल स्वभावाचा, जितेंद्रिय असतो, हिंसक, कुरवदुराचारी लोकांपासून जो दूर राहतो, तो धर्मात्मा, मनावर जय मिळवून आणि विद्यादी दानाने सुख प्राप्त करतो. ॥१॥

वाच्यर्था नियताः सर्वे वाङ्गूला वाग्विनिःसृताः । तांस्तु यः स्तेनयेद्वाचं स सर्वस्तेयकृन्नरः ॥२॥ मनु०।। अ.४ ।। श्लो.२५६।।

परंतु हेही लक्षात ठेवावे की सर्व अर्थ व व्यवहार वाणीने निश्चित होतातती वाणीच सर्वांच्या मुळाशी असते व तिच्या द्वारेच सर्व व्यवहार सिद्ध होतात. त्या वाणीची जो चोरी करतो, म्हणजे खोटे बोलतो तो सर्व प्रकारची चोरी वगैरे पापे करणारा आहे. ॥२॥

आचाराल्लभते ह्यायुराचारादीप्सिताः प्रजाः । आचाराद्धनं अक्षय्यं आचारो हन्त्यलक्षणम् ॥३॥ मनु०।। अ.४।। श्लो.१५६।।

म्हणून जो मिथ्याभाषणादी अधर्माचा त्याग करून धर्माचरण करतो, म्हणजे ब्रह्मचर्य, जितेंद्रियतेने पूर्ण आयुष्य आणि धर्माचरणाद्वारे उत्तम संतती व अक्षय धन प्राप्त करतो, जो धर्माप्रमाणे वागून दुष्ट लक्षणांचा नाश करतो. त्याच्या सारखे आचरण सदैव करावे. ॥३। कारण

दुराचारो हि पुरुषो लोके भवति निन्दितः। दुःखभागी च सततं व्याधितोऽल्पायुरेव च ॥३॥ मनु०।। अ.४।। श्लो.१५६।।

जो पुरुष दुराचारी असतो त्याची जगामध्ये सदाचरणी लोकांत निंदेस पात्र होतो, तो दु:ख भोगणारा नेहमी व्याधिग्रस्त होऊन अल्पायुषी होतो. म्हणून असा प्रयत्न करावा :-

यद्यत्परवशं कर्म तत्तद्यत्नेन वर्जयेत् । यद्यदात्मवशं तु स्यात्तत्तत्सेवेत यत्नतः ।।१। ॥३॥ मनु०।। अ.४।। श्लो.१५६।।

जे-जे पराधीन कर्म असेल त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा आणि जे-जे स्वाधीन कर्म असेल ते प्रयत्नपूर्वक आचरावेत. ॥१ ॥

सत्रं परवशं दुःखं सङ्गमात्मवशं सुखम्। एतद्विद्यात्समासेन लक्षणं सुखदुःखयोः।२॥ ॥३॥ मनु०।। अ.४।। श्लो.१५६।।

कारण जी जी पराधीनता ती ती दुःखदायक व जी स्वाधीनता आहे ती सुखदायक असते हेच संक्षेपाने सुख व दुःख यांचे थोडक्यात हेच लक्षण जाणले पाहिजे. ॥२॥

    परंतु जी एकमेकांच्या आधीन कामे आहेत ती ती आधीनतेनेच केली पाहिजेत. जसे की, स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांच्या आधीन राहून परस्परांशी संबंधित कर्तव्ये करावी. म्हणून स्त्री आणि पुरुष यांनी परस्परांशी प्रिय आचरण करावे, कोणीही दुसऱ्या व्यक्तीला विरोध करू नये अथवा व्यभिचार करू नये. घरातील सगळी कामे पुरुषाच्या आज्ञेप्रमाणे स्त्रीने आणि बाहेरची कामे पुरुषाने करावीत. एकमेकांना वाईट व्यसनात फसण्यापासून अडविणे हाच निश्चय जाणावा.
    विवाह झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांबरोबर विकल्या गेले अर्थात त्या दोघांचे हाव भाव वीर्य आदी नखशिखांत जे काही आहे ते परस्परांचे आधीन होऊन जाते
    स्त्रीने अथवा पुरुषाने एकमेकाला प्रसन्नतेशिवाय कोणतेही वर्तन करू नये. यात व्यभिचार, वेश्यागमन, परपुरुषगमन ह्या अत्यंत दुखदायक मोठ्या गोष्टी आहेत. त्यांच्या वाटेला ने जाता आपल्या पतीवर पीने व पलीवर पतीने सदा अनुरक्त, प्रसन्न राहावे.
    जे ब्राह्मण वर्णस्थ असतील त्यांच्यातील पुरूषांनी मुलांना शिकवावे आणि सुशिक्षित स्त्रियांनी मुलींना शिकवावे. नाना प्रकारे उपदेश करून व व्याख्याने देऊन त्या मुलांना विद्वान बनवावे. स्त्रीचा पूजनीय देव तिचा पती आणि पुरुषाची पूजनीय, सत्कारणीय देवी त्याची पत्नी असते.
    मुले व मुली जोपर्यंत गुरुकुलात राहतात तोपर्यंत त्यांनी आपल्या अध्यापकाना आईवडिलांसमान मानावे आणि अध्यापकांनी आपल्या शिष्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे समजावे.

अध्यापक व अध्यापिका हे कसे असावेत?

पंडिताचे लक्षण

आत्मज्ञानं समारम्भस्तितिक्षा धर्मनित्यता। यमर्था नापकर्षन्ति स वै पण्डित उच्यते।।१।। महा , उद्योग वि.. अ. १२ श्लो. २०

अर्थ : ज्याला आत्मज्ञान झालेले आहे, जो सम्यक् आरंभ म्हणजे नित्य उद्योगात असतो. कधीही रिकामटेकाडा व आळशी राहत नाही, सुख-दु:ख, हानि-लाभ, मानापमान, निंदा-स्तुती यांविषयी जो कधी हर्ष अथवा शोक करीत नाही, जो नेहमी धर्माचरणात नित्य मन असतो, ज्याच्या मनाला उत्तमोत्तम पदार्थ म्हणजे विषय वासनांच्या वस्तू आकर्षित करू शकत नाहीत, त्यालाच पंडित असे म्हणतात. ॥१॥

निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते। अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम्।।२।। महा उद्योग.बि.प्र.अ.३३। श्लो. २१

जो सदैव धर्मयुक्त कामे करतो, अधर्मयुक्त कृत्यांचा त्याग करतो, ईश्वर, वेद व सत्याचार यांची निंदा करीत नाही, जो ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवतो हीच पंडिताची कर्तव्याकर्तव्य कर्में होत. ॥२॥

क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति, विज्ञाय चार्थं भजते न कामात्। नासम्पृष्टो ह्युपयुङ्क्ते परार्थे, तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य।।३।। महा, उद्योग, वैि.प्र. अ. ३३। श्लो. २७

ज्याला अवघड विषयही चटकन समजू शकतो, जो दीर्घ काळपर्यंत शास्त्रांचे वाचनश्रवण व मनन करतो, जे काही ज्ञान प्राप्त होईल त्याचा परोपकारासाठी वापर करतो, कोणतेही काम आपल्या स्वार्थसाठी करीत नाही, कोणी न विचारता अथवा योग्य वेळ नसताना दुसऱ्या विषयी सम्मति देत नाही, तसेच प्रथम कोटीचे प्रज्ञान पंडितास झाले पाहिजे तो पंडित. ॥३॥

नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम्। आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः।।४।। महा. उद्योग. वि.प्र. अ. ३३। श्लो. २८

जी वस्तू प्राप्तीसाठी अयोग्य असते तिची इच्छा जो कधी करीत नाही, नष्ट झालेल्या गोष्टीविषयी शोक करीत नाही, संकटकाळी मोहात पडत नाही अथवा व्याकुळ होत नाही तोच बुद्धिमान पंडित होय. ॥४॥

