सर्वत्र जे समसाम्यता । यानांव समाधी तत्त्वतां । परी तटस्यादि काष्ठावस्था । समाधि सर्वथा नव्हे ब्रह्मा ॥६१॥
समाधिमाजी जो तटस्थ । तो जाणावा वृत्तियुक्त । वृत्ति असतां समाधिस्थ । तें मी अनंत सत्य नमनी ॥६२॥
मूर्छित वृत्ति असतां पोटीं । समाधि ह्नणणें गोष्ट खोटी । जेथ अहं सोहं विराल्या गांठी । ते समाधि गोमटी मी मस्तकी वंदीं ॥६३॥
ज्वर असता नाडी आंत । आरोग्य स्नान तोचि घात । तेवीं वृत्ती असतां, समाधिस्थ । तो जाण निश्चित आत्मघाती ॥६४॥
सर्वभूती निजात्मता । तिसी पावोनि जाली सर्व समता । ते बोलतीचालती समाधिअवस्था । मजही सर्वथा मानिली ॥६५॥
ऐसी सर्वत्र समताबुद्धी । त्या नांव परसमाधी । ते म्यां तुज गुरुकृपें त्रिशुद्धी । यथाविधी प्रबोधिली ॥‍६६॥
या समाधीच्या समदृष्टीं । संकल्पें सृजी ब्रह्मांडकोटी । विकल्पें संहारितां शेवटी । कर्तेपण पोटी उठोंविसरे ॥६७॥
निजसमाधी समसाम्यता । देखोनि पळाली देहअहंता । तेथ मी एक सृष्टीचा कर्ता । या स्फुरणाची वार्ता स्फुतें केला हों ? ॥६८॥
सिंधुमाजी पडिलें सैधव घन । विरे तंव स्फुरे रवेपण । तें विरालिया संपूर्ण । ‘ मी झालों जीवन ’ हेंहि नराहे ॥६९॥
तेवीं मज एक होती बद्धता । आतां पावलों मुक्तता । येहिविषींची कथावार्ता । तुज सर्वथा स्फुरेना ॥६७०॥
ऐशीया पूर्णसमता । सृष्टी तुज करितां हरितां । आंगीं नलागे मोहममता । सत्य सर्वथा स्वयंभू ॥७१॥
देशकालेंस्वभावता कल्पविकल्पमहाकल्पांता । सृष्टिसर्जनाची मोहममता । तुज सर्वथा बाधीना ॥७२॥
हें मी तुज सांगों काये । अनुभव तूंचि पाहे । जें तुज पूर्णत्व प्रकाशिलें आहे । तेथें होय नव्हे रिघेना ॥७३॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.