केला पीकाचा रे सांठा जपी

केला पीकाचा रे सांठा
जपीसन सर्व्याआधीं
शेत शिवाराचं धन
आतां आलं खयामधीं

खय झालं रे तैयार
सम्दी भूई सारवली
मधी उभारलं मेढ
पात बैलाची चालली

आतां चाल चाल बैला,
पात चाले गरगर
तसे कनूसामधून
दाने येती भरभर

आतां चाल चाल बैला,
आतां चाल भिरभिरा
व्हऊं दे रे कनुसाचा
तुझ्या खुराखाले चुरा

पाय उचल रे बैला,
कर बापा आतां घाई
चालूं दे रे रगडनं
तुझ्या पायाची पुन्याई !

पाय उचलरे बैला,
कनूसाचा कर भूसा
दाने एका एकांतून
पडतील पसा पसा

आतां चाल चाल बैला,
पुढें आली उपननी
वारा चालली रे वाया,
कसा ठेवू मी धरूनी

पात सरली सरली
रगडनी सुरूं झाली
आतां करूं उपननी
झट तिव्हार मांडली

आतां सोडी देल्ही पात
बैलं गेले चार्‍यावरी
डोयापुढें उपननी
जीव माझा वार्‍यावरी

रगडनी रगडनी
देवा, तुझीरे घडनी
दैवा तुझी झगडनी
माझी डोये उघडनी !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.