चतुःश्लोकी भागवत/शुकयोगींद्र

जंव अर्थाअर्थी चोखडी गोडी । तंव अतिशयें अतिआवडी । श्रीशुकाची पडली उडी । सर्वांगी चोखडी चाखिली चवी ॥२५॥
ऐसा देखोनी अधिकार । श्रीव्यासें निजकुमर । उपदेशिला शुकयोगींद्र । जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥
जो ब्रह्मचर्यशिरोमणी । जो भक्तांमाजीं अग्रगणी । जो योग्यांचा मुकुटमणी । सज्ञान चरणीं लागती ज्याचे ॥२७॥
जो सुखरुपें रुपा आला । की शांतिरसाचा ओतिला । निखळ विज्ञानाचा घडला । स्वयें साकारला परब्रह्मरुप ॥२८॥
त्याच्या देहाची पाहतां शोभ । ब्रह्मज्ञानी निघाले कोंब । तो ज्ञानाचा पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ पूर्णब्रह्म ॥२९॥
दशलक्षण श्रीव्यासोक्ती । चतुःश्लोकीचे अर्थप्राप्ती । श्रीशुकाची निजस्थिती । झाली निश्चितीं परब्रह्मरुप ॥३०॥
यापरी श्रीशुक्र आपण । स्वयें झाला स्वानंदघन । त्या आनंदाचें समाधान । पाहोनि पूर्ण समाधिस्थ झाला ॥३१॥
नाहीं वृत्तिधैर्यधारणा । आपेंआप सहजें जाणा । समाधी आली समाधाना । सुखरुपें पूर्णार्णवबोध झाला ॥३२॥
समाधी आणि उत्थान । दोहीं अवस्था गिळूनी जाण । शुक्र आपणिया आपण । सुखरुपें पूर्ण प्रबोध पावे ॥३३॥
ते समाधीचा अवबोध । शुकासी वाटे निमिषार्ध । बाहेर लौकिक प्रसिद्ध । दशसहस्त्राब्द पुराणगणना ॥३४॥
दशसहस्त्रवर्षेपर्यत । श्रीशुक होता समाधिस्थ । ऐसी महापुराणें गर्जत । शुकासी वाटत निमिषार्ध पैं ॥३५॥
यालागीं स्वरुपीं निर्वाही । सर्वथा रीघ मना नाहीं । मुख्य काळचि जेथें नाहीं । काळगणना तेठायीं । ठसावे कोणा ॥३६॥
लवनिमिषपळेंपळ । साधूनियां समाधि त्रिकाळ । हें मायामय मृगजळ । स्वरुपीं अळुमाळ स्पर्शलें नाहीं ॥३७॥
जो सूर्यापासीं स्वयें राहे । त्यासी उदयास्त भेटों नलाहे । तेवीं स्वरुपीं जो निमग्न होये । त्यासी काळाची सोये स्वप्नीहि नलगे ॥३८॥
काळगणनाप्रसिद्धी । हे लौकिकी जाण त्रिशुद्धी । स्वस्वरुपींचा संबंधी । काळाची अवधी निः शेष नपवे ॥३९॥
जें जें आकारासी आलें । तें तें जाण काळें ग्रासिलें । काळासी ज्यानें सबाह्य व्यापिलें । तेथें काळाचेंही गेलें काळत्व सगळें ॥९४०॥
ते स्वरुपी निजनिर्वाही । शुक समाधिस्थ जाहला पाही । मां काळगणना तेठायीं । कैंची काई सांगावी पां ॥४१॥
यालागीं समाधि आणि उत्थान । हें अपक्वासीच घडे जाण । पूर्वाच्या अंगा लक्षण । अणुप्रमाण असेचिना ॥४२॥
पूर्णाची लक्षितां लक्षणें । थोटावली अवधी पुराणें । वेद ‘ नेति नेति ’ म्हणे । तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥४३॥
पूर्णयोगी प्रारब्धवशें । लौकिकीं जैसा तैसा दिसे । तेही पूर्णस्थिती तो असे । कांहीं अनारिसें करी ना करवी ॥४४॥
यापरी शुकाची समाधि जाणा । स्वयें आली समाधाना । तैंच परीक्षितीच्या सदना । विचरतां त्रिभुवना अवचट आला ॥४५॥
बाप भाग्य परीक्षिती । ब्रह्मनिधी लागला हातीं । ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती । घातली जगतीं ज्ञानपव्हे ॥४६॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.