प्रवृत्तवाक् चित्रकथ ऊहवान् प्रतिभानवान्। आशु ग्रन्थस्य वक्ता च यः स पण्डित उच्यते।।५।। महाउदो...ओ.३३। श्लो. ३३

ज्याची वाणी सर्व विद्यांमध्ये आणि प्रश्नोत्तरे करण्यात अत्यंत निपुण असते, जो विविध शास्त्राच्या प्रकरणाचा वक्ता यथायोग तर्क आणि स्मृतिमान, अशांच्या यथार्थ अर्थाचा शीघ्र वक्ता असतो तोच पंडित म्हटला जातो. ॥५॥

श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा। असम्भिन्नार्यमर्यादः पण्डिताख्यां लभेत सः।।६।। महा. उद्योगविs.अ. ३३ । श्लो. ३४

ज्याची बुद्धी ऐकलेल्या सत्य अर्थाच्या अनुकूल असते आणि त्याचे श्रवण बुद्धिच्या अनुसार असते, जो कधीही आर्य म्हणजे श्रेष्ठ धार्मिक पुरुषांच्या मर्यादिचे उल्लंघन करीत नाही तोच पंडित ह्या संज्ञेस प्राप्त होतो. ॥६॥

हे सर्व महाभारताच्या उद्योगपर्वातील विदुप्रजागराचे श्लोक आहेत. जेथे अशा योग्यतेचे स्त्रीपुरुष अध्यापन करतात तेथे विद्या, धर्म व उत्तम आचरण यांची वृद्धी होऊन प्रतिदिन आनंदच वाढत असतो.

अध्यापनास अयोग्य व मूखी माणसाची लक्षणे

अश्रुतश्च समुन्नद्धो दरिद्रश्च महामनाः। अर्थांश्चाऽकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः।।१।।मह उद्योगपर्व वि रइ.३३ ॥ ३४

(अर्थ) ज्याने कोणतेही शास्त्र वाचलेले अथवा ऐकलेले नाही, जो अत्यंत घमेंडखोरे आहे, जो दरिद्री असून मोठमोठी मनोराज्ये करतो, कर्म केल्यावाचून त्याच्या फळांच्या प्राप्तीची इच्छा बाळगतो, त्यालाच बुद्धमान लोक मूढ असे म्हणतात. ॥१॥

अनाहूतः प्रविशति ह्यपृष्टो बहु भाषते। अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः।।२।। महा, उद्योगपर्व. वि...३ श्लो.४१

जो न बोलावता सभेत किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन तेथे उच्च आसनावर बसू इच्छितो, विचारल्याशिवाय सभेमध्ये बाष्कळ बडबड करतो, अविश्वासू माणसावर अथवा वस्तूवर विश्वास ठेवतो तो मूर्ख आणि सर्व मनुष्यांमध्ये हीन दर्जाचा माणूस म्हटला जातो. ॥२॥

     जेथे अशा प्रकारची माणसे अध्यापक, उपदेशक , गुरू व माननीय असतात तेथे अविद्या (अज्ञान),

अधर्म, असभ्यता, कलह, विरोध व दुही वाटून दुःखच वाढीस लागतेः

आता विद्यार्थ्यांची लक्षणे

आलस्यं मदमोहौ च चापल्यं गोष्ठिरेव च। स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च। एते वै सप्त दोषाः स्युः सदा विद्यार्थिनां मताः।।१।। महाविप्र. आ. ४० श्लो.५

(आलस्य) शारीरिक व बौद्धिक जडता, नशा, मोह, कोणत्याही गोष्टीत फसणे, अस्थिरपणा, इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा गोष्टी करणे व ऐकणे, शिकताना किंवा शिकविताना थांबणे, अभिमानी व अत्यागी हे सात दोष विद्यार्थ्यांमध्ये असतात. त्यांना कधीच विद्या येत नाही. ॥१॥

सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्। सुखार्थी वा त्यजेद्विद्यां विद्यार्थी वा त्यजेत्सुखम्।।२।। महा. वि..ओ. ४० श्लो.६

सुख भोगण्याची इच्छा बाळगणाऱ्याला विद्या कशी मिळणार? आणि विद्याध्ययन करणाऱ्याला सुख कसे मिळणार ? कारण विषयसुखार्थीने विद्येला सोडावे आणि विद्याध्यनि विषयसुखांचा त्याग करावा. ॥२॥ असे केल्याखेरीज विद्याध्ययन होऊ शकत नाही. खालील गुण बाळगणार्यांना विद्या मिळते.

सत्ये रतानां सततं दान्तानामूर्ध्वरेतसाम्। ब्रह्मचर्यं दहेद्राजन् सर्वपापान्युपासितम्।।१।। महा , अनु. ५. अ. ७५ श्लो. १७

जे नेहमी सत्याचरणात प्रवृत्त, जितेंद्रिय आणि ज्यांचे वीर्य कधीही अध:स्खलित होत नाही, त्यांचेच ब्रह्मचर्य खरे आणि तेच विद्वान होत असतात. ॥१॥

यासाठी अध्यापक व विद्यार्थी यांनी शुभ लक्षणांनी युक्त झाले पाहिजे.

    विद्यार्थी सत्यवादी, सत्याभिमानी, सत्यकारी, सभ्य, जितेंद्रिय, सुशील आदि शुभ गुणयुक्त शारीरिक व

आत्मिक बळ वाढवून समग्र वेदादी शास्त्रांमध्ये प्रवीण बनतील असा प्रयत्न अध्यापकांनी करावा. विद्यार्थ्यांच्या वाईट सवयी काढून टाकाव्यात आणि त्यांना विद्या शिकविण्यात त्यांनी सतत प्रयत्न करावे. विद्याध्यनीही स्वत: जितेद्रिय, शांत, अध्यापकांविषयी प्रेम, विचारशील, परिश्रमी होऊन असा पुरुषार्थ करावा ज्यामुळे पूर्ण विद्या, पूर्ण आयुष्य, पूर्ण धर्म आणि पुरुषार्थ करणे येऊन जाईल. ही सारी ब्राह्मण वर्णाची कामे आहेत. क्षत्रियांची कर्में राजधर्मप्रकरणात सांगणार आहोत.

     वैश्यांनी ब्रह्मचर्याद्वारे वेदादी विद्या शिकून विवाह करून नाना देशांच्या भाषा शिकणे, नाना प्रकारच्या व्यापारांच्या पद्धती व वस्तूंचे भाव जाणून घेणे, खरेदी विक्री करणे, दीपद्वीपांतरी (देशोदेशी) जाणेयेणे, लाभ मिळविण्यासाठी कामे सुरू करणे, पशुपालन व शेती यांच्यात चातुय उन्नति करणे व सुधारणा घडवून आणणे, धन वाढविणे आणि विद्या व धर्म यांच्या उन्नतीसाठी त्याचा खर्च करणे, सत्यवादी निष्कपटी बसून सचोटीने सर्व व्यापार करणे, कोणतीही वस्तू नष्ट होणार नाही, अशा प्रकारे सर्व वस्तूंचे रक्षण करणे, (ही सारी वैश्यांची कर्तव्ये होत)
    शूद्रांनी सर्व प्रकारच्या सेवा करण्यात प्रवीण, पाकविद्येत निपुण, अत्यंत प्रेमागे द्विजांची सेवा आणि

त्यावरच आपला चरितार्थ चालवावा आणि द्विजांनी शूद्रांच्या अन्न-वस्त्रनिवान्याची सोय, त्यांच्या लग्नकार्यात होणारा सर्व खर्चही त्यांनी द्यावा किंवा त्या कामांबद्दल त्यांना मासिक पगार द्यावा.

