चतुःश्लोकी भागवत/ब्राह्मणाचें सामर्थ्य

सभाग्य कोप ब्राह्मणाच । शापे अधिकार ब्रह्माचा । मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा । पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥
शमीकाचा ब्रह्मचारी पुत्र । पाठकें दिधलें शिखासूत्र । त्याचेंनि शापें ब्रह्माधिकार । जाण ब्राम्हणमात्र ब्रम्हरुपी ॥४८॥
शाप देतील जरी ब्राह्मण । तरी वंदावे त्यांचे चरण । कोपा चढल्याही ब्राह्मण । पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥
ब्राह्मण करुं आलिया घाता । त्याचे चरणी ठेवावा माथा । ब्राम्हणापरती पूज्यता । आन दैवता असेनाची ॥९५०॥
ब्रम्ह ब्राम्हण समसमान । हेंही वचन दिसे गौण । ब्रम्हदाते स्वये ब्राम्हण । यालागीं पूर्ण पूज्यत्वें श्रेष्ठ ॥५१॥
जें वस्तु असे ज्याअधीन । त्या वस्तूचे करितां दान । यालागी ब्रम्हस्वामित्वें ब्राम्हण । पूज्यत्वें पूर्ण तिही लोकी ॥५२॥
ब्राह्मण ब्रम्हातें प्रतिपादिते । तें ब्रह्म होते कोणी नव्हते । ब्रम्ह ब्राह्मणाचेनी हातें । पूर्ण प्रतिष्ठेतें पावले पैं ॥५३॥
यालागीं ब्रम्ह ब्राम्हणाधीन । कदा नुल्लंघी ब्राम्हणवचन । त्यांचे मंत्रमात्रें जाण । पाषाणाही पूर्ण ब्रम्हत्व प्रगटे ॥५४॥
जैसा मातेचा मोहकोप । तैसा ब्राम्हणांचा शाप । शापें फेडूनि पराचें पाप । वस्तू चिद्रूप कोपुनी देती ॥५५॥
ब्राम्हण कोपल्या अतिक्षोभता । एवढा लाभ आतुडे हाता । त्या ब्राह्मणां सुखी करितां । त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा ॥५६॥
यालागीं भूदेव ब्राह्मण । चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । त्यांची निंदा आवज्ञा हेळण । विरुद्ध आपण नवदावें कदा ॥५७॥
त्या ब्राह्मणांच्या कोपबोला । राजा ब्रह्माधिकारी झाला । भाग्यें श्रीशुक पावला । भाग्यें आथिला परीक्षिती तो ॥५८॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.