जगतास जागवायाला केशवसुत गाउनि गेले !

इंग्लंद भूमि शेलेची माहेर जडाचें बनले,
सन्देश गूढ जे त्याचे तैसेच मानसीं जिरले,
तपोवना मानवतेच्या या बघतां मानस हंसले!

देवाचे हेतु न पुरले,
अर्धेच कार्य जे उरले,
ते येथे करुनी गेले,
अवतरुनी फिरुनी शेले ! केशवसुत गाउनि गेले!

एकेका शब्दें भरले काव्याचे अद्भुत पेले !
ज्यांसाठीं मानव झटले, ते सुधाकुंभ भरलेले–
वाग्देवी वरुनी टाकी केशवसुतहृदयी झेले!

अनुभवुनि निजानंदाने
मग त्यांचे के ले गाणे,
श्वासाच्या कारंज्याने
चहुंकडे उधळुनी दिधले! केशवसुत गाउनि गेले !

हे तुषार पडतां अंगी बिंदूंचे सिंधू झाले!
निजलेल्या जागृति आली, हो ताजें जें थकलेले!
मरणासचि आले मरणें, मग केले त्यानें काळे!

तों शब्द मुक्याला सुचले !
गूढास रूप सापडले !
स्वच्छंद अचेतन हाले !
नश्वर ते ईश्वर केले ! केशवसुत गाऊनि गेले !

भेदभाव विलया गेला, सूक्ष्मात स्थूल मिळाले !
गगनाचे फाटुनि पडदे दिसलें जें त्यापलिकडले !
मरणाचे मूळच तुटले, जन्माचे नाते सुटले !

वस्तुंत वस्तुपण भरलें,
जीवंत जीवही झाले,
आत्म्यास आत्मपद आले,
ब्रह्मही ब्रह्मसे ठरले ! केशवसुत गाऊनि गेले !

कळले की ‘आम्ही कोण !, ‘हरपले श्रेय ‘ सापडलें;
आत्मा हो ‘वेडापीर’, सृष्टीत ‘ भृंग ‘ सा रंगे;
मारुनिया ‘गोंफण’ काळा निज ‘निशाण’ नभिं फडकविंले !

ऐकताच विजयि ‘तुतारी’
हो चिरंजीव ‘म्हातारी’
मग वाजविताच ‘सतारी’
सर्वत्र ‘झपूर्झा ‘ झाले ! केशवसुत गाउनि गेले !

या स्थितीत त्या ब्रह्माची ब्रह्माशीं मिळणी घडली,
जे चिरंतनाच्यासाठी सांगता तयाची झाली.
परि जनता वेडी कुठली, ” केशवसुत मेले ” वदली !

परि जन्ममरण हे वारे
कल्पनाच नाचवि सारे !
मूर्खानों ! रडता का रे,
की ”केशवसुत ते मेले ! ” केशवसुत गाउनि गेले !

जे एकाठायी होते, ते सर्वांठायीं भरले;
सर्वांच्या हृदयीं भरले सर्वांच्या जीवी भिनले;
विश्व स्थिर ज्यांनी केले का वदता तेच निमाले?

लीलेनें त्यांनी गातां
ही सजीव केली जडता,
अणुरेणूंमधुनी आतां
निघतील तयांचे चेले ! केशवसुत गाउनि गेले !

सर्व ठायि सर्वही काळी सर्वांनी त्यास पहावें,
पाहतां पाहतां वाटे डोळयांनी ज्यास गिळावें,
तो विषय होई मरणाचा जन बोले काय करावें ?

जे चकव्यावाचुनि चकले,
जरि ते कुणि कांहीं भकले,
तरि ‘गोविंदाग्रज’ बोले
केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.