    चारही वर्णांनी परस्परांवर प्रेम, उपकार, सज्जनता, सुख, दु:ख, लाभहानीमध्ये एकमताने राहून राज्य

व प्रजा यांच्या उन्नतीसाठी तनमनधनाने प्रयत्न करीत राहावा, स्त्री आणि पुरुष यांचा वियोग कधी होत कामा नये. कारण,

पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोऽटनम् । स्वप्नोऽन्यगेहवासश्च नारीसंदूषणानि षट् ॥२॥ मनु०।। अ.९।। श्लो.१३।।

मद्य, भांग, वगैरे मादक पदार्थाचे सेवन, दुष्ट पुरुषांची संगत, पतिवियोग, पाखंडी किंवा ढोंगी लोकांच्या दर्शनाच्या मिषाने उगीचच एकटीने इकडे तिकडे भटकणे आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन झोपणे किंवा वास्तव्य करणे, हे स्त्रियांना दूषित करणारे सहा दुर्गुण आहेत तसेच हे पुरुषांचेही आहेत. पती व पत्नी यांचा वियोग दोन प्रकारचा असतो- कामासाठी परदेशी जाणे व दुसरा मृत्यूच्या यायाग होणारा वियोग, यापैकी पहिल्या प्रकारच्या वियोगावर हा उपाय आहे की दूर देशी प्रवासास जाताना पुरुषाने पलीला आपल्या बरोबर न्यावे ह्याचे कारण दीर्घकाळपर्यंत पतिपत्नीचा वियोग राहणे योग्य नाही.

पुनर्विवाह

(प्रश्न) स्त्री व पुरुष यांचा बहु विवाह करणे योग्य आहे की नाही? (उत्तर) एकाच वेळी स्त्रीपुरुषांनी अनेक विवाह करू नयेत. (प्रश्न) काय कालांतराने अनेक विवाह झाले पाहिजेत (उत्तर) होय. जसे,

सा चेदक्षतयोनिः स्याद्गतप्रत्यागतापि वा । पौनर्भवेन भर्त्रा सा पुनः संस्कारं अर्हति ॥३ मनु०।। अ.९।। श्लो.१७६।।

ज्या स्त्रीचा अथवा पुरुषाचा फक्त पाणिग्रहण संस्कार झाला असेल आणि त्यांचा समागम झाला नसेल तर अशी अक्षतयोनी स्त्री आणि अक्षतवीर्य पुरुष (यांना वैधव्य वा विधुरावस्था प्राप्त झाल्यास) त्यांनी अन्य पुरुषाशी अथवा स्त्रीशी पुनर्विवाह केला पाहिजे. मात्र ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रैवर्णिकांतील क्षतयोनी स्त्री व क्षतवीर्य पुरुष यांचा पुनर्विवाह होऊ नये. (प्रश्न) पुनर्विवाह करण्यात काय दोष आहे? (उत्तर) (१) पाहिजे तेव्हा स्त्रीपुरुषांनी एकमेकांस सोडचिड़ी देऊन दुसऱ्या बरोबर संबंध करून असे केल्याने स्त्रीपुरुषांतील प्रेम कमी होते. हा पहिला दोष. (२) जेव्हा स्त्री अथवा पुरुष पतीपत्नी यांच्या निधनानंतर पती अथवा पत्नी दुसरे लग्न करावयास तयार होतात तेव्हा पहिल्या पत्नीच्या किंवा पतीच्या वस्तू पळविल्या जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील लोकांमध्ये तंटे उत्पन्न होणे हा दुसरा दोष. (३) तिसरा दोष असा की अशा प्रकारच्या पुनर्विवाहामुळे पुष्कळशा घरंदाज कुळांची नावे अथवा चित्रे न राहून त्यांच्या पदार्थाचे छिन्नविछिन्न होणे. (४) चौथा दोष असा की त्यामुळे पतिव्रत व पीढ़त हे धर्म नष्ट होतात. इत्यादि दोष उत्पन्न होत असल्यामुळे द्विजांमध्ये पुनर्विवाह अथवा अनेक विवाह कधी होता कामा नयेत. (प्रश्न) मूलबाळ नसल्यास निर्देश होऊन कुळाचाच नाश होईल. शिवाय स्त्रीपुरुष व्यभिचार करून गर्भपाता दुष्कृत्ये करतीलम्हणून पुनर्विवाह होणे चांगले आहे काय? (उत्तर) छेः छेः! कारण ज्या स्त्रीपुरुषांनी ब्रह्मचर्य स्थिर राहण्याची इच्छा केली तर काहीही उपद्रव होणार नाही आणि आपल्या कुळाची परंपरा चालू ठेवण्यासाठी आपल्या जातीतील मुलगा दत्तक घेतील. म्हणजे कुळवंश चालेल आणि व्यभिचारही होणार नाही. मात्र जे ब्रह्मचर्य ठेवू शकत नाही त्यांनी नियोग करून प्रजोत्पादन करावे.

नियोग विधि

(प्रश्न) पुनर्विवाह व नियोग यांत काय फरक आहे? (उत्तर) (१) ज्याप्रमाणे विवाहानंतर मुलगी आपल्या बापाचे घर सोडून पतीच्या घरी जाऊन राहाते व तिचा पित्याशी फारसा संबंध राहत नाही आणि विधवा स्त्री त्याच विवाहित पतीच्या याघरा जाऊन राहते. (२) त्यापुनर्विवाहात त्रीची मुले पुनर्विवाहित पतीच्या मालमत्तेचे हक्कदार होतात आणि विधवा स्त्रीची मुले विर्यदान करणाऱ्यांची मुले म्हटली जात नाहीत त्यांचे गोत्रही असत नाही आणि त्याचे स्वामित्व त्या मुलावर रहात नाही परंतु ते मृत पतीचे पुत्र म्हटले जातात ह्याचेच गोत्र राहते व त्याच्याच संपत्तीचे हक्कदार होऊन त्याच्याच घरात ते राहतात. (३) विवाहित स्त्रीपुरुषांनी एकमेकांची सेवा व पालनपोषण करणे आवश्यक असते. नियोगातील स्त्रीपुरुषांचा परस्परांशी काही संबंध नसतो. (४) विवाहित स्त्रीपुरुषांचा संबंध मरणापर्यंत कायम राहतो; तर नियुक्त स्त्रीपुरुषांचा संबंध संतानोत्पत्तीनंतर सुटून जातो. (५) विवाहित स्त्रीपुरुष परस्परांच्या सहकार्याने बरची कामे करण्याचा प्रयत्न करतात. पण नियुक्त स्त्रीपुरुष आपापल्या घराची कामे करीत असतात.

