चतुःश्लोकी भागवत/अहंकारशून्य

रोग गेलियाची लक्षणें । रोगी नेणे, वैद्य जाणे । तेवीं ब्रह्मा सांडिला अभिमानें । हें नारायणें जाणितले ॥७४॥
लक्ष भेदितां धनुर्धरें । जेवी कां निविजे निजकरें । तेवीं ब्रह्मा निवटला अहंकारें । हें स्वयें श्रीधरें जाणितलें ॥७५॥
जें बोधा आले शिष्यासी । तें नसांगतां कळे श्रीगुरुसी । तेवी जाणोनियां हषीकेशी । ह्नणे ब्रह्मयासी सावधान ॥७६॥
‘ निजानुभव पाहे पूर्ण । ’ ऐसें ऐकतां सदगुरुवचन । चमत्कारला चतुरानन । देहीं देहपण विदेहत्वा आलें ॥७७॥
जीवदशा वोवांडितां । निजात्मता पावोंजातां । ते संधीं सत्वावस्था । अतिसप्रेमता वोसंडे ॥७८॥
निजात्मरुपीं पडतां दृष्टी । सुखाचा पुर लोटे पोटीं । हर्षे बाष्प दाटे कंठीं । परेंसी गोष्टी सदगदित वाचा ॥७९॥
नेत्रीं आनंदाश्रूचिया धारा । सुखोमीं कांपे थरथरां । हर्षे उचलल्या रोममुद्रा । स्वेदामृतपुरा सार्द्रत्व ॥६८०॥
अहं सोहं जाले लीन । मनें मन झालें उन्मन । चित्त जालें चैतन्यघन । जीव परिपूर्ण ब्रह्म जाला ॥८१॥
जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें । जें जागें ना निदसुरें । जें सहजान्वयें खरें सदोदित ॥८२॥
जे केलें ना झालें । जें गेलें ना आलें । जें होतें ना हरपलें । संपूर्णत्वें संचलें परिपूर्ण ॥८३॥
जेथें न साहे रुपनाम । जेथें नसाहे क्रियाकर्म । जेथें न रिघे धर्माधर्म । तें पूर्णब्रह्म परमेष्ठी झाला ॥८४॥
जेथें न रिघे हेतूमातू । जेथें न रिघे दृश्य दृष्टांतु । जिचा नसे आदिअंतू । ते वस्तु सदोदितू विरंची झाला ॥८५॥
ज्याचा न लागे लागमाग । ज्यासि न लगे अवयव अंग । आंगेंवीण अव्यंग । निजवस्तु सांग स्वयंभु झाला ॥८६॥
जेथें दुःखत्वें नरिघे दुःख । सुखत्वें नरिघे सुख । जिचें हरिहरां न करवे तुक । ते वस्तु सम्यक् स्त्रष्टा झाला ॥८७॥
जेणें सुखें आनंदमय शंभू । जेणें सुखें सुखरुप झाला स्वयंभू । तें सुखरुप पावला स्वयंभू । आनंदलाभु सदगुरुकृपा ॥८८॥
भावें सदगुरुतें भजतां । स्रष्टा पावला स्वस्वरुपता । यालागीं गुरुभक्तीपरता । मार्ग परमार्था असेना ॥८९॥
जरी साच चाड परमार्था । तरी भावें भजावें गुरुनाथा । सकल साधनांच्या माथां । जाण तत्त्वतां गुरुभक्ति ॥६९०॥
ज्याचे मुखीं गुरुचें नाम । ज्यासि गुरुसेवा नित्यकर्म । तो देहासहित परब्रह्म । त्यासि कर्माकर्म बाधीना ॥९१॥
ज्यासि स्वानंदे गुरुभक्ती । त्याच्या चरणतीर्था तीर्थे येती । वेद बंदीजन होती । सुरनर वंदिती पदरज त्याचे ॥९२॥
गुरुभक्ती नांदे ज्याचे घरीं । यम त्याची तराळकी करीं । काळ आज्ञा वाहे शिरीं । तो पूजिजे हरी परमात्मभावें ॥९३॥
गुरुभक्तीचे पवाडे । वर्णितां वेदासि मौन पडे । गुरुभक्तीवरते चढे । ऐसें चोखडे साधन नाही ॥९४॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.