(प्रश्न) विवाह आणि नियोग यांचे नियम सारखेच आहेत की वेगवेगळे ? (उत्तर) काही थोडा फरक आहे. काहींचा उल्लेख पूर्वी केला आहे आणि हा आहे की विवाहित स्त्रीपुरुषांनी, एक पती व एकच पत्नी यांनी मिळून दहा संतानांना जन्म देवू शकतात. तर नियुक्त स्त्रीने अथवा पुरुषाने दोन किंवा चार याहून अधिक संतानोत्पत्ति करू शकत नाही. अर्थात ज्याप्रमाणे कुमार व कुमारी यांचाच विवाह होतो, त्याप्रमाणे ज्याची पत्नी अथवा जिचा पती निधन पावतो अशांचाच नियोग होतो. कुमार व कुमारी यांचा नियोग होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे विवाहित स्त्रीपुरुष सदैव जोडप्यात राहतात तसा नियुक्त स्त्रीपुरुषांचा व्यवहार नाही. किंबहुना ऋतुदानाच्या वेळेखेरीज त्यांनी एकत्र येऊ नये. जेव्हा स्त्री स्वतःसाठी नियोग करते तेव्हा दुसरा गर्भ राहिल्यानंतर त्या दिवसापासुन तिने नियुक्त पुरुषाशी संबंध सोडलेला असतो. त्याचप्रमाणे पुरुष स्वतःसाठी नियोग करीत असेल तर ज्या दिवशी दुसरा गर्भ राहील त्या दिवसापासून संबंध विच्छेद होईल स्त्रीने दोन-तीन वर्षांपर्यंत मुलांचे पालनपोषण करून ती नियुक्त पुरुषाच्या स्वाधीन करावीतअशा प्रकारे एक विधवा स्त्री स्वतःसाठी दोन आणि नियुक्त पुरुषासाठी दोन अशा एकूण चार संताने करू शकते. याचप्रमाणे एक विधुर पुरुष स्वतःसाठी दोन आणि चार विधवांसाठी आठ अशा एकूण दहा मुलांना जन्म देऊ शकतो, अशा प्रकारे नियुक्त पुरुषांना प्रत्येकी दहा मुलांना जन्म देण्याची परवानगी वेदांमध्ये आहे. उदाहरणार्थ,

इमां त्वमिन्द्र मीढ्वः सुपुत्रां सुभगां कृणु । दशास्यां पु त्रानाधेहि पतिमेकाद शं कृधि ।।-ऋ० मं० १० | सू ० ८५ | मं ० ४५ ||

हे (मीढ्व इन्द्र) वीर्य सेचन करण्यास समर्थ ऐश्वर्यसंपन्न पुरुषा ! तू या विवाहित स्त्रीला अथवा विधवा स्त्रियांना श्रेष्ठ पुत्र देऊन सौभाग्यशाली बनव. तू या विवाहित स्त्रीच्या ठिकाणी दहा पुत्र उत्पन्न कर आणि आपली पत्नी हा अकारावा पुत्र आहे असे समज. हे स्त्री ! तू ही विवाहित पुरुषाकडून (पतीकडून) किंवा नियुक्त पुरुषांकडून दहा संतान उत्पन्न कर आणि पती हा अकरावा पुत्र आहे असे समज. वेदाच्या या आज्ञेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णातील स्त्रीपुरुषांनी प्रत्येकी दहा मुलांहून अधिक उत्पन्न करू नयेत. कारण जास्त संतती झाल्याने ती निर्बल, निर्बुद्ध अल्पायुषी होते; आणि स्त्री-पुरुषही दुर्बळ अल्पायुषी व रोगी होऊन म्हातारपणी खूप दुःख भोगतात. (प्रश्न) हा नियोगाचा प्रकार व्यभिचारासारखाच दिसतो. (उत्तर) ज्याप्रमाणे अविवाहिताचा व्यभिचार होतो. त्याप्रमाणे अनियुक्तांच्या समागमाला व्यभिचार म्हटला जातो. यावरून असे सिद्ध होते की नियमाने विधिवत विवाह झाल्यावर व्यभिचार म्हणत नाहीत तसा नियोग हा नियमपूर्वक नियोग असल्यामुळे त्यालाही व्यभिचार म्हणता येत नाही. ज्याप्रमाणे दुसऱ्याची कन्या व दुसऱ्याचा मुलगा यांचा शास्त्रोक्त विधिपूर्वक विवाह झाल्यानंतर होणाऱ्या त्यांच्या समागमा मध्ये व्यभिचार, पाप अथवा लज्जा नसते त्याप्रमाणे वेदशास्त्रोक्त नियोगामध्ये व्यभिचार, पाप अथवा लज्जा मानावयास नको. (प्रश्न) आहे तर ठोक. परंतु सारे वेश्यागमनासारखे कर्म दिसते. (उत्तर) तसे नाही. कारण समागमनात कोणी निश्चित पुरुष किंवा कोणताही नियम नाही परंतु,नियोगात विवाहासारखे नियम आहेत. ज्याप्रमाणे आपली मुलगी विधिपूर्वक विवाहाद्वारे दुसऱ्याला देण्यात अथवा विवाहित स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी समागम करण्यात लाज वाटण्यासारखे काही नसते तसेच नियोगाच्या बाबतीतही काही लज्जास्पद आहे असे समजू नये. अर्थात जे स्त्रीपुरुष व्यभिचारी असतात ते लग्नानंतरही व्यभिचारापासून अलिप्त राहतात काय? (प्रश्न) आम्हाला तर नियोगात पापच आढळून येते. (उत्तर) जर नियोगात तुम्ही पाप मानत असाल तर मग लग्नातही पाप का मानत नाही? खरेतर नियोगाला अडथळा करण्यातच पाप आहे. कारण ईश्वराच्या सृष्टिक्रमानुसार पुरुषांचा स्वाभाविक व्यवहार थांबू शकत नाही. शिवाय वैराग्यवान व पूर्णविद्वान योगी याला अपवाद असतात. गर्भपातरूप, भ्रूणहत्या आणि विधवा स्त्रिया व विधुर पुरुष यांच्याकडून होणारी अनेक संतापजनक कुकर्में हीच खरी पापे नव्हेत काय ? जोपर्यंत स्त्रीपुरुष तरुण असतात तोपर्यंत त्यांच्या मनात प्रजोत्पादनाची इच्छा व विषयवासना असणे स्वाभाविक असते. त्यांच्या त्या इच्छेच्या मार्गात राजव्यवहार अथवा लोकव्यवहार यांच्यामुळे अडथळा निर्माण झाल्यास त्यांच्याकडून गुप्तपणे दुष्कृत्ये वाईट मार्गाने होऊ लागतात.

    अशा प्रकारे चालणारा व्याभिचार व कुकर्में थांबविण्याचा एकमेव श्रेष्ठ उपायंहा आहे की जे जितेंद्रिय राहू शकत असतील त्यांनी विवाह अथवा नियोगही करू नये. तर ठीक आहे परंतु ज्यांना असे राहता येणे शक्य नसेल त्यांनी योग्य वेळी विवाह व आपत्काळी नियोग अवश्य करावा. तसे झाल्यास व्यभिचाराचे प्रमाण खूप कमी होईल आणि प्रेमातून उत्तम प्रजा निर्माण होऊन माणसांची वृद्धी संभव होईल. गर्भपात पूर्णपणे बंद होतील. नीच पुरुषांशी उत्तम स्त्रीचा संबंध वेश्यादी नीच स्त्रियांशी उत्तम पुरुषांची व्यभिचाररूपी कुकर्में कमी होतील. उत्तम कुळे कलंकित होणे, वंशांचा उच्छेद, स्त्रीपुरुषांना होणारे मानसिक क्लेश व भ्रूण हत्यादी कुकर्मे वगैरे गोष्टींना विवाह व नियोग यांनी आळा बसतो. म्हणून नियोग केला पाहिजे.

(प्रश्न) नियोगामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत ? (उत्तर) विवाह जसा प्रसिद्धिपूर्वक होतो तसा नियोगही उघडपणे झाला पाहिजे. ज्याप्रमाणे विवाहामध्ये सभ्य पुरुषांची अनुमती आणि वधू-वरांची प्रसन्नता असते तशीच ती नियोगामध्येही असली पाहिजे. याचा अर्थ असा की जेव्हा स्त्रीपुरुषांचा नियोग व्हावयाचा असेल तेव्हा त्यांनी आपापल्या कुटुंबातील स्त्रीपुरुषांसमोर असे सांगावे की, 'आम्ही दोघे संतानोत्पत्तीसाठी नियोग करीत आहोत. जेव्हा नियोगाचा नियम पूर्ण होईल त्यानंतर आम्ही एकमेकांशी समागम करणार नाही. याविरुद्ध आम्ही वागलो तर पापी आणि समाज व शासन यांच्याकडून दंडनीय ठरू. महिन्यातून एकदा आम्ही गर्भाधानाचे कार्य करू आणि गर्भ राहिल्यानंतर एक वर्षभर एकमेकांपासून दूर राहू'. (प्रश्न) नियोग आपल्या वर्णातच व्हावा की अन्य वर्णाशीही व्हावा ? (उत्तर) आपल्या वर्गातील अथवा आपल्यापेक्षा उत्तम वर्णातील पुरूषाबरोबर नियोग करावा वैश्य स्त्रीने वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण पुरुषांशी; क्षत्रिय स्त्रीने क्षत्रिय व ब्राह्मण पुरुषाशी आणि ब्राह्मण स्त्रीने ब्राह्मण पुरुषाशी नियोग करावा. याचे तात्पर्य असे आहे की वीर्य हे समान किंवा उत्तम वर्णाचे असले पाहिजे;आपल्याहून खालच्या वर्गातील नाही. धमनेि म्हणजे वेदोक्त पद्धतीने विवाह अथवा नियोग यांच्या द्वारे संतानोत्पती करणे हेच स्त्री व पुरुष यांच्या सृष्टीचे प्रयोजन आहे. (प्रश्न) पुरुषाला नियोग करण्याची काय गरज आहे ? तो तर दुसरे लग्न करू शकतो. (उत्तर) आम्ही पूर्वी सांगितलेच आहे की वेदादी शास्त्रांमध्ये द्विज स्त्री आणि पुरुष यांनी एकदाच लग्न करावे. दुसरे लग्न करू नये. कुमार आणि कुमारी यांचा विवाह होणे हा न्याय होय. विधवा स्त्रीचा कुमाराशी आणि विधुराचा कुमारीशी विवाह होणे हा अन्याय, अधर्म आहे. ज्याप्रमाणे पुरुष विधवा स्त्रीशी विवाह करू इच्छित नाही त्याचप्रमाणे विवाहित स्त्रीशी समागम केलेल्या पुरुषाशी आपले लम व्हावे अशी इच्छा कोणतीही कुमारी बाळगणार नाही. अशाप्रकारे विवाहित (विधुर) पुरुषाशी कोणतीही कुमारी आणि विधवेशी कोणताही कुमार विवाह करणार नाही. तेव्हा पुरुष व स्त्री यांना नियोग करण्याची गरज भासेल. हाच धर्म आहे की जसा पुरुष तशी स्त्री यांचा संबंध झाला पाहिजे. (प्रश्न) वेदादी शास्त्रांमध्ये विवाहासंबंधी जशी प्रमाणे आहेत तशी प्रमाणे नियोगासंबंधीही आहेत किंवा नाही ? (उत्तर) या बाबतीत अनेक प्रमाणे आहेत, पाहा आणि ऐकाः

कुह स्विद्दो षा कुह वस्तोर श्विना कुहापिभिपि त्वं करत: कुहोषतुः । को वां शयु त्रा विधवेवपिव दे वरं मर्य्य न योषा कृणुते स धस्थ आ ||-ऋ० मं० १० | सू० ४० | मं० २ ||

    है (अश्विना) स्त्री पुरुषांनो ! ज्या प्रमाणे (देवरं विधवेव) विधवा स्त्री दिराशी म्हणजे नियुक्त पुरुषाशी (योषा मर्यन्न) विवाहित स्त्री आपल्या पतीशी (सधस्थे) समान स्थानी व शय्येवर एकत्र होऊन सर्व प्रकारे संतानोत्पत्ती (आ कृणुते) करते, त्याप्रमाणे तुम्ही उभयता स्त्री पुरुषांनीही करावे. (कुह स्विद्दोषा) तुम्ही रात्री कोठे होता आणि (कुह वस्तः ) दिवसा कोठे होता? (कुहाभिपित्वम्) पदार्थाची प्राप्त कोठे (करतः) केली? आणि (कुहोषतुः) कोणत्या वेळी कोठे राहत होता ? (को वां शयुत्रा) तुमचे शयनस्थान कोठे आहे? तुम्ही कोणत्या देशाचे रहिवासी आहात? ॥१॥
    यावरून सिद्ध झाले का स्त्री पुरुषांनी देशात व परदेशात एकमेकांबरोबर राहावे त्याचप्रमाणे विधवा स्त्रीनेही विवाहित पती प्रमाणे नियुक्त पतीचा स्वीकार करून संतानोत्पत्ती करून घ्यावी.

(प्रश्न) पण एखाद्या स्त्रीच्या पतीला धाकटा भाऊ दीर नसेल तर विधवेने कोणाशी नियोग करावा? (उत्तर) देवराशी. परंतु देवर शब्दाचा अर्थ जसा तुम्ही समजता तसा नाही. पाहा, निरुक्तामध्ये (असे सांगितले) आहे.

देवरः कस्माद् द्वितीयो वर उच्यते |-निरू० अ० ३ | खण्ड १५ ||

(द्वितीय वर म्हणजे देवर) विधवेचा दुसरा पती असतो त्याला देवर असे म्हणतात. मग तो पतीचा धाकटा भाऊ असो की थोरला, आपल्या वर्णाचा असो की आपल्याहून उच्च वर्णाचा ज्याच्याशी नियोग केला जातो त्याचे नाव देवर आहे.

उदीषर्व नार्य भिजीवलो वंफ ग तासुमे तमुप शेष एहि । ह स्त ग्रा भस्य दिधि षोस्तवे दं पत्यु र्जनि त्वम भि सं बभूथ ।।२।।– ऋ० मं० १० | सू० १८ | मं० ८ ||

(नारि) हे विधवे , तू (एतं गतासुम) या मेलेल्या पतीची आशा सोडून (शेषे) बाकीच्या पुरुषांपैकी (अभि जीवलोकम) जिवंत असलेल्या दुसऱ्या पतीला (उपैहि) प्राप्त हो आणि (उदीष्र्व) असा विचार व निश्चय कर की जर (हस्तग्राभस्य दिधिषो:) तुझे पुनः पाणिग्रहण करणाऱ्या नियुक्त पतीसाठी तुझा नियोग झाला असेल तर (इदम्) है (जनित्वम्) जन्मलेले बालक त्याच नियुक्त (पत्युः) पतीचे होईल आणि जर स्वतःसाठी नियोग कणार असशील तर हे मूल (तव) तुझे होईल. हा नियम लक्षात घेऊन (अभि सम् बभूथ) तू निश्चय कर. नियुक्त पुरुषानेही याच नियमाचे पालन करावे.

अदेवृ घ्न्यपतिघ्नी हैधि शि वा पशुभ्य: सु यमा सु वर्चा । प्र जावती वीर सूर्दे वृकामा स्यो नेमगनिम गार्हपत्यं सपर्य ।।-अथर्व० का० १४ |अनु० २ | मं० १८ ||

हे (अपतिघ्न्यदेवृघ्नि) पतीला व दिराला दुःख न देणाऱ्या स्त्रिये, तू (इह) या गृहस्थाश्रमामध्ये (पशुभ्यः) पशूंचे (शिवा) कल्याण करणारी, (सुयमाः) उत्तम प्रकारे धर्मनियमांचे पालन करणारी, (सुवर्चाः) रूपवती व सर्व शास्त्रे जाणणारी (प्रजावती) उत्तम पुत्रपौत्रादींनी युक्त, (वीरसूः) शर पुत्रांना जन्म देणारी (देवृकामा) देवराची (दीराची) इच्छा करणारी व (स्योना) सुख देणारी, पती किंवा देवर यांना (एधि) प्राप्त होऊन (इमम्) या (गार्हपत्यम्) गृहस्थसंबंधी (अग्निम्) अग्निहोत्राचे (सपर्य) आचरण करीत जा.

तामनेन विधानेन निजो विन्देत देवरः ॥ मनु०।। अ.९।। श्लो.६९।।

अक्षतयोनी स्त्री विधवा झाली तर तिच्या पतीच्या धाकटा भाऊसुद्धा तिच्याशी लग्न करू शकतो. (प्रश्न) एका स्त्रीने अथवा पुरुषाने किती नियोग करावेत ? आणि विवाहित नियुक्त पतींची नावे काय असतात ? (उत्तर) सोम: प्रथ मो विविदे गन्ध् र्वो विविद उत्तरः । तृ तीयो अ ग्निष्टे पतिस्तु रीयस्ते मनुष्य जाः ।। -ऋ० मं० १० | सू० ८५ | मं० ४० ||

हे स्त्रिये, जो (ते) तुला (प्रथमः) पहिला विवाहित (पतिः) पती (विविदे) प्राप्त होतो त्याचे नाव (सोमः ). सुकुमारस्व आदी गुणयुक्त असल्याने सो जो नियोगाने दुसरा पती (विविदे) प्राप्त होतो त्याला (गंधर्व) त्याने पूर्वी स्त्रीशी संभोग केला असल्यामुळे गंधर्व असे म्हणतात. जो (तृतीय उत्तरः) या दोघांनंतर तिसरा पती असतो त्याला (अग्निः) त्याच्या शरीरात फार उष्णता असल्यामुळे अग्नी संज्ञक आणि जे (ते) तुला (तुरीयः) चौथ्यापासून अकराव्या क्रमापर्यंत नियोगाने पती प्राप्त होतात त्यांना (मनुष्यजाः) मनुष्य असे म्हटले जाते. (इमां त्व मिन्द्र) या मंत्रावरून स्त्रीने अकराव्या पुरुषापर्यंत आणि पुरुषानेही अकराव्या स्त्रीपर्यंत नियोग करण्यास हरकत नाही. (प्रश्न) ‘एकादश' या शब्दाचा अर्थ दहा पुत्र व अकरावा पती असा का समजू नये? (उत्तर) असा अर्थ केल्यास ‘विध्वेव देवरम्’ 'देवरः कस्माद् द्वितीयो वर उच्यते’ ‘अदेवृघ्नि’आणि ‘गन्ध्र्वो विविद उत्तरः’ इत्यादी वेदप्रमाणांच्या विरुद्ध अर्थ होईल. कारण तसा अर्थ केल्यास दुसरा पतीही प्राप्त होऊ शकत नाही.

नियोग अपादधर्म

देवराद्वा सपिण्डाद्वा स्त्रिया सम्यङ्नियुक्तया । प्रजेप्सिताआधिगन्तव्या संतानस्य परिक्षये ॥१॥ मनु०।। अ.९।। श्लो.५९।। ज्येष्ठो यवीयसो भार्यां यवीयान्वाग्रजस्त्रियम् । पतितौ भवतो गत्वा नियुक्तावप्यनापदि ॥२॥ मनु०।। अ.९।। श्लो.५८।। औरसः क्षेत्रजश्चैव.॥ मनु०।। अ.९।। श्लो.१५९।।

मनु महाराजांनी सांगितले आहे की, सपिड म्हणजे पतीच्या सहा पिढ्यांमध्ये येणारा, नवऱ्याचा लहान किंवा मोठा भाऊ किंवा स्वजातीय तथा आपल्यापेक्षा उत्तम जातीचा, अशा पुरुषाशी विधवा स्त्रीचा नियोग झाला पाहिजे. मात्र विधवा अथवा विधुर यांना संतानोत्पत्तीची इच्छा असेल तरच नियोग होणे उचित होय किंवा पूर्वी झालेल्या संतानांचा जेव्हा सर्वथा क्षय झाला असेल तेव्हा नियोग करावा. जेव्हा आपत्काल म्हणजे संतानोत्पत्तीची इच्छा नसता मोठ्या भावाच्या पत्नीशी धाकट्या भावाचा आणि धाकट्या भावाच्या पत्नीशी मोठ्या भावाचा नियोग होऊन मुले झाल्यानंतरहीं नियुक्त स्त्रीपुरुष पुनः परस्परांशी समागम करतील तेव्हा ते पतित होतील. दुसऱ्या पुत्राचा गर्भ राही पर्यंतच एका नियोगाचा अवधी असतो. त्यानंतर त्यांनी समागम करू गये. जर नियोग दोघांसाठी झालेला असेल तर चौथा गर्भ राहीपर्यंत अर्थात पूर्वोक्त रीतीने नियोगाद्वारे दहा पर्यंत मुले होऊ शकतात. त्यानंतर शरीरसंबंध ठेवल्यास ती विषयासक्ती समजली जाते व त्यामुळे ते दोघे पतित समजले जातात. आणि जर विवाहित स्त्रीपुरुषही दहाव्या गर्भानंतर समागम करीत राहतील तर तेही कामासक्त व निंदनीय समजले जातात. म्हणजे विवाह अथवा नियोग हे केवळ संतानोत्पत्तीसाठीच असतात; पशूंप्रमाणे कामक्रीडा करण्यासाठी नव्हे. (प्रश्न) नियोग हा पतीच्या मृत्यू नंतरच होतो की त्याच्या जिवंतपणीही ? (उत्तर) पती जिवंत असतानाही नियोग होऊ शकतो.

अ न्यमिपिच्छस्व सुभगे पतिं मत् ।।– ऋ मं० ११ | सू० १० || मं० १०||

जेव्हा पती संतानोत्पत्ती करण्यास असमर्थ होतो तेव्हा त्याने आपल्या पत्नीला ‘आज्ञा करावी की, "हे (सुभगे) सौभाग्याची इच्छा करणाऱ्या स्त्रिये, तू (मत्) माझ्याहून (अन्यम्) दुसऱ्या पतीची (इच्छस्व) इच्छा कर. कारण आता माझ्यापासून संतानोत्पत्तीची आशा नाही." तेव्हा स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी नियोग करून संतोनोत्पत्ती करावी. मात्र आपल्या विवाहित पतीच्या सेवेमध्ये तिने सदैव तत्पर राहावे. याच प्रमाणे जेव्हा पत्नीही रोगादी दोषांनी ग्रस्त होऊन संतानोत्पत्ती करण्यास असमर्थ झाली असेल तेव्हा तिने आपल्या पतीला अशी आज्ञा करावी की, 'हे स्वामी ! तुम्ही आता माझ्याकडून संतानोत्पतीची इच्छा सोडून दुसऱ्या एखाद्या विधवा स्त्रीशी नियोग करून संतानोत्पदन करावी.' ज्याप्रमाणे पांडु राजाच्या कुंती व माद्री या राण्यांनी नियोग केले होते; आणि जसे व्यास महर्षीनी चित्रानंद व विचित्रवीर्य हे निधन पावल्यावर त्या आपल्या भावाच्या बायकांशी नियोग करून अंबिकेला धृतराष्ट्र , अंबालिकेला पांडू व दासीला बिदुर यांची उत्पत्ति केली. या इतिहासावरूनही वर सांगितलेले नियोगविषयक विधान प्रमाण आहे.


प्रोषितो धर्मकार्यार्थं प्रतीक्ष्योऽष्टौ नरः समाः । विद्यार्थं षड्यशोऽर्थं वा कामार्थं त्रींस्तु वत्सरान् ॥१॥ मनु०।। अ.९।। श्लो.७६।।

पती जर धर्मकार्यासाठी परदेशी गेला असेल तर आठ वर्षे, विद्या व कीर्ती मिळविण्यासाठी गेला असेल तर सहा वर्षे आणि पैसा कमावण्यासाठी गेला असेल तर तीन वर्षे त्याच्या विवाहित पत्नीने प्रतीक्षा करून नंतर नियोग करून विवाहीत स्त्रीने संतानोत्पत्ती करून घ्यावी. विवाहित पती परत आल्यावर नियुक्त पती सुटून जाईल ॥१॥

वन्ध्याष्टमेऽधिवेद्याऽअब्दे दशमे तु मृतप्रजा । एकादशे स्त्रीजननी सद्यस्त्वप्रियवादिनी ॥२॥मनु०।। अ.९।। श्लो.८१।।

अशाच प्रकारचा नियम पुरुषासाठीही आहे. पत्नी वंध्या असेल तर आठ वर्षे (लग्ना नंतर आठ वर्षांपर्यंत गर्भ राहिला नाही तर) मुले होऊन मरत असतील तर दहा वर्षे, फक्त मुलीच होत असतील, मुलगा होत नसेल तर अकरा वर्षे पर्यंत आणि जर पत्नी अप्रिय भाषण करणारी असेल तर पतीने तिला ताबडतोब सोडून देऊन, दुसऱ्या स्त्रीशी नियोग करून प्रजोत्पादन करून घ्यावे. ॥२॥

    याच प्रमाणे पुरुष जर अत्यंत दु:खदायक असेल तर त्याच्या पत्नीस योग्य आहे की तिने त्याला सोडून दुसऱ्या  पुरुषाशी नियोग करून संतानोत्पत्ती करून व आपल्या विवाहित पतीच्या संपत्तीला वारसदार निर्माण करावेत. ही सर्व प्रमाणे व युक्त्यानुसार स्वयंवर विवाह व नियोग यांद्वारे आपापल्या कुळाची उन्नती करावी जसे विवाहित पतीपासून होणारा 'औरस' मुलगा आपल्या बापाच्या मालमत्तेचा मालक बनतो तसेच नियोगातून जन्मास आलेल्या मुलाला 'क्षेत्रज' असे म्हणतात. ही क्षेत्रज मुलेही औरस मुलांप्रमाणे मृत पित्याची वारसदार बनतात.
    आता या संदर्भात स्त्री व पुरुष यांनी हे लक्षात ठेवावे की आपल्या शरीरातील वीर्य व रज यांना अमूल्य समजावे. जे कोणी या अमूल्य वस्तुंचा परस्त्री, वेश्या अथवा दुष्ट पुरुष यांच्या संगाने अपव्यय करतात ते महामूर्ख होत. सामान्य शेतकरी अथवा माळी अडाणी असला तरी आपल्या शेताखेरीज, बागेखेरीज इतरत्र बी पेरत नाही. सामान्य बीज व अडाणी माणूस यांची अशी स्थिती असताना जो कोणी सर्वोत्तम मनुष्य शरीररूपी वृक्षाचे बीज वाईट क्षेत्रात टाकून वाया घालवितो त्याला महामूर्ख म्हणतात. कारण त्याचे फळ त्याला मिळत नाही आणि

‘आत्मा वै जायते पुत्रः’ है ब्राह्मण ग्रंथाचे वचन आहे

अंगादंगात सम्भवसि हृद या दधि जायसे । आ त्मासि पुत्रा मा मृथाः स जीव श रदः श तम् ॥१॥ सामवेद ब्राह्मण

हे सामवेदातील वचन आहे. हे पुत्रा ! तू माझ्या अंगाअंगातून निर्माण होणान्या वीर्यापासून व हृदयपासून उत्पन्न होतोस. म्हणून तू माझा आत्मा आहेस. तू माझ्या आधी मरू नकोस किंतु तू शंभर वर्षे जग. ज्या वीर्यपासून महात्मे व थोर पुरुष याची शरीरे उत्पन्न होतात ते वीर्य वेश्यादी दुष्ट क्षेत्रात पेरणे अथवा वाईट बीज चांगल्या क्षेत्रात पेरणे हे महापापाचे काम आहे.

विवाह

(प्रश्न) विवाह का करायचा? विवाह केल्याने स्त्री पुरुष बंधनात गुंतून त्यायोगे त्यांना फार संकोच होतो व दुःख भोगावे लागते. म्हणून ज्यांची त्यावर प्रीती असेल त्यांनी तोपर्यंत मिळून आणि प्रीती संपली की सोडून द्यावे. (उत्तर) असे करणे हे पशुपक्ष्यांचे बर्तन होय, माणसांचे नव्हे. मानवजातीत विवाहाचे बंधन नसेल तर गृहस्थाश्रमातील सर्व उत्तम व्यवहार नष्ट भ्रष्ट होऊन जातील. कोणी कोणाची सेवा करणार नाही आणि महाव्यभिचार मागून सर्व माणसे रोगट, दुर्बळ व अल्पायुषी बनून त्यांचा कुळनाश होईल. कोणी कोणाच्या वस्तूंचा मालक अथवा वारस होऊ शकणार नाही आणि कोणाचा कोणत्याही वस्तूवर दीर्घकाळपर्यंत मालकी हक्क राहणार नाही अशा प्रकारच्या दोषाच्या निवारणार्थं विवाहाच होणे सर्वथा योग्य आहे. (प्रश्न) जेव्हा एकच विवाह होईल एका पुरुषाला एक स्त्री व एका स्त्रीला एक पुरुष मिळेल. अशा स्थितीत स्त्री गरोदर असेल, कायमची आजारी असेल, अथवा पुरुष दीर्घकाळ रोगग्रस्त असेल, आणि दोघेही तरुण असतील आणि त्यांच्याने राहवले नाही तर मग त्यांनी काय करावे ? (उत्तर) याचे उत्तर नियोगविषयक विवेचनात आले आहे. स्त्री गरोदर असताना एक वर्षभर तिच्याशी समागम न करण्याने त्या काळात पुरुष अथवा स्त्री यांच्याने राहवले नाही तर कुणाशी तरी नियोग करून त्याच्यासाठी पुत्रोत्पत्ती करावी. परंतु वेश्यागमन अथवा व्यभिचार मुळच करू नये.

     माणसाने शक्य तोवर अप्राप्त वस्तूची इच्छा बाळगावी प्राप्त वस्तूंचे रक्षण करावे आणि रक्षण केलेल्या वस्तूमध्ये वाढ करावी. तसेच वाढलेल्या धनाचा उपयोग देशाच्या उपकारासाठी करावा. आपापल्या वर्णाश्रमाचे सर्व व्यवहार पूर्वी सांगितल्याप्रमाणे अत्यंत उत्साहाने, प्रयत्नपूर्वक तन-मन-धनाने सदैव करून परमार्थ केला पाहिजे. आपले आई-बाप व सासू-सासरे यांची मनापासून सेवाशुश्रूषा करावी. मित्र, शेजारी-पाजारी, राजा, विद्वान वैद्य व सत्पुरुष यांच्यावर प्रेम करावे आणि जे दुष्ट व अधर्मी आहेत यांची उपेक्षा करावी. परंतु त्यांचा दोष न करता त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावा. शक्य असेल त्याप्रमाणे प्रेमाने आपल्या मुलांना विद्वान व सुशिक्षित करण्या करविण्यात आणि संपत्ती खर्च करून त्यांना पूर्ण विद्वान सुशिक्षित करावे तसेच धर्मयुक्त आचरणाने मोक्षाचेही साधन करावे. त्यामुळे परमानंदाचा उपभोग घेता येईल. खाली दिलेल्या श्लोकांना प्रमाण मानू नयेत हे पाराशरीचे कपोलकल्पित श्लोक आहेत.

पतितोsपि द्विजः श्रेष्ठो न च शूद्रो जितेन्द्रियः | निर्दुग्धा चापि गौः पूज्या न च दुग्धवती खरी ॥१॥

दुष्ट कर्म करणारा, द्विजाला श्रेष्ठ व श्रेष्ठ कर्म करणाऱ्या शूद्राला नीच मानावे यापेक्षा मोठा पक्षपात अन्याय, अधर्म दुसरा कोणता असेल ? जसी दूध देणारी वन देणारी गाय गोपालांना पालनीय होते तसे कुंभाराला गाढवी पालनीय होत नाही काय ? आणि हा दृष्टान्त सुद्धा विषम आहे कारण द्विज व शुद्ध मनुष्य जाती एकच आहे त्यात गाय व गाढवी यांसारखी भिन्न जात नाही कदाचित पशुजातीबद्दल दृष्टान्ताचा एकदेशी उदाहरण जरी मिळत असले तरी या दृष्टान्ताचा आशय अयोग्य असल्यामुळे असले श्लोक विद्वानांना कधीच मान्य होऊ शकत नाही. ॥१॥

अश्वालम्भं गवालम्भं संन्यासं पलपैत्रिकम् | देवराच्च सुतोत्पति कलौ पञ्च विवर्जयेत ॥२॥

अश्वालंभ म्हणजे घोड्याला ठार मारून त्याचा होम करणे आणि गवालंभ म्हणजे गाईल मारून तिच्या मांसाचा होम करणे ही कर्मे वेदविहित नाहीत तर त्यांचा कलियुगापुरताच निषेध करणेही वेदविरुद्धच समजावे. जर कलियुगामध्ये ही नीच कर्मे निषिद्ध असतील तर कृतत्रेतादी युगांमध्ये ती कशी योग्य ठरतील ? श्रेष्ठ युगामध्ये असली दुष्कृत्ये होणे सर्वथा असंभव आहे. वेदादिशास्त्रा मध्ये संन्यासाचा विधी सांगितलेला आहे. म्हणून त्याचा निषेध करणे निरर्थक आहे. मांस निषिद्ध असेल तर ते सर्वकाळी निषिद्धच आहे. दिरापासून पुत्रोत्पत्ती करून घ्यावी असे वेदांत लिहिले आहे. तर मग हा श्लोकतत्याविरुद्ध का बरळतो? ॥२॥

नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ | पञ्चस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥३॥

(नष्टे)  पती परदेशी गेला असता घरी स्त्रीने नियोग करून घ्यावा आणि त्याच वेळी विवाहित पती परत आला तर ती स्त्री कोणाची समजावी? कोणी म्हणेल की तीbविवाहित पतीची समजावी. आम्ही ते मानले. परंतु तशी व्यवस्था पाराशरीमध्ये दिलेली नाही, काय पाचच आपत्काल स्त्रीच्या बाबतीत आहेत काय ? रोग ग्रस्त होणे व लढाईत मारले जाणे इत्यादी आपत्काल पाचाहून अधिक आहेत. म्हणून असल्या श्लोकांवर मुळीच विश्वास ठेवू नये.॥३॥

(प्रश्न) काय हो ! तुम्ही पराशर मुनीचे वचनही मानीत नाही काय ? (उत्तर) कोणाचेही वचन असो, ते वेदविरुद्ध असल्याने आम्ही मानीत नाही आणि हे तर पराशरांचे वचनही नाही. काही लबाड लोक 'ब्रह्मोवाच, वसिष्ठ उवाच, राम, उवाच, शिव उवाच, विष्णुरुवाच, देव्युवाच' इत्यादी श्रेष्ठांचे नाव घालून यासाठी ग्रंथरचना करतात की ही नावे सर्वमान्य असल्यामुळे जगभर त्या ग्रंथांना मान्यता प्राप्त व्हावी आणि आपली उपजीविका उत्तम प्रकारे चालावी म्हणून हे अनर्थकारक गाथाग्रंथ रचतात. मनुस्मृतीमधील काही प्रक्षिप्त श्लोक वगळल्यास बाकीचा ग्रंथ वेदानुकूल आहे. इतर स्मृती तशा नाहीत याचप्रमाणे इतर (नकली) ग्रंथांच्या बाबतीतही असेच समजावे.

गृहाश्रमाची श्रेष्ठता।

(प्रश्न) गृहस्थाश्रम हा सर्वात लहान आहे की मोठा आहे? (उत्तर) आपापल्या कर्तव्यकर्माच्या बाबतीत सर्व आश्रम श्रेष्ठच आहेत. परंतु

यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् । तथैवाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम् । १॥ मनु०।। अ.६।। श्लो.९०।।

ज्याप्रमाणे नद्या आणि मोठेमोठे नद समुद्राची भेट होईपर्यंत भ्रमण करीत राहतात जोपर्यंत समुद्राला मिळत नाहीत त्याप्रमाणे गृहस्थाच्या आश्रयानेच इतर सर्व आश्रम स्थिर राहतात॥१॥

यथा वायुं समाश्रित्य वर्तन्ते सर्वजन्तवः । तथा गृहस्थं आश्रित्य वर्तन्ते सर्व आश्रमाः ॥२॥ मनु०।। अ.३।। श्लो.७७।।

गृहस्थाश्रमाच्या आधाराशिवाय कोणत्याही आश्रमाचा व्यवहार सिद्ध होत नाही. ॥२॥

यस्मात्त्रयोऽप्याश्रमिणो ज्ञानेनान्नेन चान्वहम् । गृहस्थेनैव धार्यन्ते तस्माज्ज्येष्ठाश्रमो गृही ।३॥ मनु०।। अ.३।। श्लो.७८।।

ब्रह्मचारी, वानप्रस्थ व संन्यासी या तीन्ही आश्रमांतील व्यक्तींना गृहस्थ चदान व अन्न वगैरे देऊन नियमीत गृहस्थ धर्मच धारण करतो. म्हणून गृहस्थाश्रम हा सर्वात ज्येष्ठ आश्रम समजला जातो आणि सर्व व्यवहारांमध्ये गृहस्थ हा धुरंधर आहे असे म्हटले जाते. यासाठी मोक्षाची व संसारसुखाची इच्छा बाळगणाऱ्याने प्रयत्नपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करावे. ॥३॥

स संधार्यः प्रयत्नेन स्वर्गं अक्षयं इच्छता । सुखं चेहेच्छतात्यन्तं योऽधार्यो दुर्बलेन्द्रियैः ॥४॥ मनु०।। अ.३।। श्लो.७९।।

    हा गृहस्थाश्रम दुबळ्या इंद्रियाच्या म्हणजे भित्र्या व दुर्बळ पुरुषांना धारण करण्यास अयोग्य आहे म्हणून त्याचे धारण चांगल्याप्रकारे करावे. ॥४॥
    अशा प्रकारे जगामध्ये जो काही व्यवहार आहे त्याचा आधार गृहस्थाश्रम आहे जर गृहस्थाश्रम नसता तर संतानोत्पत्तीन होऊन ब्रह्मचर्य वानप्रस्थ व संन्यास हे आश्रम कोठून होणे शक्य असते ? जो कोणी गृहस्थाश्रमाची निंदा करतो तोच निंदनीय आहे आणि जो प्रशंसा करतो तोच प्रशंसनीय आहे, जेव्हा स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांवर प्रसन्न , विद्वान, पुरुषार्था व सर्व प्रकारच्या व्यवहारांचे जाणकार असतात तेव्हाच गृहस्थाश्रमात सुख मिळते म्हणून पूर्वी सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमातील सुखाचे मुख्य कारण ब्रह्मचर्य व पूर्वोक्त स्वयंवर विवाह हे आहे.
    याप्रमाणे संक्षेपाने समावर्तन, विवाह व गृहस्थाश्रम यांविषयी आम्ही उपदेश लिहिला आहे. या नंतरच्या प्रकरणात वानप्रस्थ व संन्यास या विषयांसंबंधी लिहिला जाईल.

इति श्रीमदयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषिते समावर्तनविवाहगृहाश्रमविषये चतुर्थः समुल्लासः सम्पूर्णः ॥४॥